दुपारचे जेवण आकेगावात तर रात्रीचा मुक्कामी तळ बारा बाभळगावच्या दीडशे एक्करवर, महिलांकडून जरांगेंना कडे, आज पदयात्रेचा पुढाकार महिलांकडे
गेवराई/पाथर्डी (रिपोर्टर): आरक्षण फत्तेच्या मोहिमेवर निघालेल्या मराठ्यांनी आज भल्या सकाळीच बीड जिल्ह्याची शिव सोडत नगर जिल्ह्यात प्रवेश केला. अहमदनगरच्या मिडसांगवी येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासह आंदोलकांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. या वेळी पाथर्डीसह नगर जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने मराठे त्याठिकाणी उपस्थित होते. नगरचे जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा या भागात तैनात करण्यात आला असून विशाखापट्टणम महामार्गावर केवळ मराठ्यांचं भगवं वादळ पहावयास मिळत होतं.
मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यात यावे, ओबीसींमधून कुणबी प्रमाणपत्र तात्काळ दिले जावेत, या मागण्यांसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आरक्षण फत्तेच्या मोहिमेवर निघालेल्या मराठ्यांचा मुक्कामी तळ मातोरी आज सकाळी सोडला आणि ते अहमदनगरच्या दिशेने मुंबईला कूच करण्यास निघाले. सकाळी 10 वा.च्या सुमारास मराठ्यांनी बीड जिल्ह्यघाची शिव सोडली आणि नगर जिल्ह्यात त्यांनी पाऊल ठेवले. मराठा आंदोलक जरांगे यांच्यासह लाखो मराठ्यांच्या स्वागतासाठी अहमदनगर जिल्ह्यातल्या मिडसांगवी येथे नगर जिल्ह्यातील मराठ्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला यांच्यासह मोठा फौजफाटा जिल्ह्यात सुरक्षेच्या दृष्टीने तैनात करण्यात आला असून आज दुपारचे जेवण हे आकेगाव येथे आहे तर संध्याकाळचा मुक्कामी तळ हा अहमदनगर येथील नगर-पाथर्डी महामार्गावरील बारा बाभळी येथे असून त्याठिकाणी दीडशे एक्कर मैदानावर या मोर्चातील आंदोलकांचा मुक्काम राहणार आहे. सायंकाळी 5 च्या दरम्यान जरांगे यांची सभा होणार आहे. त्याठिकाणी जेवणासाठी स्टॉल, पिण्याच्या पाण्याची सोय आदी व्यवस्था करण्यात आली आहे. आज महिलांनी जरांगे पाटील यांच्या बाजुला कडे करून पदयात्रा पुढे नेण्यासाठी पुढाकार घेतल्याचे दिसून येत होते.