टीसीएस, आयबीपीएस कंपनीवर गुन्हे दाखल करा; तलाठी भरती परिक्षा रद्द करून लोकसेवा आयोगामार्फत भरती करा
बीड, (रिपोर्टर)ः- तलाठी भरतीमध्ये गैर प्रकार उघडकीस आल्याने परिक्षा दिलेल्या विद्यार्थ्यामध्ये संताप व्यक्त केला जात आहे. कुठल्याही परिक्षेमध्ये कोप्यांचा गैर प्रकार आणि वशीलेबाजी समोर येवू लागल्याने परिक्षेची तयारी करणार्या विद्यार्थ्याना परिक्षा द्यावी की नाही असाच प्रश्न पडू लागला. कोणतीही परिक्षा पारदर्शक घेण्यात यावी. तलाठी भरतीतील दोषी विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी आज तरूणांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला होता. हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघाला होता. या मोर्चाने नगर रोड दणाणून गेला होता. विद्यार्थ्यानी शासनाच्या विरोधात प्रचंडप्रमाणात घोषणाबाजी करत आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
राज्यामध्ये सध्या वर्ग 3 आणि वर्ग 4 या पदासाठी लेखी परिक्षा घेण्याचे कंत्राट आयबीपीएस आणि टीसीएस या कंपन्यांना दिलेले आहे. या कंपनीच्या वतीने राज्य भरात या परिक्षा घेतल्या जातात. तलाठी परिक्षा ही नुकतीच घेण्यात आली. त्याच्यामध्ये कंपनीच्या कर्मचार्यांच्या नातेवाईकांची नावे उत्तीर्ण उमेदवारांच्या यादीमध्ये आहेत. महाराष्ट्रातील चंद्रपुर परिक्षा केंद्रामधील या तलाठी भरती परिक्षेमध्ये उत्तीर्ण उमेदवारांच्या यादीमधील पहिले 1 ते 54 विद्यार्थी हे याच एका परिक्षा केंद्रावरील आहेत. 200 मार्क पैकी काही विद्यार्थ्याला तर या कंपनीने चक्क 209-204 असे मार्के दिलेले आहेत. त्यामुळे या कंपनीने लाखोंची उलाढाल करत या तलाठी भरतीच्या परिक्षेमध्ये घोटाळा केला हे सिध्द होत आहे. तरीही सरकार ही परिक्षा रद्द करत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील आणि शहरातील हजारो युवक आज रस्त्यावर उतरले होते. या परिक्षा पध्दतीमध्ये घोटाळा झाल्याचे पुरावे राज्य सरकारला दिलेले असतांनाही सरकार या कंपन्यांना का पाठीशी घालत आहे असाही सवाल या आंदोलन कर्त्यानी केला आहे. विद्यार्थ्याची संख्या पाहता सरकारला नक्कीच लवती घ्यावी लागेल. सदरचे आंदोलन हे स्पर्धा परिक्षा समन्वय समितीच्या वतीने राहुल कवठेकर, राहुल कांबळे, धनंजय गुंदेकर, पंडित तुपे, प्रा.मगर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला होता. या मोर्चात शेकडों विद्यार्थ्याचा सहभाग होता.