गणेश सावंत
मो. नं. 9422742810
महाराष्ट्राच्या मातीला मान-अपमान नवे नाहीत. इथली माती जेवढे अपमान पचवू शकते तेवढ्याच धैर्याने स्वाभिमानाचे पिकही उगवू शकते. म्हणूनच देशाच्या नव्हे तर जगाच्या पाठीवर ‘गर्जा महाराष्ट्र’ पहावयास मिळतो. मात्र त्याच महाराष्ट्राची आणि महाराष्ट्रातील महापुरुषांची सातत्याने अवहेलना होत होती. अवहेलना करणारा दुसरा कोणी नव्हता तर तो या राज्याचा राज्यपाल होता. वादग्रस्त म्हणून महाराष्ट्राला ग्रस्त करून सोडणारे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा आज राष्ट्रपतींनी मंजूर केला आणि महाराष्ट्राने केंद्राच्या भोंग्याच्या भुनभुनीतून मोकळा श्वास घेतला. कोश्यारींनी नेमके काय केले की आज आम्हालाच नव्हे तर महाराष्ट्रातल्या सकळ जणांना कोश्यारींच्या निवृत्तीवर आनंद व्यक्त करावासा वाटतो. भगतसिंह कोश्यारी ज्या पदावर विराजमान होते ते राज्यपालाचं पद सार्वभौम असताना केवळ एका विचारसरणीला, एका धर्माला, एका अजेंड्याला धरून वृद्धापकाळाकडे झुकलेले कोश्यारी काम करत राहिले आणि तिथेच महाराष्ट्राच्या मातीला, मनाला आणि स्वाभिमानाला नख लागले. बहुजन विचारसरणीचा आणि माणसाला माणूस म्हणून आजपर्यंत जगवत आलेला महाराष्ट्र कोश्यारींच्या अडेलतट्टूपणापुढे हातची बाहुली ठरला. पारतंत्र्यात आणि सोळाव्या शतकात महाराष्ट्रातले लोक तथाकथीत शाह्यांपुढे आणि इंग्रजांपुढे झुकायचेच मात्र त्यातही छत्रपती शिवरायांपासून ते महात्मा फुलेंपर्यंत, संत नामदेवांपासून ते जगद्गुरू संत तुकोबांपर्यंतचे महापुुरुष अशा सत्ताधीशांच्या सिंहासनांना हादरवून सोडायचे मात्र लोकशाहीच्या राज्यात राज्यपाल जेव्हा एकअंगी होतो अन्
धोतरावर इन
करून आपल्यातलं वेगळंपण दाखवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा अशा व्यक्तीविरुद्ध आवाज नक्कीच उठला जातो. तसा तो आवाजही महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून भगतसिंह कोश्यारींविरोधात उठलाही कोश्यारींचे वादग्रस्त निर्णय, धर्मांध वागणे आणि त्याला केंद्र सरकारकडून पाठिशी घालणे हे भाजपाने स्वत:च्या राजकारणासाठी बेरजेत केले असले तरी भगतसिंह कोश्यारी या व्यक्तीची मात्र महाराष्ट्राच्या मना मनात वजाबाकी झाली हेही तेवढेच खरे. राज्यात भाजपाच्या विचारसरणी विरोधातले सरकार आहे म्हणून त्यांनी घेतलेल्या कुठल्याही निर्णयाला आडकाठी करायची अन् लोकहिताचे निर्णय घेण्याऐवजी लोकांचे वाटोळे कसे होईल याकडे जणू लक्ष ठेवायचे, असेच धोरण भगतसिंह कोश्यारींचे पहायला मिळाले. तुम्हाला आठवत असेल कोरोनाचा काळ, या काळामध्ये घराच्या दरवाज्यापासून मस्जिद-मंदिराच्या दरवाज्यापर्यंत टाळे लावलेले होते. मात्र केवळ आघाडी सरकारच्या अंगावर लोकं जावेत म्हणून धर्माचा झेंडा उचलत देवालय खुले करण्याबाबत याच महाशयांनी आदेश दिला तेव्हा खरच त्यांना देव-देश-धर्म याची काळजी आहे का? माणूस धर्माबद्दल आपुलकी आहे का? हे प्रश्न आमच्यासारख्याला आणि माणूस धर्मावर विश्वास ठेवणार्या महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाला पडले होते. एवढ्यावरही केंद्राचा भुंगा थांबला नाही. केंद्र सरकार या भुंग्याच्या पार्श्वभागात काडी करायचा आणि भुंगा महाराष्ट्रातल्या मातीतल्या माणसांच्या कानाजवळ भुनभुन करत राहायचा. संताप तेव्हा आला जेहा या भुंग्याने महाराष्ट्राच्या
युगपुरुषांवर अपशब्द
काढले. वय वाढल्यावर बुद्धी साठीनाठीची होते, असं आपल्याकडे म्हटलं जातं, परंतु महाराष्ट्राच्या मातीत आणि या रांगड्या हिंदुस्तानात जन्मलेले असे कित्येक साठीनंतरचे बौद्धीक वटवृक्ष तुम्ही-आम्ही पाहतो आणि त्या वटवृक्षाच्या वैचारिक छायेत या भारताचा इतिहास लिहिला जातो. त्याच भारतात तेही देवभूमीत जन्मलेला व्यक्ती एवढा क्लेषदायक ठरू शकतो हे अविश्वसनीय आहे, परंतु भारतीय जनता पार्टीची राजकीय कार्यप्रणाली पाहता त्यावर विश्वास ठेवावा लागतो. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सातत्याने महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्रातील अपमान केला, मुंबईत एकवेळेस बोलताना त्यांनी गुजरात आणि राजस्थानचे लोक मुंबईतून गेले तर मुंबईला कोणी आर्थिक राजधानी म्हणून ओळखणार नाही, असं वक्तव्य करून थेट महाराष्ट्राच्या मनगटालाच त्यांनी कमी लेखत तेव्हाही प्रचंड संताप व्यक्त केला गेला. महाराष्ट्राच्या माणसाबद्दल आणि त्याच्या कर्तृत्वाबद्दल कोणी बोललं तर ते सहनही होऊ शकतं, परंतु जेव्हा
