बजरंग सोनवणेंना गेवराईतून लीड देणार -बदामराव पंडित
जिल्ह्यातील सर्व जाती धर्माचे लोक माझ्या पाठिशी -बजरंग सोनवणे
गेवराई (रिपोर्टर): बजरंग सोनवणेंच्या पराभवासाठी देशाच्या पंतप्रधानांना जिल्ह्यात यावं लागतं इथेच आपला विजय आहे. बजरंग सोनवणे आता निवडून येणार ही काळ्या दगडावरची पांंढरी रेघ आहे. विरोधक बप्पांवर खोटेनाटे आरोप करतात, स्वत: मात्र धुतल्या तांदळासारखे वागतात. गेल्या दोन वर्षांच्या कालखंडात भाजपाने दमदाटी करून राष्ट्रवादी पक्ष फोडला. आमचे सहकारी विकासासाठी नव्हे तर भीतीपोटी त्यांच्या बाजुने जावून बसले. भाजपाला विकासाचे काही देणेघेणे नसून ते केवळ राजकारणासाठी पक्ष फोडत असल्याचे सांगत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपाला सुनावले. देशावर कर्ज वाढत आहे, येणार्या काळात हे सरकार आलं तर देशाची श्रीलंकेसारखी परिस्थिती होईल. कापूस, सोयाबीन, कांदा याची निर्यातबंदी करून सरकारने शेतकर्याला अडचणीत आणले आहे. एकीकडे महागाई, बेरोजगारी वाढत असताना दुसरीकडे भाजप पक्ष फोडण्यात व्यस्त असल्याचे जयंत पाटलांनी म्हटले. तर दबंग खासदाराला जिल्ह्यातील गावांची माहिती आहे का? असा सवाल उपस्तित करून उमेदवार बजरंग सोनवणेंनी जिल्ह्यातील सर्व जाती-धर्माची जनता आपल्या पाठिशी असल्याचे म्हटले.
गेवराई येथे महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ जाहीरसभेचे आयोजन केले होते. या वेळी व्यासपीठावर राजेश टोपे, बजरंग सोनवणे, बदामराव पंडित, उषाताई दराडे, सुरेश नवले, संदीप क्षीरसागर, सय्यद सलीम, पुजा मोरे, महेबूब शेख, धम्मपाल कांडेकर, महेश बेदरे, अजय दाभाडे, दिलीप गोरे, हेमाताई पिंपळे, दीपक केदार, श्रीनिवास बेदरे, मोहन जाधव, अजिंक्य चांदणे, युद्धजीत पंडित, अण्णासाहेब राठोड, रोहीत पंडित, राजेंद्रे बेदरे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, भविष्यात देशामध्ये मोदींचे सरकार आले तर या देशाची परिस्थिती श्रीलंकेसारखी भयावह होईल. मोदी सरकारकडून मोठ्या प्रमाणावर करवसुली सुरू केली. इथे खाण्यापिण्याच्या वस्तूवर कर भरावा लागत आहे. हे सरकार देशातील जनतेचे पाकिट मारत आहे. निवडणुका झाल्या की, गॅस, डिझेल, पेट्रोलच्या किमतीही वाढल्याशिवाय राहणार नाही. इंडिया आघाडी सरकार सत्तेत आल्यावर हे सर्व कर मागे घेतले जातील, त्यासाठी आता परिवर्तनासाठी मागे हटू नका. महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्या, आताची परिस्थिती पाहिली तर तुम्ही सर्व बजरंग सोनणे यांच्यासाठी दिवसाची रात्र करत आहात. बजरंग सोनवणे निवडून येणार हे काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होत आहे, असेही जयंत पाटील यांनी म्हटले. आता मोदी सरकारला गाडण्यासाठी आणि स्वाभिमान जागवण्यासाठी बजरंग बप्पाला संसदेत पाठविण्याचे आवाहन जयंत पाटील यांनी केले तर बजरंग सोनवणे यांनी आज कोणी कुठल्याही पक्षात असले तरी या निवडणुकीत जिल्ह्यातील मतदार बांधव हे माझ्या सोबत आहेत. गेवराई मतदारसंघातील जनतेने माझा प्रचार हाती घेतला आहे. गावागावात लोक भेटतायत, ते सांगतात, बप्पा तुम्ही बाकी जिल्ह्यात फिरा, माझ्यासारख्या शेतकरी पुत्राला एवढं प्रेम मिळतं मी भाग्यशाली आहे. गेवराई तालुक्याच्या हद्दीत एक कोटी सापडले, ते कुणाचे? भाजपाने उत्तर द्यावे. असेही सोनवणे यांनी म्जहटले. पन्नास वर्षापासून बीड जिल्ह्यावर सत्ता गाजवणार्या या घराण्याने जिल्ह्यासाठी कुठलेच कामे केले नसल्याचे म्हटले. तर देशात सर्वत्र महागाई, बेरोजगारी वाढत आहे. शेतकरी अहचणीत आहे परंतु मोदी सरकार जातीपातीचे राजकारण करत आहे. म्हणून आज परिवर्तनाची गरज आहे. त्यामुळेच सर्वसामान्य बजरंग सोनवणेंच्या पाठिशी आहे. उद्याच्या निवडणुकीत बजरंग सोनवणेंना दोन लाकांच्या पुढे लिड घेऊन सर्वोच्च सभागृहात आपण पाठवणार आहोत. गेवराई मतदारसंघातून सर्वाधिक लीड देणार असल्याचे माजी मंत्री बदामराव पंडितांनी म्हटले.










