गणेश सावंत -9422742810
‘अब की बार चारसौ पार’ ची भीम गर्जना करत 2024 च्या लोकसभा रणांगणात उतरलेल्या भाजपाला महाराष्ट्राच्या आखाड्यात मात्र आपल्याच मल्लांना बळच लंगोट बांधण्याचा प्रयत्न केला जातोय. इच्छा नसताना ‘इच्छाधारी’कडून विरोधकांना मसल्स दाखविण्या हेतू महाराष्ट्रातल्या मातब्बरांना थेट दिल्ली तक्ताच्या सेवेसाठी बोलवण्यात येत असल्याने हे महाराष्ट्रातले मातब्बर उमेदवारी मागण्यासाठी नव्हे तर उमेदवारी कापण्यासाठी प्रयत्नांची परीकाष्ठा करीत आहेत. सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, नारायण राणे, गिरीष महाजन, विनोद तावडे हे महाराष्ट्रातल मातब्बर सरदार लोकसभेसाठी मात्र आपले शस्त्र म्यान करू पाहत असून काहींनी थेट आपण उमेदवारी कापण्यासाठी प्रयत्न करत असल्यचे वक्तव्य केले आहे तर काहीजण आपल्यापेक्षा दुसरा उमेदवार किती सरस हे दाखवू पाहत आहे. या मातब्बरांची तिकिट कापण्याची चढाओढ पराभवाच्या भीतीने आहे की, महाराष्ट्रात अधिराज्य गाजवणे आहे हे ज्यांना त्यांना उमजत असले तरी या मातब्बरांच्या नकारात्मक भावनेची उर्जा मात्र भाजपाच्या महाराष्ट्रातील परिस्थितीची शोकांतिका दाखवत असल्याचे दिसून येते.
शेतात काय पिकतय यापेक्षा बाजारात काय विकतय हे धोरण अवलंबणारे भाजप महाराष्ट्रात फारसे लोकांच्या मनी अनुकुल दिसत नाहीत. गेल्या पाच वर्षांच्या कालखंडात महाराष्ट्रात झालेले तीनदा सत्तांतर. स्वत:चे आमदार जास्त असताना सत्ता मात्र दुसर्याच्या हाती. सत्तेसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीत पाडलेली उभी फूट मराठा आणि धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न. मराठे विरुद्ध फडणवीस अशी झालेली टोकाची फाळणी. यामुळे महाराष्ट्रात लोकसभेसाठी भाजपाला किती जागा मिळतील यावर प्रश्नचिन्ह असताना भाजप मात्र ‘अबकी बार चारसौ पार’ नारा देत 2024 च्या लोकसभा रणांगणात उतरलय. महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 40 पेक्षा अधिक जागा घेण्याची तयारी दिल्ली तक्ताने दाखवली. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात उमेदवार शोधण्यासाठी भाजपाने फक्त आणि फक्त निवडून येणारे हीच अट उमेदवारीसाठी ठेवली. अशा वेळी भाजपात जे स्वत:ला नेते म्हणून वावरतात, अधिराज्य गाजवतात, अशांनाच 2024 साठी महाराष्ट्राच्या लोकसभा रणांगणाच्या आखाड्यात लंगोट बांधण्याचा चंग दिल्ली तक्ताने आखला अन् महाराष्ट्रातल्या मातब्बरांमधील सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, गिरीष महाजन, विनोद तावडे सारख्या नेत्यांना ‘महाराष्ट्र छोडो दिल्ली से जुडो’ या घोष वाक्याच्या माळेत गुंफून ठेवले. मात्र पराभवाची भीती म्हणा, महाराष्ट्रातली आजची परिस्थिती म्हणा अथवा महाराष्ट्र न सोडण्याची अभिलाषा म्हणा, यातील अनेकांनी उमेदवारी न मिळावी यासाठी प्रयत्नांची परिकाष्ठा सुरू केलीय. आज तर थेट सुधीर मुनगंटीवारांनी माझं तिकिट कापलं जावं यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करतोय, असे वक्तव्य केले. तिकडे कोकणामध्ये नारायण राणे यांना लोकसभा निवडणूक लढवण्याचे सांगण्यात आले. राणेंनी ‘हो’ ‘नाही’ म्हणता प्रमोद जठार यांचं नाव सुचवून आपल्याला महाराष्ट्रातच राहायचं आहे हे स्पष्ट केलं. ज्यांना संकटमोचक म्हटलं जातय त्या गिरीष महाजनांनी थेट लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार दिला आणि विनोद तावडेंनी तर आपल्यावर बिहार आणि हरियाणाची जबाबदारी असल्यामुळे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी आपल्याकडे वेळ नसल्याचं म्हटलं. आशिष शेलार आणि चंद्रकांत पाटील यांचीही तीच भूमिका आहे. पंकजा मुंडे यांनी दोन महिन्यांपूर्वीच ‘मी देणारी आहे, घेणारी नाही, त्यामुळे मी प्रितमकडून काही घेईल, असे नाही, तिची मोठी बहीण आहे, आई आहे,’ असे म्हरत प्रितम यांच्या खासदारकीवर शिक्कामोर्तब केला होता. मात्र काल-परवा पंकजा यांनी आपल्याला तुमच्या मदतीची गरज असल्याची साद मतदारांना घातली. त्यामुळे पंकजा लोकसभा निवडणूक लढवणार, हे निश्चित झाल्याचे सागंण्यात येऊ लागले. असे असले तरी महाराष्ट्रातील भाजपाचे नेते जेव्हा उमेदवारी मिळवण्यासाठी नव्हे तर उमेदवारी रद्द करण्यासाठी जेव्हा धडपड करतात तेव्हा
‘अंदर की बात’
‘चार सौ पार की सौगात या भाजप की पुरी मात?’ असे प्रश्न पडायला लागतात. यातील चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, गिरीष महाजन, नारायणे राणे यांना मुख्यमंत्री पदाची अभिलाषा आहेच. यातील चौघांनीही मुख्यमंत्रीपदाचं लक्ष्य ठेवल्याचे सातत्याने दिसून आलेले आहे. एकतर महाराष्ट्रातून बाहेर पहले की पुन्हा आपलं स्वप्न साकार होणार नाही ही उमेदवारी नाकारण्या मागची भूमिका असेल, नसता भाजपाने लोकसभेसाठी काढलेले सर्वे भाजपाची डोकेदुखी होत असेल आणि त्या डोकेदुखीवर जालीम उपाय हा मातब्बरांचा बाम असेल असे पक्षांना वाटत असले अन् तेच मातब्बरांना आपण बळीचा बकरा तर होत नाही ना ही भीती असली तर ते उमेदवारी नाकारण्यासाठी प्रयत्नशील असू शकतात, मात्र आजपर्यंत उमेदवारीसाठी मारामार पाहिली होती, प्रथमच भाजपात उमेदवारी नाकारण्यासाठी प्रयत्नांची परिकाष्ठा महाराष्ट्र पहातोय.