उद्याच दुपारनंतर चिन्हही वाटप होणार
बीड (रिपोर्टर) ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीला गेल्या काही दिवसांपासून सुरुवात झाली. अर्जाची छानणी झाल्यानंतर आता किती उमेदवार रिंगणात राहणार याकडे सर्वांचं लक्ष आहे . जे उमेदवार अडचणी आणू शकतात, अशा उमेदवारांना पॅनलप्रमुख उमेदवारी मागे घेण्यासाठी आजपासूनच गळ घालताना दिसून येऊ लागले. उद्या दुपारनंतर चिन्हाचे वाटप होणार असून परवापासून खर्या अर्थाने प्रचाराला सुरुवात होणार आहे. सरपंचपद जनतेतून असल्याने यावेळीही ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये चुरस पहावयास मिळणार आहे.
बीड जिल्ह्यातील 704 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका होत आहेत. निवडणुका जिंकण्यासाठी गावपुढार्यांनी पराकाष्ठा सुरू केली. अर्जाच्या छानणीत अनेक इच्छुकांचे अर्ज उडाले. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची उद्या दि. 7 डिसेंबर शेवटची तारीख आहे. ज्यांना प्रमुख पॅनलकडून सरपंच पदासाठी उमेदवारी मिळाली नाही अशांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली. जे अपक्ष पॅनलला अडचणीचे ठरू शकतात त्या अपक्षांना उमेदवारी मागे घेण्यासाठी आजपासून गळ घातली जाऊ लागली. सहजासहजी अपक्ष फुटत नसेल तर त्यांना विविध आमिषेही दाखवले जाऊ शकतात. उद्याच उमेदवारांना चिन्हाचे वाटप होणार आहे. परवापासून खर्या अर्थाने निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात होणार आहे. सरपंच पद जनतेतून असल्याने या पदासाठी अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. बोटावर मोजण्याइतक्याच ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्या. इतर ग्रामपंचायतींमध्ये अटीतटीचा सामना होणार असल्याचे दिसून येत आहे.
सोशल मिडियावर सुरू झाला उमेदवारांचा प्रचार
आजचं युग हे तंत्रज्ञानाचं असल्याने बहुतांश नागरिकांकडे स्मार्टफोन आहे. या फोनचा उपयोग आता उमेदवारांच्या प्रचारासाठी होऊ लागला. व्हॉटस्अॅप, फेसबुकवर ग्रा.पं. निवडणकीच्या प्रचाराचा धुमाकूळ सुरू असल्याचे दिसून येऊ लागले.