मराठा समाजाला ओबीसीमधून सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहेत. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज बीड शहरातील ज्येष्ठ नागरीकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. या वेळी कोणत्याही समाज घटकावर अन्याय न होता मराठा समाजाला सरसकट प्रमाणपत्र देण्यात यावे, अशा आशयाच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकार्यांना देण्यात आले.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या कित्येक वर्षांपासून आंदोलने होत आहेत. गेल्या तीन महिन्यांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले. या दरम्यान पोलिसांचा लाठीमार झाला. त्यानंतर हे आंदोलन अधिक तीव्र होत असून मनोज जरांगे पाटील यांचे आरक्षणविषयी जनजागरण हेतू राज्यात संपर्क दौरे सुरू आहेत. मराठा समाजातील आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक मागासपण दूर करण्यासाठी आरक्षण अधिक महत्वाचे आहे. त्यामुळे या लढ्याला आमचा पाठिंबा असल्याचे सांगत ज्येष्ठ नागरिकांनी एक दिवसाचं उपोषण सुरू केलं आहे. या वेळी राजमाता जिजाऊ समाज प्रबोधन मंडळ, बीडचे हरीश्चंद्र चव्हाण, जाधव साहेब, कुटे साहेब, सावंत साहेब, बळीराम सह शेकडो नागरीक उपस्थित होते.