गणेश सावंत –
भाजपाची नीती+पंकजांना उमेदवारी ु धनंजय मुंडेंची साथ भागिले पक्षांतर्गत विरोध वजा मराठा आंदोलकांचा रोष बरोबर मराठा मतांचे ध्रुवीकरण
गेली पाच वर्षे राजकीय वनवासात असलेल्या पंकजा मुंडेंना अखेर भाजपाकडून लोकसभेची उमेदवारी मिळाली. ताटकळत ठेवलेल्या पंकजांना कात्रीत पकडून म्हणजेच दोन वेळेस लाखोंच्या मतांनी निवडून आलेल्या धाकट्या बहिणीच्या जागेवर उमेदवारी देऊन भाजपाने नीती दाखविली की कुटनिती ? भाजपाला विजयी उमेदवार हवे आहेत म्हणून पंकजांना उमेदवारी असेल तर प्रीतम पराभवाच्या छायेत होत्या का? पंकजांच्या उमेदवारीला धनंजय मुंडेंची साथ असल्यावर मताचा टक्का दुप्पटीत जाणार हे स्पष्ट असताना पक्षाकडून घेतल्या गेलेल्या भूमिकेने पंकजांची नाराजी दूर झाली का? यासह अन्य प्रश्नांचे उत्तर काय असेल हे पंकजा आणि भाजप नेतृत्वाला ठाऊक मात्र पंकजांच्या उमेदवारीत अख्ख्या बीजगणितचा सार उमटतो तेव्हा अनेक प्रश्नांबरोबर उत्तरेही तेवढेच मिळतात. एकतर भाजप-राष्ट्रवादीच्या जवळकीने विधानसभेच्या जागेचा उपस्थित होणारा प्रश्न आणि दुसरे म्हणजे मुख्यमंत्री पदाच्या रेसमधून कमी झालेला एक दावेदार हा राज्य भाजप नेतृत्वाला हायसे करणारा. लोकसभा निवडणुकीत पंकजांसाठी पाचही बोट तुपात असले तरी मराठा आंदोलकांचा रोष त्यांना काहीसा त्रासदायक ठरेल, त्यावर मराठा मतांचे ध्रुवीकरण हे भाजपाचे धोरण असेल का?
दबंग खासदार म्हणून ज्या प्रीतम मुंडेंचा बोलबाला असायचा, ज्या प्रीतम मुंडे लाखोंच्या मताने दोन वेळेस खासदार झाल्या, त्या प्रीतम मुंडेंना डावलून भाजपाने काल पंकजा मुंडेंना बीड लोकसभेची उमेदवारी दिली, या उमेदवारीच्या घोषणेतून भाजप एका घरात दोघांना उमेदवारी देणार नाह हे संकेत त्यातून दिले गेले. काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप करताना भाजप नेतृत्वाला पक्षात घराणेशाही नको, हा मोदी-शहांचा सिद्धांत आहे. परंतु पंकजा मुंडेंना उमेदवारी घोषीत झाल्यानंतर गेल्या पाच वर्षांच्या कालखंडाची गोळाबेरीज, त्यांनी पक्षावर केलेले आरोप पक्षांनी पंकजांसारख्या भारदस्त नेतृत्वाचा केलेला मानसिक छळ याचा हिशोब मांडावा लागेल. विधानसभेच्या निवडणुकीत परळी मतदारसंघातून पंकजांचा पराभव झाला आणि हा पराभव भाजपातल्या अंतर्गत काही लोकांनी घडवून आणल्याचे सांगितले जाऊ लागले. पराभवानंतर पंकजांनी तब्बल दीड ते दोन वर्षे थेट लोकात येणे पसंत केले नाही आणि जेव्हा त्या लोकात येऊ लागल्या तेव्हा त्यांनी थेट भाजपा नेतृत्वावर कटाक्ष टाकणे सुरू ठेवले आणि भाजपानेही विधान परिषद असो वा राज्यसभा असो प्रत्येक निवडणुकीत पंकजांना डावलले. एवढेच नव्हेतर पंकजांना शह देण्या हेतू भागवत कराडांना खासदार करून त्यांना मंत्रीपदही दिले. इथपर्यंत पंकजा मुंडे आक्रमकतेने आपण निर्णय घेणार इथपर्यंतचे वक्तव्ये करत गेल्या. मात्र जेव्हा भाजपा आणि राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्यात जुळते झाले तेव्हा पंकजांची आक्रमकता थोडीशी कमी झाली. कारण राज्यातल्या शिंदे-फडणवीस-पवार सरकार आगामी विधानसभा निवडणूक जिथं ज्याचा विजयी उमेदवार तिथे त्यालाच उमेदवारी या करारावर चालत असल्याने सहाजीक परळीची उमेदवारी ही धनंजय मुंडेंच्या पदरी राहिली. अशा वेळी एकतर पाच वर्षाचा राजकीय वनवास आणि हातातून गेेलेला विधानसभेचा मतदारसंघ त्यामुळे
