राजकीयदृष्ट्या संवेदनशील मानल्या जात असलेल्या बीड जिल्ह्यात गल्लीचे असो की राज्याचे राजकारण हे तेवढेच संवेदनशील असते. बीड जिल्ह्यामध्ये राजकारणाचे थोरले घर म्हणून क्षीरसागरांच्या घराकडे पाहितले जाते. मात्र गेल्या पाच-सात वर्षांच्या कालखंडात राजकारणातल्या या थोरल्या राजकारण्याला त्यांच्याच वारसदारांनी राजकीय दृष्ट्या जेरबंद केले. आ. संदीप क्षीरसागर यांच्या यशामागे अनेकांचे हात असले तरी घाटावरच्या लक्ष्मण बापुंच्या निष्ठेच्या वारसदाराचे हात हे किमयागार आहेत. लक्ष्मण बापुंचे चिरंजीव डॉ. बाबू जोगदंड यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीत केलेला करिश्मा हा थोरल्या क्षीरसागरांच्या प्रत्येक खेळीवर मात करणारा ठरला अन् काकुंच्या विचारांवर चालणार्या लक्ष्मण बापुंच्या लेकीला बाजार समितीवर पदसिद्ध करून गेला.
गेल्या चार दशकांपासून बीडची कृषी उत्पन्न बाजार समिती ही माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या ताब्यात होती. मात्र या वेळेस घरातूनच पुतणे, आ. संदीप क्षीरसागर यांनी थोरल्या क्षीरसागरांना आव्हान दिले अन् बाजार समिती आपल्या ताब्यात आणली. पडद्याआडून अनेक राजकीय व्यूहरचना आखल्या गेल्या आणि या व्यूहरचनेत प्रत्येक पायरीवर यश येत गेलं ते डॉ. बाबू जोगदंड यांच्या व्यहरचनेमुळेच. कोण आहेत बाबू जोगदंड? त्यांच्या व्यूहरचनेला अपयश का येत नाही? ते राजकीय डावपेचात अडकले का जात नाहीत? या प्रश्नाचे उत्तर शोधताना गेल्या पाच ते सहा दशकांचा इतिहास चाळला तर डॉ. बाबू जोगदंड यांचे वडील लक्ष्मण बापू जोगदंड यांच्या एकनिष्ठतेवर येऊन थांबते. डॉ. जोगदंड यांचे वडील लक्ष्मण बापू हे स्व. केशरकाकुंचे खंदे समर्थक होते. राजकारणातल्या थोरल्या घरात बापुंचे नुसते येणेजाणेच नव्हते तर थोरल्या घराशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यामुळे लहानपणापासून डॉ. बाबू जोगदंड राजकारणातल्या थोरल्या घरात खेळायचे, बागडायचे. काकुंचे राजकीय विचार राजकारणाबरोबर समाजकारणाचे धोरण त्यांनी जवळून पाहिले. नव्हे नव्हे तर डॉ. जोगदंड यांना ते बाळकडु मिळाले. (पान 7 वर)
प्राथमिक शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण घेतल्यानंतर डॉ. जोगदंड यांनी पुण्यात प्रॅक्टीसही केली. मात्र राजकारणामध्ये माणसांना जोडण्याहेतू थोरल्या घराने पुन्हा जोगदंड घराण्यावर जबाबदारी टाकली आणि बाबू जोगदंड यांना परत गावी बोलवण्यात आले. थोरल्या क्षीरसागरांसोबत बाबू जोगदंड यांनी एकनिष्ठतेने काम केले. मात्र जेव्हा निष्ठतेची अवहेलना होते, विचारांची परतारणा होते तेव्हा काकुंच्या काफिल्यात बागडलेल्यांनी सवतासुभा उभा करत थोरल्या क्षीरसागरांना आव्हान दिले. विधानसभेत थोरल्यांचा पराभव करत काकुंच्या दुसर्या पिढीच्या वारसदाराच्या हाती बीडचे सुत्र दिले तेव्हापासून डॉ. जोगदंड हे चर्चेत आले. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लोकहिताचे प्रश्न सोडविण्या हेतू, शेतकर्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि काकुंच्या विचारांवर संस्था चालवण्यासाठी पुन्हा पुतण्याने काकाला आव्हान दिले. तेव्हा डॉ. बाबू जोगदंड हे या निवडणुकीत महत्वाचे ठरले. बाबू जोगदंड यांचा क्षीरसागर घरातला वावर गेल्या पाच ते सहा दशकांपासूनचा क्षीरसागरांच्या काफिल्यातला अनुभव, काकूंपासून जयदत्त क्षीरसागरांपर्यंत त्यांनी पाहिलेले राजकारणातले डावपेच हे डॉ. जोगदंड यांच्या राजकीय व्यूहरचनेचे खरे धडे ठरले. म्हणूनच चार-साडेचार दशक जे कोणालाच जमले नाही ते जमून आणण्यात डॉ. जोगदंडला यश आले. कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक झाल्यानंतरही तिथे छक्केपंजे करण्याचा प्रयत्न काहींनी केला. तो राजकारणाचा भाग. मात्र इथेही डॉ. जोगदंड सरस ठरले अन् बाजार समितीत आ. संदीप क्षीरसागर यांना मार्केट आणले. आज बाजार समितीवर स्व. केशरकाकू यांच्या विचारांचे, निष्ठेचे असलेले लक्ष्मण बापू जोगदंड यांची कन्या सभापती म्हणून आहे. डॉ. जोगदंड यांनी थोरल्या क्षीरसागरांच्या खेम्यामध्ये जे राजकीय ऑपरेशन केले ते सक्सेस झाले.