
दोन दिवसात निर्णय झाला नाही तर आंदोलन अटळ
अंतरवली वरून सुरूवात शिवनेरीवर मुक्काम, आझाद मैदानावर निर्णायक लढा
सरकारला मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटलांचा शेवटचा इशारा
गेवराई । भागवत जाधव
मराठा आरक्षणासाठी गेल्या दोन वर्षांपासून संघर्ष करत असलेले नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज शेवटची पत्रकार परिषद घेत सरकारला थेट इशारा दिला. सरकारची भूमिका अडमुठी आहे. अजूनही तुम्ही मराठा समाजाला वेठीस धरून ठेवलंय. आम्ही नोंदीप्रमाणे पुरावे दाखवून दिले तरी तुम्ही टाळाटाळ करताय. आता दोन दिवसांची मुदत देतो अद्यादेश काढा, अन्यथा मुंबई आंदोलन अटळ आसून सरकार ही उलथून टाकू असा ईशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिला आहे.
मुंबई दौर्याचे सविस्तर नियोजन
29 ऑगस्ट रोजी सकाळी अंतरवली येथून प्रस्थान करून पैठण – अहिल्यानगर – आळेफाटा – शिवनेरी (किल्ल्यावर मुक्काम) – राजगुरूनगर – चाकण – चेंबूर – वाशी – आझाद मैदान असा मार्ग ठरवण्यात आला आहे.
मुंबईचा हा दौरा न भूतो न भविष्यती ठरणार आहे. समाजातील सर्व बांधवांनी सगळी कामे बाजूला ठेवून मुंबईला जमावे. गाड्या घेऊन आम्हाला मुंबईत सोडा, आम्ही आरक्षणाशिवाय माघारी फिरणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
जरांगे पाटील यांच्या मुख्य मागण्या
मराठा आणि कुणबी एकच असल्याचा अद्यादेश मंजूर करावा.
हैदराबाद -सातारा – मुंबई गॅजेट लागू करावे.
सरकारी नोंदींप्रमाणेच आरक्षण द्यावे.
आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या कुटुंबियांना मदत द्यावी.
आंदोलनातील लाठीहल्ल्यातील गुन्हे मागे घ्यावेत.
मुख्यमंत्र्यांवर थेट निशाणा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाविषयी खुन्नस ठेवून आहेत. मराठा आणि कुणबी एकच असल्याचे 58 लाख पुरावे आम्ही दिले. एवढा मोठा पुरावा असताना अजूनही तुम्ही आदेश काढला नाही. मग सरकार काय सिद्ध करायला पाहते? दोन दिवसात आदेश नाही आला, तर हे सरकार अडमुठे ठरेल आणि मग मराठा समाजाच्या रागाची झळ या सत्तेला चुकणार नाही. मराठा समाज बिघडला तर तुमची सत्ता उलथून टाकेल, असा थेट इशारा त्यांनी दिला.
शांततेत आंदोलनाचे आवाहन
मुंबईकरांनी घाबरू नये. आम्ही गणेशभक्त आहोत. तुमच्या गणेशोत्सवाला गालबोट लागू देणार नाही. मात्र सरकारने लक्षात घ्यावे हे आंदोलन शांततेत असेल, पण ठाम असेल. दगडफेक, जाळपोळ, रस्ता रोको आमचा मार्ग नाही. पण आरक्षणाशिवाय माघारी परत जाणेही शक्य नाही, असे जरांगे पाटील म्हणाले.
अंतिम गर्जना
आजची ही शेवटची पत्रकार परिषद आहे. आता पुढे चर्चा नाही, फक्त अद्यादेश. दोन दिवसांत सरकारने निर्णय घेतला नाही तर यापुढे संपूर्ण महाराष्ट्र थेट मुंबईकडे निघेल. आम्ही एवढा वेळ दिला, पण तुम्ही आम्हाला वेड्यात काढलं. आता माघार नाही, आरक्षण घेऊनच परत फिरणार, अशी अंतिम गर्जना मनोज जरांगे पाटील यांनी केली.







