गणेश सावंत/9422742810
पक्ष फोडले, खासदार फोडले, आमदार फोडले, नीटचे पेपर फोडले, टीईटीचे पेपर फोडले, आता तर थेट प्रभू रामाचे खजिने लुटले. या सर्व देशांतर्गत दुष्कर्मातून या अखंड हिंदुस्तानाला बाहेरच्या शत्रुंपेक्षा आतमधील बेफ्रिकीची जास्त भिती वाटत आहे. कारण इथे फक्त तिजोर्या फुटत नाही तर विश्वास फुटताना दिसतोय. मंदिरात चोरी होतेय, लोकशाहीत पक्ष फुटतात, संसदेत खासदार फुटतात आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याचे पेपर फुटतात तेव्हा या सगळ्या घटनांचा एकसमान धागा तो म्हणजे व्यवस्थेवरील विश्वासाचा र्हास होय. दुर्दैव याचं वाटतं, या सर्व घटना घडल्यानंतरही नाक खाजवलं तरी नकटं वरमायला तयार नाही. म्हणजेच इथली व्यवस्था, इथले सत्ताधारी पुन्हा उथळ माथ्याने आम्ही किती निष्कलंक हे दाखवण्याचा प्रयास करतात.
ना खाऊँगा ना खाणे दुँगा
पंतप्रधान नरेंद्र मोदींची ही गगनभेदी घोषणा. त्या घोषणेत एकाही भ्रष्टाचार्याला भाजप सोबत बसून घेणार नाही, हा दाखवलेला निश्चय गेल्या बारा वर्षांच्या कालखंडात अक्षरश: उघडा नागडा पडून गेलाय. ना खाऊँगा ना खाणे दुँगा पेक्षा भाजप व्यवस्थेतील सत्ताधारी केवळ खाऊँगा आणि खाऊँगा इथपर्यंतच मर्यादीत आहेत की काय? असे आता वाटू लागले आहे. जो कुणचा घोटाळा इथे उघडकीस येतो तिथे भाजपा संलग्न असलेल्या व्यक्तीचा फोटो सोशल मिडियावर व्हायरल होतो. दिल्ली तक्त संभाळणारे पंतप्रधान सर्वत्र लक्ष थोडेच देणार, ही भक्तांची गुळणी जेव्हा बाहेर फेकली जाते तेव्हा तक्त सांभाळणार्यांनी असे प्रकरण बाहेर आल्यानंतर कारवाई अपेक्षीत असते. मात्र घोटाळा आणि फोडाफोडीचे कितीही प्रकरण बाहेर आले तरी दिल्लीतक्त असो, या महाराष्ट्राचा सरकार असो, यात कारवाई होत नाही.
घर घर में है रावण इतने राम कहाँ से लाऊ
म्हणण्याची वेळ आता महाराष्ट्र मुलुखात नव्हेतर अखंड हिंदुस्तानातल्या वाडी-वस्ती-तांड्यावरच्या माणसांवर आली हे निश्चित. क्षेत्र कुठलेही असो त्या क्षेत्रात एखाद दुसरे नासके फळ असतेच. परंतु इथे प्रत्येक क्षेत्रच किडलेला निघतो तेव्हा देशवासियांवर हे राम! म्हणत तिरडी उचलल्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. गेल्या बारा वर्षांच्या कालखंडाला चापूनचोपून पाहितलं तर फुटीची लागण ही भारतीय जनता पार्टीच्या सत्तालालसीपणातूनच देशाला लागल्याचे स्पष्ट होते. एखाद्या राज्यात आपलं सरकार येत नाही तेव्हा राजकारणात सर्वकाही क्षम्य असतं, असं म्हणत ज्या पद्धतीने प्रादेशिक पक्ष फोडण्याचे नव्हे तर उद्ध्वस्त करण्याचे ध्येय-धोरण आखत भाजपाने फुटीच्या लागणीला नव्हेतर लावणीला 2014 नंतर सुरुवात केली. आजमितीला महाराष्ट्र असो वा अन्य राज्य असोत त्या राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष फोडले, आमदार-खासदार फोडले. ज्यांच्यावर भाजप भ्रष्टाचारी म्हणून आरोप करत होते, ते सर्व भाजपात पवित्र झाले आणि फोडाफोडी व फुटीला इमानदारीचे प्रमाणपत्र मिळाले.
यथा राजा तथा प्रजा
सत्ताधारी ज्या पद्धतीने देश चालवतील, राज्य चालवतील त्यांची वर्तवरूक ज्या पद्धतीची असेल, इमानदारीची असेल तर राज्यात इमानदारीचे वारे वाहील. बेईमानीचे वर्तन असेल तर राज्यात बेईमानीचे वारे वाहतील. जसा राजकारभार अथवा राजाची कार्यपद्धत असेल त्या पद्धतीने तेथील प्रजा, तेथील जनता ही काम करीत राहील. इथे दिल्लीतक्त आणि राज्यातील भाजपाचे नेतृत्व केवळ सत्ताकारणाचे गणित जुळवण्याहेतू विरोधकांना नेस्तनाबूत करून राजकीय खेळीच्या गोंडस नावाखाली बेईमानीचा दर्जा उंचावू लागले. तसे त्यांचे नुमाईंदे, बगलबच्चे अन् चमचे अन्य क्षेत्रात बेईमानीचा उच्चांक गाठू लागले. त्यात सर्वसामान्यही मग वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आघाडी घेत राहिले. परंतु सध्या क्षेत्रामध्ये बेईमानी होते ते शिक्षणासारखे पवित्र क्षेत्र आज अक्षरश: नागवं होतय. म्हणजे देशाचं भविष्य अन् तरुणाईचं भवितव्य अक्षरश: मरणयातना सहन करतय. इथे पेपर फुटणे हे नवं राहिलं नाही. गेल्या बारा वर्षांच्या कालखंडात वेगवेगळ्या क्षेत्रातले सत्तरच्या आसपास पेपर फुटीचे प्रकरण समोर आले. एवढे प्रकरण होत असताना पेपर फुटी अद्याप रोखता आलेली नाही.
