जिथं राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्व दिलं जातं तिथं पद, पैसा, प्रसिद्धीपेक्षाही अधिक आपले पणाचं नातं समाजामध्ये जोडलं जातं. राजकारण हा एक विचार असू शकतो. परंतु समाजकारण हे माणूस म्हणून जन्माला आलेल्याचं देणं असतच. म्हणूनच जो कोणी समाजकारणाला अनन्यसाधारण महत्व देतो त्याला घरापेक्षाही अधिक मौल्यवान असे माणसे भेटतात आणि तेच माणसे भविष्यात त्या व्यक्तीची एक शक्ती बनते. तशीच माणसांची शक्ती दिलीप धूत पिता-पुत्रांच्या पाठिशी उभी असल्याचे काल निदर्शनास आले. कुठलेही राजकीय पद नाही, की कुठल्या राजघराण्याचा वारसा नाही. मात्र तरीही सोसायटीच्या सदस्यांपासून ते आमदार-खासदार मंत्र्यांपर्यंत सर्वसामान्य माणसापासून ते श्रीमंतापर्यंत एक ना एक सर्व क्षेत्रातले लोक दिलीप धूत यांचे पुत्र शुभम धूत व मंजु मुंदडा यांच्या साखर पुड्याप्रसंगी उपस्थित राहिल्याने धूत पिता-पुत्राने जमवलेला हा माणसाचा नव्हे तर माणुसकीचा गोतवळा सर्वांना आश्चर्यचकित करून सोडणारा होता. येणार्या प्रत्येक व्यक्तीला गुलाबाचं फुल आणि मोत्यांची माळ घालून स्वागत करण्यात आले. त्या स्वागतात राजा-रंक, गरीब-श्रीमंत एकाच पंक्तीत पहावयास मिळाले.
राज फाऊंडेशनचे सर्वेसर्वा दिलीप धूत यांचे सुपुत्र शुभम धूत आणि हिंगोली येथील मुंदडा यांची कन्या मंजु यांचा काल साखरपुडा अत्यंत थाटात संपन्न झाला. धूत ज्या समाजातून येतात त्या समाजात जे काही कार्यक्रम होतात ते अत्यंत चौकटीत आणि शिस्तबद्ध असतात. कालचा शुभम याचा साखरपुडा चौकटीत आणि शिस्तबद्ध असला तरी धुतांचा गोतवळा आश्चर्यकारक म्हणावा लागेल. पाच-पंचेवीस एकरच्या मोकळ्या मैदानात शाही मंडप टाकून हा कार्यक्रम काल मोठ्या उत्साहात साजरा झाला. मात्र राज्याच्या राजकीय सारीपाटावर बीड जिल्ह्याला अनन्यसाधारण महत्व नेहमीच असते. त्यामुळे बीड किंवा जिल्ह्यामध्ये जे काही लक्षवेधक कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमातून भविष्याच्या राजकीय जडणघडणीची पेरणी तर नव्हे, अशी शंका नेहमी घेतली जाते आणि त्या दिशेने पाहितलेही जाते. काल धूत यांच्या कार्यक्रमासाठी जे काही अबालवृद्ध आणि सर्वच जात-पात-धर्म-पंथातले लोक उपस्थित होते ती उपस्थिती राजकीय चष्म्यातून पाहण्यापेक्षा धुतांच्या दांडग्या संपर्काचा चढता आलेख सांगणारीच. कोण नव्हते कार्यक्रमाला… नेते होते, पुढारी होते. पदाधिकारी होते. व्यापारी होते, पत्रकार होते. डॉक्टर, वकील तर होतेच होते, परंतु मोठ्या शोरुमपासून ते गाड्यांवर व्यवसाय करणार्या शेवटच्या माणसापर्यंत व्यावसायिकही निमंत्रित होते. आठ दहा माजी मंत्री, पाच-पंचेवीस आजी-माजी आमदार-खासदार, जि.प. अध्यक्ष, पं.स. अध्यक्ष, सदस्य न.प. अध्यक्ष सदस्य, शेकडो आजी-माजी सरपंच, ग्रा.पं. सदस्य, सोसायटीचे सदस्य अन् सर्वच क्षेत्रातला छोट्यातला छोटा आणि मोठ्यातला मोठा माणूस त्या कार्यक्रमाला उपस्थित होता. विशेष होते, येथे पंक्तीभेद पहायला भेटला नाही. अतिथी देवोभव म्हणत प्रत्येक जण एकाच पंक्तीत होता. स्वागत-सत्कारही प्रत्येकाचा जशास तसा झाला. पाच ते सात हजाराच्या घरातला हा साखरपुडा चांगलाच चर्चेत राहिला आणि त्यातले
गुलाब का फुल मोतीयों की माला
हे स्वागताचे प्रतिक बहुचर्चित राहिले असले तरी त्या मागचं गुपित काय असेल यावरही कार्यक्रमानंतर चर्चा झाली. धूत पिता-पुत्रांनी आज गुलाब का फुल आणि मोतियों की माला देत सर्वांचेच स्वागत सत्कार केले मात्र हेच गुलाबाचं फुल आणि मोत्यांची माळा आगामी निवडणुकांमध्ये धूत पिता-पुत्र कुणाच्या गळ्यात घालतील यावरही चर्चा होऊ लागली. कारण बीड शहरासह मतदारसंघातल्या प्रत्येक गावातला माणूस काल तिथे उपस्थित होता. आणि त्या माणसाच्या दिमतीला धूत पिता-पुत्र विनम्रतेने हात जोडून उभा होते. शुभम आणि मंजुच्या साखर पुड्याच्या गुलाबाचे चर्चेने मोती झाले हे मात्र खरे.