दुकानदारांसोबत कार्डधारकांची होऊ लागलीय वादावादी
बीड (रिपोर्टर): आधीच दुष्काळाच्या छायेत असलेल्या बीड जिल्ह्यावर शासन-प्रशासन व्यवस्थाही दुजाभाव करत बीड जिल्ह्यातील जनता म्हणजे जनावरे आहेत, असे समजून पशुंनाही खाता येणार नाही, असा स्वस्त धान्य दुकानात आहार (धान्य) वाटपासाठी आले आहे. गव्हामध्ये प्रचंड कचरा, खडे, माती दिसून येत असून तांदळात तर प्लास्टीक तांदुळ आल्याची ओरड सर्वसामान्य करत आहेत. अत्यंत निकृष्ट दर्जाचे धान्य वाटप होत असल्याने सर्वसामान्यात संताप व्यक्त केला जात आहे. या पापाचे भागीदार कोण? असा थेट सवाल आम्हीच बीडच्या पुरवठा विभागाला विचारत आहोत. धान्यामध्ये भेसळ करणारे आणि सर्वसामान्यांच्या जीविताशी खेळणार्या लोकांचा शोध घेत निकृष्ट धान्य वापस घेऊन चांगले धान्य तात्काळ जनतेला द्यावे, अशी मागणी सर्वस्तरातून होत आहे.
पुरवठा विभागाचा अनागोंदी कारभार सुरुच असून या विभागाच्या कुठल्या ना कुठल्या तक्रारी येत असतात. राशनमधील तादंळात आता चक्क प्लास्टीकचा तांदुळ आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. एका ग्राहकाने हा तादुंळ निदर्शनास आणून दिला आहे. तांदळामधील भेसळीवरून कार्ड आणि दुकानदारात वादावादी होऊ लागलीय. ही भेसळ नेमकी कुठे होते? हा प्रश्न असून या बाबत पुरवठा विभागाला कसलेही गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. प्लास्टीकयुक्त तांदळाची भेसळ करणे हे आरोग्यासाठी प्रचंड धोकादायक असून याची गंभीर दखल जिल्हाधिकारी यांनी घ्यावी, अशी मागणी केली जात आहे.
सर्वसामान्य नागरिकांना अगदी कमी दरात राशन मिळावे यासाठी लोकसंख्येनुसा राशन दुकानदारांना मान्यता देण्यात आली, मात्र बहुतांश राशन दुकानदार काळाबाजार करत असल्याचे वेळोवेळी निदर्शनास आलेले आहे. हा काळाबाजार रोखण्यासाठी कुठलीही ठोस भूमिका प्रशासकीय पातळीवर घेण्यात येत नाही. राशनच्या काळ्या बाजारासह आता गहू, तांदळात भेसळ होऊ लागल्याचे दिसून येऊ लागले. तांदळामध्ये चक्क प्लास्टीक तांदुळ आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. एका कार्डधारकाने राशनवरून आणलेल्या तांदळाचे निक्षुण निरीक्षण केले असता त्या तांदळामध्ये प्लास्टीकचे तांदुळ आढळून आले. त्याची शहानिशासुद्धा करण्यात आली आहे. या भेसळीच्या प्रकारामुळे संबंधिताने राशन दुकानदाराकडे तक्रार सुद्धा केली मात्र त्या राशन दुकानदाराने वर हात केले. तांदळातील ही भेसळ गंभीर असून सदरील भेसळ नेमकी कुठे होते? याचा शोध जिल्हा प्रशासनाने घ्यायला हवा. काही वेळा तांदळात खडेसुद्धा भेसळ केले जातआहेत. दरम्यान पुरवठा विभागाला याबाबत गांभीर्य नाही. पुरवठा विभागाचे अधिकारी फक्त मलिदा लाटण्यात पुढे आहेत. भेसळीच्या बाबतची दखल जिल्हाधिकारी यांनी घेऊन तांदळातील ही भेसळ झाली कशी? याची चौकशी व्हायला हवी.