मुंबई (रिपोर्टर) गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात होणारे मोठे प्रकल्प इतर राज्यात गेले आहेत. सुरुवातीला वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेला होता. त्यानंतर टाटा एअरबसचा उ-295 लष्करी ट्रान्सफोर्ट एअरक्राफ्ट हा नागपूरमध्ये होणारा प्रकल्प देखील गुजरातमधील वडोदर्याला गेला आहे. अशातच आता आणखी एक नागपूरमध्ये होणारा प्रकल्प हैदराबादला गेला आहे. फ्रान्सची बहुराष्ट्रीय कंपनी सॅफ्रन ही विमान इंजन दुरुस्ती देखभालचा प्रकल्प नागपूरच्या मिहानमध्ये टाकणार होती. मात्र, हा प्रकल्प आता हैदराबादला गेला आहे. जमीन मिळवण्यास दिरंगाई झाल्यामुळं हा प्रकल्प हैदराबादला गेल्याची माहिती मिळत आहे. प्रकल्प जात असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोणाचे मिंदे झालेत? हा सवाल राज्यभरातून विचारला जावू लागला असून महाराष्ट्राला आर्थिकदृष्ट्या आणि बेरोजगारीदृष्ट्या नागवे करण्याचे धोरण कोण आखत आहेत?
विमान आणि रॉकेटचे इंजन बनवणारी फ्रान्सची बहुराष्ट्रीय कंपनी सॅफ्रनने महाराष्ट्रातून काढता पाय घेत आपला विमान इंजन दुरुस्ती देखभालचा प्रकल्प हैदराबादलामध्ये वळवला आहे. सॅफ्रन कंपनी नागपूरच्या मिहानमध्ये विमान इंजनाच्या देखभाल दुरुस्तीचा युनिट टाकणार होती. वर्षाला इथे 250 विमानांची इंजन दुरुस्ती व देखभाल केली जाणार होती. त्यासाठी कंपनीची 1 हजार 115 कोटींची प्राथमिक गुंतवणुकीची तयारी होती. या प्रकल्पाच्या माध्यमातून पाचशे ते सहाशे कुशल कामगारांना रोजगार मिळणार होता. मात्र, हा रोजगार आता गेला आहे. प्रशासकीय विलंबामुळे हा प्रकल्प हैदराबादला गेल्याची माहिती मिळत आहे. कंपनीचे सीईवो यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेऊन प्रकल्प हैदराबादला हलवण्याची माहिती दिली आहे. राज्यामध्ये पाण्याची उपलब्धता आहे. कुशल कामगार आहेत. उद्योगधंदे उभारण्यापासून चालण्यापर्यंत सर्वकाही आहे मग असे असताना महाराष्ट्रातून प्रकल्प बाहेर का जात आहेत? प्रकल्प जात आहेत की जाणीवपूर्वक महाराष्ट्राला आर्थिकदृष्ट्या नागवं करण्यासाठी आणि महाराष्ट्रातल्या तरूणांना बेरोजगार ठेवण्यासाठी जाणिवपूर्वक ते बाहेर नेले जात आहेत. याचा शोध लावण्यापेक्षा यामागे जो असेल त्यास जशास तसे उत्तर देणे महत्वपूर्ण असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मिंदे असल्यागत गप्प का आहेत? असा सवाल विचारला जात आहे.
विरोधकांचा राज्य सरकारवर हल्लाबोल
सत्तेच्या हव्यासापोटी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील वातावरण अस्थिर केलं असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला. 2014 नंतरच महाराष्ट्रावर वक्रदृष्टी का? असा सवालही लोंढे यांनी उपस्थित केला आहे. वेगळा विदर्भ करण्याच्या नावावर सत्तेत आलेले लोक, वेगला विदर्भ तर सोडाच पण विदर्भावर किती अन्याय करतात हा मोठा प्रश्न आहे. महाराष्ट्रात पाण्याची विजेची मुबलकता आहे. तसेच आपल्याकडे कौशल्य असलेलं मनुष्यबळ देखील उपलब्ध आहे, तरी प्रकल्प राज्याच्या बाहेर जात असल्याचे लोंढे म्हणाले. प्रकल्प राज्याबाहेर जाणे म्हणजे हा राजकीय करंटेपणा असल्याचे लोंढे म्हणाले. सत्तेच्या हव्यासापोटी महाराष्ट्राच्या जनतेचं सरकारनं नुकसान केल्याचे लोंढे म्हणाले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील सरकारवर टीका केली. महाराष्ट्रात जे काही चाललं आहे ते बघून दु:ख वाटत असल्याचे सुळे म्हणाल्या.