बीड (रिपोर्टर): कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी आत्महत्याचे सत्र सुरुच आहे. गेल्या वर्षभरात 268 शेतकर्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. यावर्षीच्या पहिल्या महिन्यात 18 शेतकर्यांनी आपले जीवन संपवले. आज सकाळी रुईगव्हाण येथील एका शेतकर्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. शेतीमध्ये योग्य उत्पादन निघत नसल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. दरम्यान शेतकरी आत्महत्यांची संख्या वाढत असतानाही केेंद्र आणि राज्य सरकार याबाबत कुठलेही ठोस पाऊल उचलत नसल्याचे दिसून येत आहे. शेतीचा अगदी मसनवाटा होत आहे.
मराठवाड्यामध्ये सर्वाधिक शेतकरी आत्महत्येच्या घटना घडत आहेत. कर्जबाजारीपणा, नापिकी आणि शेती मालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडतात. दरवर्षी बीड जिल्ह्यात 268 शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत. नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात 18 शेतकर्यांनी आत्महत्या केल्याची नोंद करण्यात आली. बीड तालुक्यातील रुईगव्हाण येथील हरीदास देवीदास घुरे या शेतकर्याने आज सकाळी सात वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली. या शेतकर्याला दोन एकर जमीन आहे. जमीनीमध्ये योग्य उत्पादन निघत नसल्याने सदरील शेतकरी कर्जबाजारी झाले होते. यातूनच त्याने आज सकाळी टोकाचे पाऊल उचलले. घटनास्थळी संबंधित ठाण्याचे पोलीस दाखल झाले होते. दरम्यान राज्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र थांबता थांबेना. दररोज तीन ते चार शेतकरी आत्महत्या करतात. केंद्र आणि राज्य सरकार चुकीच्या पद्धतीने शेतीचे धोरण राबवत असल्याने शेतकर्यांसाठी शेती ही मरण ठरू लागली. पुर्वी विदर्भामध्ये सर्वाधिक आत्महत्या होत होत्या आता मात्र मराठवाड्यात सगळ्यात जास्त आत्महत्या होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.