
अनेक गावांना पाण्याचा वेढा; नागरिकांत भीतीचे वातावरण, शेतकर्यांचे प्रचंड नुकसान
गेवराई (रिपोर्टर): गेवराई विधानसभा मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी व सिंदफना नद्यांनी उग्र रूप धारण केले असून संपूर्ण परिसरात भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला असून नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.

दरम्यान, सिंदफना नदीला आलेल्या पुरामुळे धारवंटा, शहाजनपूर चकला, अनकोटा, नांदूर हवेली, खामगाव, पिंपळगाव कानडा या गावांना पाण्याचा वेढा पडलेला आहे. या गावांत अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने एनडीआरएफच्या पथकांना पाचारण केले असून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. अनेक ठिकाणी होड्या, ट्रॅक्टर, जेसीबीच्या सहाय्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले जात आहे. याचदरम्यान जायकवाडी प्रकल्प, नाथसागर जलाशय, पैठण येथून आज (दि. 23 सप्टेंबर 2025) दुपारी 12.00 ते 12.15 या वेळेत धरणाचे द्वार क्र. 01 ते 09 असे आपत्कालीन दरवाजे 0.5 फूटांनी कमी करून 2.5 फूटांवर स्थिर ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे नदीपात्रात होणारा विसर्ग 4716 क्युसेकने घटला असून सध्या सांडव्याद्वारे 99036 क्युसेक पाणी सोडले जात आहे. तथापि, आवक-जावक लक्षात घेऊन या विसर्गात वेळोवेळी बदल होणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

नाथसागरातून सोडलेल्या पाण्याबरोबरच मधल्या छोट्या-मोठ्या नद्यांमधील पुरामुळे गोदावरी नदी पात्रात मोठा पूर आलेला आहे. नदीकाठच्या शेकडो गावांना या पुराचा फटका बसला असून घराघरात पाणी शिरले आहे. शेतकर्यांचे ऊस, सोयाबीन, कापूस यांसारखी पिके पाण्याखाली गेल्यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. जनावरांच्या चारापाणी टंचाईचे संकटही निर्माण झाले आहे.
सध्या गेवराई मतदारसंघातील ग्रामीण भागात भीतीचे वातावरण असून लोकांचे आयुष्य विस्कळीत झाले आहे. गावोगावी प्रशासन, पोलीस, एनडीआरएफ, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा युद्धपातळीवर मदतकार्य करत आहेत. दरम्यान, येणार्या काही दिवसांत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याने परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.