‘पंकजांना अॅडजेस्ट’
करून घ्यावं लागलं. ते आपल्याला यातूनच दिसेल, गेल्या दोन महिन्यापूर्वीच पंकजांनी ‘माझे देणारे हात आहेत, घेणारे नाही’, असे म्हणत प्रीतम यांची खासदारकी मी कशी घेईल, मी तीची बहीण आहे, मी तिची आई आहे, मी तिला जास्तीत जास्त देईल असे म्हणून बीड लोकसभा उमेदवार या प्रीतमच असतील असे ठासून सांगितले होते, मात्र राजकारणातली अपरिहार्यता पाहता पंकजांना इथे अॅडजेस्ट करावं लागलं. पंकजांना लोकसभेत पाठवून महाराष्ट्र भाजप नेतृत्वाने मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेतला एक उमेदवार अलगद दिल्ली तक्ताच्या सेवेत उभा केला. हे देवेंद्र फडणविसांसाठी एकीकडे चांगलेच. परंतु या सर्व घडामोडीतून पंकजा ज्या पाच वर्षे नाराज होत्या आता त्या नाराजमुक्त झाल्या की पंकजांनीही अॅडजेस्ट करून घेतले, असो परंतु बीड लोकसभेसाठी
भारदस्त उमेदवार
पुन्हा एकदा भाजपाकडूनच मिळाला. पंकजा मुंडेंचं नेतृत्व आणि त्यांच्या पाठिशी असलेला समाज हा पंकजा मुंडेंना आणि भाजपाला उर्जा देणाराच. त्यात 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पंकजांसोबत धनंजय मुंडेंची साथ असल्यानंतर बीडची निवडणूक ही एकतर्फी असेल. आज मितीला पंकजांकडे केजमधून आ. नमिता मुंदडा, आष्टीतून सुरेश धस आणि गेवराईमधून आ. लक्ष्मण पवार हे तीन आमदार आहेत तर दुसरीकडे त्यांच्या मदतीला आता दस्तुुरखुद्द धनंजय मुंडे व त्यांच्या नेतृत्वात आ. बाळासाहेब आजबे, आ. प्रकाश सोळंके, अमरसिंह पंडित हे भारदस्त आणि मताचा गठ्ठा असलेले नेते सोबत आहेत. त्यामुळे पंकजा या जेवढ्या भारदस्त तेवढाच त्यांच्या जवळ मताचा टक्का. परंतु बीड जिल्ह्यात या
मताच्या टक्क्याचे बीजगणित
डोकं किर्र करून सोडणारे आहे. दस्तुरखुद्द गोपीनाथरावांच्या विरोधात उभे असलेले तेढाचे राष्ट्रवादी उमेदवार सुरेश धसांना पाच लाखांपेक्षा अधिक मते पडली. तर स्व. गोपीनाथरावांचे दुर्दैवी अपघाती निधन झाले, त्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने उमेदवारी दिली नाही, परंतु काँग्रेसने उमेदवारी दिली. त्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराला 4 लाखांच्या आसपास मतदान झाले. त्यापाठोपाठ 2014 च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी उमेदवार बजरंग सोनवणे यांना पाच लाखापेक्षा जास्त मते मिळाली. याचा अर्थ भाजपा विरोधात बीड जिल्ह्यात मताचा मोठा टक्का आहे. आता तर रमाठा आंदोलनाने मराठ्यांसमोर भाजपा विलन ठरलं आहे. अशा वेळी जनता विरुद्ध भाजप या लढाईत पंकजांना मराठा मतांचे ध्रुवीकरण हे विजयासाठी गुणकारी औषध असेल. असो पंकजांच्या उमेदवारीने फडणविसांचा प्रश्न मिटला, धनंजय मुंडेंचा प्रश्न मिटला. परंतु मुंडे भगिनींमध्ये अनेक प्रश्न उपस्थित असतीलच ना.