गेवराई (रिपोर्टर) तालुक्यातील तलवाडा ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या रामनगर येथील रहिवासी असलेले फौजी जालिंदर बाबासाहेब नाकाडे (वय वर्षे 33) यांचे दि.21 रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले असून आज सकाळी 9:00 वा. रामनगर येथे शोकाकुल वातावरणात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला.
तलवाडा नजीक असलेल्या रामनगर येथील रहिवासी असलेले जालिंदर नाकाडे हे सन 2011 साली सैन्यदलात भरती झाले होते. आतापर्यंत त्यांनी 11 वर्षे देशसेवा केलेली असून गेल्या काही दिवसांपूर्वी दिल्ली येथील ईएमई बटालियन या तुकडीत ते कर्तव्यावर असताना तर आजारी पडले होते. यानंतर त्यांच्यावर पुणे येथील सैनिकी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. या उपचारा दरम्यान दि.21 रोजी त्यांचे दुःखद निधन झाले. दरम्यान आज सकाळी तलवाडा येथील रामनगर वस्ती येथे त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या दुःखद निधनामुळे रामनगर व तलवाडा परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात वयोवृद्ध आई-वडील, पत्नी, अपंग असलेला सात वर्षे वयाचा एक मुलगा, तीन बहिणी असा मोठा परिवार आहे. जालिंदर नाकाडे यांचे मोठे बंधू हे पण आर्मीमध्ये नौकरीला होते त्यांचे सात ते आठ वर्षांपूर्वी अपघातात निधन झालेले आसून नाकाडे कुटुंबावर अक्षरशः दुसर्यांदा हा दुःखाचा डोंगर कोसळला आसल्याने ग्रामस्थांसह अनेकांनी दुःख व्यक्त केले. तर उपस्थित प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी नाकाडे कुटुंबियांचे सांत्वन करत धीर दिला. या अंत्यविधीला तहसीलदार सचिन खाडे, सहायक पोलीस निरीक्षक प्रताप नवघरे व पोलीस कर्मचारी यांच्यासह तालुक्यातील सेवानिवृत्त ङ्गौजी, परिसरातील विविध क्षेत्रातील नागरिक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, नातेवाईक, ग्रामस्थांसह जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता. त्यांच्या या निधनाबद्दल तालुकभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.










