
मुंबई महानगरीला मराठ्यांचा वेढा
शहरात छावणीसदृश्य परिस्थिती
वाहतुकीची प्रचंड कोंडी, सगळे मुख्य रस्ते मराठ्यांनी तुडुंब, ‘एक मराठा लाख मराठा’, ‘हम सब जरांगे’च्या घोषणांनी मुंबई दणाणली
मुंबई (रिपोर्टर): मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्या, या प्रमुख मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानावर डेरेदाखल झाले. उभ्या मुंबईला मराठ्यांचा वेढा आणि शहरामध्ये मराठ्यांची छावणी पडल्यासदृश्य परिस्थिती पहावयास मिळत असून शहरात वाहतूक कोंडी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. दुसरीकडे जरांगे उपोषणस्थळी पोहचताच मोर्चेकर्यांना सूचना देताना कोणीही जाळपोळ, दगडफेक करायची नाही. आंदोलनाला बट्टा लावायचा नाही, मी मरण पत्करायला तयार आहे. पण आता मागे हटायचे नाही, मराठ्यांना विजय मिळवून दिल्याशिवाय, डोक्यावर गुलाल टाकल्याशिवाय इथून हलायचं नाही, असा निर्धार व्यक्त करत कोण काय सांगतय, कोण राजकीय पोळी भाजतय यासाठी कोणी आपल्या आंदोलनाचा वापर करतय का, हे गांभीर्याने पाहण्याच्या सूचना जरांगे पाटलांनी उपस्थित मोर्चेकर्यांना दिल्या तर दुसरीकडे बीड जिल्ह्यातल्या तीन आमदारांनी आझाद मैदानाच्या व्यासपीठावर जात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनास जाहीर पाठिंबा दर्शविला. यामध्ये अजित पवार गटाचे आ. प्रकाश सोळंके, आ. विजयसिंह पंडित आणि शरद पवार गटाचे संदीप क्षीरसागर यांचा समावेश आहे.

पुढे बोलताना, जरांगे पाटील म्हणाले,
सरकार आपल्याला सहकार्य करत नव्हते, त्यामुळे आपण मुंबईला यायचे ठरवले होते आणि मुंबई जाम करायची ठरवली होती. पण आता सरकार आपल्याला सहकार्य करायला तयार आहे. त्यामुळे कुणीही चुकीचे पाऊल उचलू नका. आझाद मैदानावर आज सकाळी 10 वाजल्यापासून माझे आमरण उपोषण सुरु झाले आहे. आता आरक्षणाचा गुलाल डोक्यावर पडल्याशिवाय इथून हलायचं नाही, असे मनोज जरांगे पाटील सोबत आलेल्या मराठा बांधवांना म्हणाले. ठरल्याप्रमाणे आज सकाळी 10च्या सुमारास मनोज जरांंगे पाटील मुंबईच्या आझाद मैदानात दाखल झाले. तेथे येताच त्यांनी मराठा आंदोलकांशी संवाद साधून शांततेत आंदोलन सुरू ठेवण्याचा सल्ला दिला.
सुरूवातीला सरकार सहकार्य करत नव्हते, पण आता सरकार सहकार्य करत आहे. या मैदानात आंदोलन करण्याची आपल्याला परवानगी दिली गेली आहे. मुख्यमंत्री आणि इतरांना माझे एकच सांगणे आहे की, तुम्ही आता आमच्याशी चर्चा करण्यासाठी या. आम्ही आरक्षणाचा गुलाल डोक्यावर पडल्याशिवाय येथून उठणार नाही. कार्यकर्त्यांनी दोन तासांत मुंबई खाली करावी. उगाच सर्वसामान्य जनतेची आपल्या आंदोलनामुळे गैरसोय होऊ नये. तसेच, आंदोलनात आलेल्यांनी मद्यपान करायचे नाही. कुठलाही अनुचित प्रकार घडू द्यायचा नाही. रस्ते किंवा इतर सुविधा अडवायच्या नाहीत. आपल्या शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू ठेवणार आहोत. आता जेलमध्ये जावे लागले तरीही चालेल, पण आमरण उपोषण थांबणार नाही, असेही जरांगे पाटील यांनी सरकारला ठणकावून सांगितले.
मनोज जरांगेंचा मास्टरस्ट्रोक
आझाद मैदानावर उपोषणाला सुरुवात करताना मनोज जरांगे पाटील यांनी आणखी एक मास्टरस्ट्रोक खेळला. तो म्हणजे जरांगे पाटील यांनी स्टेजवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या शेजारी गणपतीची मूर्ती ठेवली. मनोज जरांगे मुंबई येण्यापूर्वी भाजपच्या नेत्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. मनोज जरांगे गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत आल्यास मोठी अडचण होईल. यामुळे हिंदुंच्या सणात विघ्न येईल, असा मुद्दाही उपस्थित केला जात होता. मात्र, मनोज जरांगे यांनी आम्ही मुंबईत गणेशोत्सवाला कोणतेही गालबोट लागू देणार नाही, असे आश्वासन दिले होते. आज मैदानावर उपोषणाला बसताच मनोज जरांगे पाटील यांनी त्यापुढे जात आणखी एक कृती केली. मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसण्यापूर्वी स्टेजवर गणपतीची मूर्ती आणण्यात आली. गणपतीची ही मूर्ती शिवाजी महाराजांच्या बाजूला ठेवण्यात आली. या गणपतीच्या मूर्तीची आरतीही करण्यात आली. या माध्यमातून मनोज जरांगे पाटील आणि मराठा आंदोलकांनी एकप्रकारे मुंबईतील गणेशभक्तांच्या मनात सॉफ्ट कॉर्नर निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. हा मनोज जरांगे यांच्या आंदोलनातील मास्ट्ररस्ट्रोक ठरण्याची शक्यता आहे.

सोळंके, पंडित, क्षीरसागर आझाद मैदानाच्या व्यासपीठावर
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत. मोर्चेकर्यांना संबोधल्यानंतर महाराष्ट्रातल्या विविध पक्षांच्या नेत्यांनी आता थेट मराठा आंदोलनाला पाठिंबा द्यायला सुरुवात केली आहे. बीड जिल्ह्यातील तीन आमदारांचा या आधीच मोर्चाला पाठिंबा दिसून येत होता. आज मात्र अजित पवार गटाचे आ. प्रकाश सोळंके आणि आ. विजयसिंह पंडित यांनी व्यासपीठावर जावून आंदोलनाला पाठिंबा दिला. तर दुसरीकडे शरद पवार गटाचे संदीप क्षीरसागर यांनीही या आंदोलनाला पाठिंबा देत मनोजदादा ज्या मागण्या मांडतील त्याच मागण्या आमच्या असतील, असे या आमदारांनी म्हटले. आ. प्रकाश सोळंके आणि आ. संदीप क्षीरसागर हे एका गाडीतून आंदोलनस्थळी गेले आणि दोघे एकत्र जरांगे पाटील यांना भेटले. या वेळी रमेश आडसकर हेही दिसून आले. तर बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनीही व्यासपीठावर जावून पाठिंबा दिला.







