गणेश सावंत
सत्युग असो वा कलियुग राजकारणात आणि सत्ताकारणाच्या धोरणात पुत्रप्रेम कुणालाही चुकलेलं नाही. जिथं पुत्रप्रेमाचा उदो उदो झाला अन् पुत्र प्रेमातून राजकीय वारस ठरवला तिथं तिथं त्या राजकीय वारसाला वनवासाशिवाय काहीच मिळालं नाही. ते रामायणातही दिसून येतं आणि आजच्या महाराष्ट्राच्या राजकारणातील एका पक्षातही पहावयास मिळतं. प्रभू राम अयोध्येतील रयतेच्या गळ्यातील ताईत असले तरी प्रभू रामावर प्रेम होतं म्हणून राजा दशरथाने प्रभू रामाचा राज्याभिषेक करायचे ठरवले. तसे कैकयीच्या पुत्र प्रेमाने प्रभू रामाला वनवासाला जावे लागले. इथे राज ठाकरेंच्या हाती शिवसेना जाईल, असे वाटत असताना ती उद्धव ठाकरेंच्या हाती गेली आणि आज उद्धव ठाकरेंना वनवास भोगावा लागत आहे. सीता स्वयंवर होऊन सीतामाईसह प्रभूराम अयोध्येत आले, राम-सितेचा प्रेममय संसार अयोध्येत सुरू झाला. वर्षा मागून वर्षे जात होती, प्रजेत रामाविषयी प्रेम, आदर अधिक वाढत गेला. कारणही तसे होते. प्रभू राम हे प्रेमळ तर होतेच, आपल्या प्रजेबद्दल त्यांना आपुलकीही होती. जो राजा प्रजाहित पाहतो त्या राजाचे पाईक म्हणवून घ्यायला प्रजेला काहीच वाटत नाही. एकतर राम-सितेचा जोडा सुंदर आणि अयोध्येला प्रसन्न करून सोडणारा होता आणि दुसरे राजा दशरथ आता वृद्धापकाळाकडे झुकत होता. प्रभू रामाचा आणि प्रजेचा संपर्क जसा जसा वाढत गेला तशी तशी प्रजा प्रभू रामाला आपला राजा म्हणून पाहू लागली. राजकीय हेरा मार्फत ही माहिती दशरथ राजांपर्यंत गेली. आता आपलं वय झालं आहे आणि अयोध्येची रयत ही प्रभू रामाकडे राजा म्हणून पाहत आहे, तेव्हा कुतुहलाने महाराज दशरथांनी आरशात पाहिले तेव्हा मिशीबरोबर कानाजवळच्या केसांमध्ये पांढरे केस त्यांना दिसू लागले. तेव्हा महाराज दशरथांनाही आपण वृद्धापकाळाकडे झुकतोय, हे लक्षात आले तेव्हा महाराज दशरथ वचिष्ट मुनींकडे गेले आणि ते म्हणाले, रामाचा राज्याभिषेक करावा, असे मला वाटते. तुमची आज्ञा असेल तर मी राजसभा बोलवतो. महाराज दशरथांनी राजसभा बोलवली. राजसभेत एकमताने अनुमती देण्यात आली. आता उशीर नको म्हणत प्रभू रामाचा राज्याभिषेक उद्याच करायचे ठरवले. प्रभू रामाला बोलवण्यात आलं, तुला या सिंहासनावर बसवावे, अशी माझी इच्छा आहे. काल रात्री मला वाईट स्वप्न पडले, मला मृत्यूही दिसला, तेव्हा मला वाटते की, तुझा राज्याभिषेक व्हावा. त्या स्वप्नात
एका पुत्राचे प्रेम दुसर्या बाबत शंका
महाराज दशरथांना वाटू लागले. प्रेम होते ते प्रभू रामांबद्दल आणि शंका होती ती भरताबाबत. भरत सध्या दूरवर त्याच्या अजोळी आहे. हेही चांगलेच. भरताची सद्बुद्धी आणि सद्वर्तन याबद्दल आपल्याला शंका नाही, परंतु पद, पैसा, प्रसिद्धी, पदवी आणि पोरगी याबाबत माणसाची मने केव्हाही बदलतात. त्यामध्ये पद, पैसा आणि सत्ताकारणाचा विषय असेल, तर माणूस माणसात राहत नाही, भाऊ भावात राहत नाही. याची आज जेवढी शाश्वती देता येत नाही तेवढी त्या काळातही देता आली नसल्याचे आपल्याला यातून जाणवते. राजा दशरथाने प्रभू रामाचा राज्याभिषेक करणे ठरवले होते. तशा हालचाली सुरू झाल्या होत्या. राज्याभिषेक दुसर्या दिवशी होणार ततपूर्वी वचिष्ट रामाकडे आले, त्यांनी प्रभू रामाला मंत्र शिकवला. राज्याभिषेकापुर्वी उपवास करण्याचे सांगितले. या राज्याभिषेकाची माहिती हा हा करता अयोध्ये नगरीमध्ये पसरली. सर्वत्र आनंदकल्लोळ उडाला, जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. मनातला राजा साक्षात सिंहासनावर दिसणार असल्याने अयोध्या नगरीची प्रजा सुखावली. इकडे प्रभू रामाने सहपत्नी नारायणाचे चिंतन केले. अग्निला तुप अर्पण केले. रात्री ते जमीनीवर पसरवलेल्या गवतात निजले. वाल्मिकींना भविष्य माहित होते की काय? भविष्यात जणू प्रभू रामाला वनवासामध्ये असेच दिवस काढावे लागतील, तो दिवस राज्याभिषेकाच्या आदल्या दिवशी उपवासासह सर्व ऐशोआराम त्या दिवशी बाजुला ठेवण्यात आले. राजवाड्यातून अवघ्या देशाला आणि अन्य देशांच्या राजांना निमंत्रण गेले आणि इथेच सत्ताकारणातले सर्वात मोठे विघ्न
मंथरा चर्चेत
जिथं कुठं सत्ताकेंद्र प्रस्थापीत करण्या हेतू ब्लॅकमेलिंगसारखी खेळी खेळली जाते तिथे तिथे रामायणातले मंथरेची आठवण आल्याशिवाय राहत नाही. ही मंथरा कोण ? राजा दशरथाच्या तीन राण्यांपैकी एक असलेली कैकयी हिची दासी. विशेष म्हणजे वाल्मिकींनी मंथरेचं रेखाटन असं केलं आहे की, दिसायला ती कुरुप, कुबडी, परंतु तिच्या मंथरलेल्या कान मंत्राने अवघे रामायण घडले ते चीरतरुण ठरले. एखाद्या चित्रपटामध्ये जेवढा मोठा खलनायक असतो त्या खलनायकाचे पात्र जेवढे रंजक रेखाटले जाते, तेवढाच नायक हा भाव खावून जातो. इथेही असंच आहे. ज्या प्रभू रामाचा राज्याभिषेक होणार असतो, उद्या ते अयोध्येच्या सिंहासनावर स्थानापन्न होणार असतात मात्र तत्पूर्वी जी पौर्णिमेची रात्र असते ती केवळ मंथरेमुळे अमावश्याची रात्र बनते. (क्रमश:)