बीड – शरद पवार हे नाव म्हटलं की आठवतो यशवंतराव चव्हाण यांचा समर्थ वारसा, शिव, शाहु, फुले, आंबेडकर यांचा विचार आणि महाराष्ट्राचे पुरोगामीत्व! पण कधी कधी शरद पवार साहेब हे बोलत बोलत सेल्फ गोल करून जातात आणि त्यांच्यावर आपले वक्तव्य माघारी घेण्याची वेळ येते, असे प्रसंग त्यांच्या राजकीय जीवनात अनेकदा येऊन गेलेत. मग माघार, मी तसे म्हणलोच नाही, माझ्या वक्तव्याचा विपर्यास झाला, वगैरे स्पष्टीकरणे त्यांच्या आजूबाजूच्या वतीने केली जातात व सारवासारव केली जाते.
पवार साहेबांची महाराष्ट्राच्या व राष्ट्रीय राजकारणात जी उंची आहे त्या उंचीला स्वतःच्याच हाताने खुजे करण्याचा एक प्रकार काल घडला व उभ्या महाराष्ट्राने तो पाहिला. एका मुलाखती दरम्यान धनंजय मुंडे यांनी बारामतीच्या प्रचार सभेत शरद पवार यांच्यावर केलेल्या राजकीय टिकेबद्दल प्रश्न विचारताच शरद पवार अत्यंत भडकले आणि द्वेषाने म्हणाले, ‘ज्यांच्याबद्दल तुम्ही बोलत आहात त्यांची लायकी नाही. एका छोट्या घराण्यातून व लहान समाजातून आलेल्या एका उदयोन्मुख तरुणाला मी संधी दिली. अनेकांची पक्षात नाराजी असताना मी त्यांना विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते पद दिले आणि आज ते माझ्यावर वैयक्तिक हल्ले करत आहेत. त्यांचे अनेक उद्योग आहेत, अनेक प्रकरणांमधून मी त्यांना बाहेर काढले. त्याची जर यादी दिली तर त्यांना महाराष्ट्रात फिरण मुश्किल होईल’!
हे बोलत असताना लायकी, लहान समाज (छोटी जात), फिरणं मुश्किल होईल, हे बोलताना पवार साहेबांच्या चेहऱ्यावरचे हावभाव, त्वेष आणि राग पाहण्यासारखा होता! आज धनंजय मुंडे अजित पवारांच्या नेतृत्वात दुसरीकडे गेले म्हणून हा त्वेष असावा, मात्र तो त्वेष स्वतःच्या पुतन्याविरुद्ध आजवर दिसला नाही, हे विशेष! मग आपला तो बाबू आणि लोकांचं ते कार्ट हा न्याय कशासाठी? मुळात पवार साहेब ज्या पुरोगामी विचारांचा वारसा सांगतात त्या विचारसरणीस आपल्या पेक्षा अर्ध्या वयाच्या तरुणाची केवळ तो आपल्या विरोधात गेला म्हणून जात आणि लायकी काढणे, फिरू देणे मुश्किल होईल अशा धमक्या देणे हे किती शोभणारे आहे? संख्येने किंवा शक्तीने लहान वाटत असेल तर वंजारी समाजात जन्मलेले गोपीनाथराव मुंडे यांचे फोटो आजही तुमचे सहकारी असलेल्या निलेश लंकेना निवडणुकीत का हवेसे वाटतात? धनंजय मुंडे यांची लायकी नव्हती तर 10 वर्ष पक्षाची प्रत्येक यात्रा प्रत्येक संघर्षात धनंजय मुंडे आघाडीवर का होते? 2018 साली नाशकात याच धनंजय मुंडेंचा शरद पवारांनी राज्यातील कार्यक्षम आमदार म्हणून पुरस्कार देऊन गौरव केला होता, तो आज अमान्य आहे का? धनंजय मुंडे यांची विरोधीपक्ष नेता म्हणून असलेली कारकीर्द जिचा उल्लेख पवार साहेबांच्या ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्रात देखील आढळतो, तो खोटा होता का? धनंजय मुंडे यांच्यात राज्याचे नेतृत्व करण्याची धमक आहे, हे आपण जाहीरपणे सांगितले होते, ते आता लायकी काढण्यावर येऊन ठेपले? मुळात पवार साहेबांच्या प्रतिमेला हे शोभणारे नाहीच! आजही अनेक जण पवार साहेबांचे मार्गदर्शन घेतात. परंतु पवार साहेबांनी भावनेच्या भरात केलेले वक्तव्य हे सेल्फ गोल ठरणार आहे. वंजारी समाज अल्पसंख्याक नाही. लोकसंख्या जरी मर्यादित असली तरी सुमारे 50 मतदारसंघात हा समाज मोठा प्रभाव पाडू शकतो, तेवढे आमदार सध्यातरी पवार साहेबांना एकट्याने निवडून आणणे सुद्धा दुरापास्त आहे. याही उपर सध्याच्या वातावरणात एका संपूर्ण जातीला हिणावणारे वक्तव्य करून पवार साहेबांना नक्कीच आपला मतदार सुद्धा गमवावा लगेल, याची शक्यता नाकारता येत नाही. या सगळ्याच गोष्टींचा सारासार विचार केला तर पवारांच्या लक्षात येईल की आपला सेल्फ गोल झाला आहे. सध्या वंजारी समाजात व धनंजय मुंडे यांच्या समर्थकांमध्ये पवारांच्या या वक्तव्यावरून प्रचंड नाराजी दिसून येत आहे. एका मागास भटक्या जातीतील नेत्याचा अपमान पवारांना नक्कीच महाग पडणार, असे चित्र आहे. तेव्हा पुन्हा एकदा मी असे म्हणलोच नाही, असे म्हणत आपल्या वक्तव्यावरून पलटी मारायला पवार साहेबांना संधी आहेच!