दिल्ली (वृत्तसेवा): 15 मार्चच्या नंतर 2024 च्या लोकसभा निवडणुकीची घोषणा होणार असल्याचा अंदाज बांधत असतानाच आज सर्वोच्च न्यायालयाने इलेक्ट्रॉल बॉन्ड संदर्भात स्टेट बँकेला झापल्यानंतर इकडे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. 13 किंवा 14 तारखेला केंद्रीय निवडणूक आयोगाची महत्वपूर्ण बैठक होत निवडणूक आयुक्तांची नियुक्ती केली जाईल आणि 15 मार्चला लोकसभा निवडणुकीची घोषणा होणार असल्याचे विश्वसनीय सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. अवघ्या चार दिवसांवर आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने राज्य सरकारने हरकतमध्ये येत जीआर काढण्याचा सपाटा सुरू ठेवला आहे.
15 मार्च रोजी केेंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक होऊन दोन निवडणूक आयुक्तांची निवड करण्यात येणार होती, मात्र आज सर्वोच्च न्यायालयाने इलेक्ट्रॉल बॉन्ड संदर्भात स्टेट बँकेला झापून उद्याच्या उद्या माहिती देण्याचे निर्देश दिल्याने इकडे राजकीय घडामोडीत त्या निर्देशाचे पडसाद उमटले आहेत. जी केंद्रिय निवडणूक आयोगाची बैठक 15 मार्चला होणार होती ती आता 13, 14 ला होण्याची शक्यता असून या दिवशी निवडणूक आयुक्तांची नियुक्ती केली जाणार आहे. लागलीच 15 मार्च रोजी 2024 च्या लोकसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे. 2019 साली 10 मार्च रोजी निवडणुकीची घोषणा झाली होती आणि देशात सात टप्प्यात निवडणुका घेण्यात आल्या होत्या. या वेळेसही सात टप्प्यात निवडणुका घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. केंद्रिय निवडणूक आयोग देशातील वेगवेगळ्या राज्यांची परिस्थिती पाहून त्या त्या टप्प्यात त्या त्या राज्यांत घेणार आहे.
आचारसंहितेमुळे राज्य सरकारचे जीआरवर जीआर
अवघ्या चार दिवसांवर लोकसभा निवडणुकीची घोषणा आणि आचारसंहिता लागणार असल्यामुळे राज्य सरकार आपल्या वेगवेगळ्या कामांचे जीआर पटापट काढून घेत आहे. आज एसबीआयला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले आणि उद्याच्या उद्या इलेक्ट्रॉल बॉन्ड सादर करण्याचे आदेश दिचल्याने राज्य सरकारमध्येही हालाचाली वाढल्या. पुर्ण पेंडिंग कामे मार्गी लावण्यासाठी मंत्र्यांच्या कॅबिनमध्ये पळापळ सुरू झाली.