इतिहास पुरुषांचा अपमान
केला जातो तेव्हा मात्र महाराष्ट्राच्या माणसा माणसांची तळपायाची आग मस्तकाला जाते आणि तीच आग भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे मस्तकात गेली ती आजपावेत आहे. ते एकदा म्हणाले, ‘समर्थ रामदास यांच्याविना शिवाजी महाराजांना कोण विचारेल? चाणक्यशिवाय चंद्रगुप्तांना कोण विचारेल?’ असे प्रश्न उपस्थित करून गुरुचं आपल्या समाजात मोठं स्थान असतं तसच छत्रपतींनी मला माझं राज्य तुमच्या कृपेने मिळालं आहे, असं समर्थांना म्हटल्याचंही भाष्य केलं. एकतर याठिकाणी या वृद्धापकाळातल्या ज्येष्ठ अज्ञानी माणसाने छत्रपती शिवाजी महाराजांची अवहेलना करताना त्यांच्या कर्तृत्व कर्मावर बोट ठेवत खोटारडेपणाचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला. रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते नाहीत, समर्थांना छत्रपतींनी तुमच्यामुळे स्वराज्य घडू शकले असे कधीही म्हटले नाही. हे त्रिवार सत्य असताना कोश्यारी यांनी महाराष्ट्राच्या इतिहासात ढवळाढवळ करण्याचा खोडसाळपणा केला. पुढे एका कार्यक्रमात कोश्यारी म्हणाले, कल्पना करा की, सावीत्रीबाईंचं लग्न दहाव्या वर्षी झालं तेव्हा त्यांच्या पतीचं वय हे तेरा वर्षे होतं. कल्पना करा की, मुलगा-मुलगी लग्नानंतर काय करतील, लग्न झाल्यानंतर काय विचार करत असतील, असे प्रश्न उपस्थित करताना स्वत: आनंदीत हार्षोल्हासित होत वक्तव्य केले. या वेळी ते टीकेचे धनी झाले. यापुढे जात कधी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबाबत भाष्य करत राहायचे तर कधी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत वक्तव्य करून कोश्यारी यांनी स्वत:ची पुरती इभ्रत घातली. कोश्यारींचं महाराष्ट्र बाबतचं वागणं हे संतापजनकच होतं, निषेधार्हच होतं. त्यांच्या आजच्या राजीनाम्याने नक्कीच महाराष्ट्र नाही तर हा देश सुखावेल, जो व्यक्ती धर्माचं राजकारण करण्यात आपल्या अधिकाराचा गैरवापर करतो तो व्यक्ती या गणतंत्राच्या देशात सार्वभौम पदावर राहूच शकत नाही.
कोश्यारींचं वागणं
व्यक्तीचं दुखणं
नसतं, इथं व्यक्ती हा दोषी नसतोच, त्याची प्रवृत्ती दोषी असते. अन् इथेही भगतसिंह कोश्यारी वयोवृद्ध असताना केवळ त्यांच्या प्रवृत्तीने त्यांना महाराष्ट्राचा खलनायक ठरवणे भाग पाडले. या पापाचे भागीदार खरंतर केंद्रात बसलेले सत्ताधीश आहेत. त्यांनी तेथून तुघलकी आदेश काढायचे आणि त्या आदेशाचे तंतोतंत पालन भगतसिंह कोश्यारी महाराष्ट्रात करायचे. केवळ आघाडीच्या सरकारची सत्ता स्थापन होऊ नये म्हणून रातोरात राष्ट्रपती राजवट लागू करणारे हेच राष्ट्रपती, रातोरात राष्ट्रपती राजवट उठवणारे आणि भल्यापहाटे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांना शपथ देणारे हेच राष्ट्रपती. एकूणच कायद्याचा भंग, लोकशाहीच्या अधिकारांची पायमल्ली. महाराष्ट्राच्या मातीत निपजलेल्या सर्वसामान्य नागरिकांच्या मुलभूत अधिकारांवर गदा याच व्यक्तीने सातत्याने आणला. कोश्यारी यांचं वय पाहता आणि त्यांचे कृत्य पाहता नक्कीच कोश्यारींबाबत जगाच्या पाठीवर थुंकणार्यांची संख्या अधिक राहिली. इथे कोश्यारींना दोष द्यायचा की, कायद्याची आणि लोकशाहीची पायमल्ली करण्याचा आदेश देणार्या त्या हुकुमशाह सत्ताधिशांना आरोपीच्या पिंजर्यात उभा करायचे हे आम्ही ठरवण्यापेक्षा महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेने ठरवावे. परंतु राज्यपाल पद हे जे सार्वभौम आणि सर्वास पोटास लावणे आहे या बिरुदावलीतलं पद आहे त्या पदाची गरिमा राखली गेली पाहिजे हेही तेवढेच खरे. आता तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रीमंडळात काम करणारे, त्यांच्या सानिध्यात काम करणारे रमेश बैस हे राज्यपाल म्हणून महाराष्ट्राला लाभले आहेत. अटलबिहारींची संस्कार, संस्कृती, देशभक्ती, लोकहितवादी अपेक्षा पाहता बैस यांच्याकडून राज्यपाल पदाची गरिमा राखली जाईल, हीच अपेक्षा.










