आष्टी (रिपोर्टर ): – आष्टी तालुक्यातील धामणगांव हे बीड-अहमदनगर रस्त्यावरील सर्वात मोठे गांव. गावामध्ये नेहमी करीता विविधतेतून एकता पहायला, अनुभवयाला मिळते. गावामध्ये विविध जाती-धर्माची मंडळी मोठ्या तन्मयतेने प्रत्येकाच्या सुख-दु:खात सहभागी असतात. आजवर जातीय तेढ येथे कधीच झाली नाही. गावातील सप्ताह सोहळा, ईदमिलाद, यात्रा, लग्नकार्य यात प्रत्येकाचे योगदान घरच्या कार्यापेक्षा कमी नसते.
सध्या प्रत्येकाला आषाढी निमित्त पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीची ओढ लागलेली आहे. अनेक वारकरी दिंडीत सामील होऊन पायी चालत चालत पंढरीला जातात तर काही मंडळी वारक-याची सेवा करण्यात धन्यता मानतात. यावर्षी नेवासा तालुक्यातील खामगांव येथील वारकरी माऊलीच्या पादूका घेऊन पंढरीला पांडुरंग भेटीसाठी दिंडी घेऊन प्रथमच निघाली आहे. दिंडीतील वारक-याचे स्वागत,नाष्टापाणी व निरोप देण्याची सर्वस्वी जबाबदारी धामणगांव येथील मुस्लिम बांधवाने स्वीकारून एक वेगळाच माणूसकीचा आदर्श सबंध घालवून दिला.
दिंडीतील प्रत्येक वारकरी हा विठूराया आहे. त्याच्या भक्तीमध्ये कुठेही कमतरता राहणार नाही यासाठी प्रत्येक मुस्लिम मावळा रममाण होता. दिंडीला निरोप देतानाचे दृष्य अत्यंत मनमोहक व आदर्श असे होते. डोक्यावर मुस्लिम टोपी,गळ्यात पंच्च्या व हातात भगवी पताका घेऊन मुखाने हरिनाम म्हणत होते. जागोजागी फुगड्या खेळत विठूरायाच्या जयघोषात नाचण्यात तल्लीन होऊन गेली होती. हे आगळे वेगळे दृष्य आपल्या मोबाईल कॅमेर्यात टिपण्यासाठी दुतर्फा गर्दी दिसत होती.
इतरत्र जातीय तेढ,द्वेषभावना दिसत असताना धामणगांव मध्ये मात्र आपण सर्व त्या विधात्याची लेकरं आहोत. आपल्या सर्वांच्या रक्ताचा रंग लाल आहे. या न्यायाने आपण सर्वजण भाऊ-भाऊ आहोत हा आदर्श या निमित्ताने पहावयास मिळाला.
यावेळी धामणगांव चे मा.सरपंच तथा आष्टी तालूका दुध संघाचे मा.चेअरमन संजय नाना गाढवे यांनी बोलताना सांगीतले की,धामणगांवमध्ये जातीयते पेक्षा माणूसकी हा धर्म मोठा आहे. ती शिकवण आम्ही आजवर जोपासली व येथून पुढेही ही परंपरा अखंड जोपासली जाईल असे अश्वस्थ केले.