बीड (रिपोर्टर): जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक यांनी आज गेवराई तालुक्यातील बागपिंपळगाव, रेवकी, तलवाडा, केकत पांगरी, जातेगाव आदी ठिकाणी चालू असलेल्या जलजीवन मिशनच्या कामांना तसेच रोजगार हमी योजनेमार्फत पांदणच्या रस्त्याच्या कामांना अचानक भेटी दिल्या. काही ठिकाणी अधिकार्यांना झापले तर काही ठिकाणी गुत्तेदारांना चांगले काम करण्याच्या सूचना देत बोगस कामे खपवून घेणार नाही, अशी सक्त ताकीद दिली.
आज सकाळपासून गेवराई पंचायत समितीचे अधिकारी, रोजगार हमी योजनेचे जिल्हास्तरीय अधिकारी, जलजीवन मिशनचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता यांच्यासह तालुक्यातील दहा गावांना मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक यांनी भेटी दिल्या. यामध्ये धारवंटा, चकलांबा, निपाणी जवळका, जातेगाव, केकतपांगरी, तलवाडा, रेवकी आणि बागपिंपळगाव या गावांचा सामवेश आहे. सुरुवातीला त्यांनी पंतप्रधान निवास योजना, मोदी आवास योजना, ओबीसी घरकुल योजना, रमाई घरकुल योजना या सर्व घरकुल योजनांची चालूस्थित असलेली कामे पंचायत समितीने उद्दीष्टानुसार पाठविलेले प्रस्ताव आणि मार्च 2023-24 पर्यंत ही सर्व घरकुले बांधून पुर्ण झाले पाहिजेत याबाबतचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी रोजगार हमी योजनेअंतर्गत जलसिंचन विहिरी, कामावर असलेल्या मजुरांचे फोटो अपलोड केले जातात का? या मजुरांची मजुरी, आधार लिंक असलेल्या खात्यानुसार होतेय का? पांदणमुक्ती रस्त्याचे कामे आणि जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेची गावाअंतर्गत असलेल्या समस्या आणि त्यांचे निराकरण यासह सर्व अधिकारी, लवाजम्यासह पाहणी केली. अनेक ठिकाणी जलजीवन मिशन योजनेअंतर्गतच्या कामांना आणि गावकर्यांना पिण्यासाठी या योजनेतून पाणी मिळायला पाहिजे, गुत्तेदारांनी हे काम करताना बोगस कामे न करता अंदाजपत्रकाप्रमाणे काम केले पाहिजे, अशी ताकीद जलजीवन मिशनच्या अधिकारी आणि गुत्तेदारांना दिली. त्यामुळे सीईओंच्या या अचानक दौर्यामुळे गुत्तेदार आणि शासकीय यंत्रणा मात्र अलर्ट झाली आहे.