खजिने को चोरों से नही,
रखवालदारो से डर
इस देश को दुश्मनों से नही, गद्दारो से डर है असं स्पष्ट म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. हा देश जगज्जेता होण्याचे स्वप्न पाहतो, तेवढी ताकद या अखंड हिंदुस्तानात आहे. जगाच्या पाठीवर सर्वात तरुण देश म्हणून या भारताकडे पाहितलं जातं, मात्र त्याच भारताच्या तरुणाईला अंतर्गत चोरी, डकैती आणि गद्दारीचे पाढे शिकवले जात असतील किंवा त्याच विद्यार्थ्यांसमोर सातत्याने फोडाफोडी, पेपर फुटीसारख्या गंभीर घटना होत असतील तर त्या विद्यार्थ्यांच्या, त्या तरुणाईच्या मनावर काय परिणाम होईल ? याचा विचार राजकारणी आणि सत्ताकारणात गुंतलेले तथाकथीत चाणक्य समजून घेत नाहीत हेस र्वात मोठे दुर्दैव. आमच्या खजिन्याला चोरांचा नाही तर रखवालदारांकडूनच धोका आहे हे फोडाफोडी आणि फुटीच्या घटनाक्रमावरून स्पष्ट होतय. या सर्व घटना पाहिल्यानंतर आणि अयोध्येतून आलेली बातमी पाहिल्यानंतर आता देशवासियांवर
हे राम!
म्हणण्याची वेळ नक्कीच आली आहे. अखंड देशवासियांचं स्वप्न साकार झाल्याचा डंका भाजपाने अयोध्येत मंदिर झाल्यानंतर पिटविला. राम भक्तांनी मंदिर उभारणीचा आनंदही उत्साहात साजरा केला. मात्र ज्या प्रभू रामांसाठी अयोध्येत मंदिर बांधण्यात आलं त्याच प्रभू रामाच्या मंदिरात सर्रासपणे भक्तांनी दिलेल्या दानाची चोरी होताना दिसते. दहा-पाच रुपये नव्हे हजार-पाचशे रुपये नव्हे, लाखात नव्हे तर कोट्यवधी रुपयांच्या दानाची चोरी राममंदिरात झाली. सीसीटीव्हीमध्ये ते स्पष्ट दिसले. जे कोणी राममंदिरात चोरी करत होते ते भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाशी संलग्न असल्याचे फोटो बाहेर आले. एकंदरीत हा सर्व फोडाफोडी, फुटी आणि दरोडा चोरी पाहिल्यानंतर सर्वसामान्यांचा तो कपाळमोक्ष नव्हे काय? कुठयत अच्छे दिन? ना खाऊँगा ना खाणे दूँगा या गगनभेदी घोषणेचं काय झालं? हे प्रश्नच आता अत्यंत बुळबुळीत झालेत. राजकारणात समाजकारणाची आणि सत्य बोलण्याची नितांत गरज असते. मात्र इथे भारतीय जनता पार्टी अत्यंत खोटारड्या पद्धतीने भाष्य करते. त्यामुळे भ्रष्टाचार करणार्यांचे इथे फावते. आता पाणी डोक्यावरून जातय. तेव्हा
रामकृष्ण हरी
आता तरी सत्ताधार्यांनी म्हणावं. सत्ताकारणाचा आलेख उंचावलाय, भ्रष्टाचार्यांना सोबत घेऊन स्वत:च्या वॉशिंग मशीनमध्ये त्यांना स्वच्छ केलय. अनेक राज्यांमध्ये भाजपाची सत्ता आहे, दिल्लीतक्त बळकट आहे, आता तरी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ होणार नाही, बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल, लोकांचे मुलभूत अधिकार लोकांपर्यंत पोहचले जातील यासाठी निर्णायक भूमिका, चोराला चोर आणि सावाला साव म्हणण्याचे धाडस सत्ताधार्यांनी करावे, तेव्हा कुठं इमानदार, रखवालदार या देशाच्या सुरक्षेसाठी निधड्या छातीने समोर येतील.आज प्रत्येक क्षेत्रात जो शब्द ऐकू येतो तो फुटी. पण फुटतंय नेमकं काय? पेपर, पक्ष की लोकांचा विश्वास? इथला सर्वसामान्य कर भरतो, मतदान करतो, नियम पाळतो, बदल्यात त्याला हवी असते सुरक्षितता, पारपदर्शकता आणि न्याय. परंतु जेव्हा वारंवार अशा घटना घडतात तेव्हा प्रश्न निर्माण होतो, चुका नेमक्या कुठे होत आहेत? जबाबदारी कोण स्वीकारणार? व्यवस्था ही घोषणांनी मजबूत होत नसते ती मजबूत होते कठोर अंमलबजावणीने, पारदर्शकतेने आणि दोषींवर नि:पक्षपाती कारवाईने. अन्यथा फुटी हा शब्द फक्त बातम्यांपुरता राहणार नाही, तो लोकांच्या मनातील विश्वासालाही कायम तडा देईल.











