गणेश सावंत
‘…अर्जुन ‘बगलबाज’ होता. काका, मामा, आप्पा, बाबा यांना कसे मारू या क्षुद्र कल्पनेला बळी पडन विहित कर्तव्याला बगल मारून पळत होता. पण शिवाजी तसा नव्ह्ता. तो वाकड्या दाराला वाकडी मेढ ठोकून समोर येईल त्या मुकाबल्याचा फडशा पाडणारा ‘दगलबाज’ होता. बगलबाज अर्जुन आणि दगलबाज शिवाजी या तुलनेत विचारांचे ब्रह्मांड आहे. भारतीय समरभूमीवरील अर्जुन आणि प्रतापगडावर अफझलखानासमोर उभा ठाकलेला शिवाजी, यांची तुलना केली, तर अर्जुनापेक्षा शिवाजी शतपट श्रेष्ठ ठरतो. ‘दगलबाज’ आणि ‘दगाबाज’ यातील भेदच लोकांना समजत नाही. दगलबाज म्हणजे ‘डिप्लोमॅट’ दगाबाज म्हणजे ‘ट्रेचरस’. इरसाल मुत्सद्दी हा दगलबाजच असावा लागतो! इति प्रबोधनकार ठाकरे…
जो धनुर्धर असतो, जो लढवय्या असतो, जो संघर्षशील असतो त्या योद्ध्याने बगलबाजांपेक्षा दगलबाज राहणे हे मुत्सद्दीपणाचे लक्षण असते. महाराष्ट्राच्या राजकारणात लढवय्या आणि संघर्षशील नेता म्हणून ज्यांचे कार्यकर्ते त्यांना डोक्यावर घेतात ते राज ठाकरे बगलबाज आहेत की दगलबाज? ही चर्चा तेव्हा सुरू झाली जेव्हा राज ठाकरेंनी कर्णागत भाजपाच्या महायुतीला बिनशर्थ पाठिंबा देऊन टाकला. केवळ आणि केवळ नरेंद्र मोदी हे पंतप्रधान व्हावेत म्हणून राज ठाकरेंनी आपण ही भूमिका घेतल्याचे म्हटले. ठाकरेंच्या या भूमिकेेनंतर त्याचक्षणी अवघ्या महाराष्ट्राच्या डोळ्यांसमोर उभा राहिला तो प्रसंग, ‘लाव रे तो व्हिडिओ’ 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदींचे अक्षरश: कपडे फाडले होते. ‘लाव रे ते व्हिडिओ’ म्हणत हा सूर्य आणि हा जयद्रत त्यांनी वेळोवेली दाखवून दिला होता. आपण गुजरातमध्ये गेलो तेव्हा तिथला विकास पाहून 2014 साली मोदींचे कौतुक करत होतो, मात्र गेल्या पाच वर्षांच्या कालखंडात मोदींनी अक्षरश: देश विकायला काढला. हे वक्तव्य राज ठाकरेंचे आहेत आणि ते 2019 च्या प्रत्येक सभांमध्ये या वाक्यांचा वापर केला जायचा. मात्र पुढच्या पाच वर्षानंतर ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने जो आम्हाला विरोध करेल तो ईडी, सीबीआयच्या जाळ्यात असेल, ही कडेलोटपणाची भूमिका घेतली अन् तिथेच वेगवेगळ्या पक्षातले नेते म्हणण्यापेक्षा भ्रष्टाचाराचे बटीक भाजपाच्या वॉशिंग मशीनमध्ये धुऊन घेण्यासाठ पळत सुटले. अन्य कित्येक मातब्बर भाजपात गेले तेव्हा सरळ सरळ सर्वसामान्यांनी ते भ्रष्टाचारी असतील अथवा त्यांचे हात दगडाखाली आहेत म्हणून ते भाजपात गेले, परंतु राज ठाकरे जेव्हा भारतीय जनता पार्टीला बिनशर्थ पाठिंबा देतात तेव्हा राज ठाकरे ‘मुँह में राम बगल मे छुरी’ घेतात की, ज्याच्याकडे निडर म्हणून पाहिले जाते, तो नेता डरपोक आहे, अशीच चर्चा राज ठाकरेंच्या निर्णयाने होत राहिली. राज ठाकरेंनी जे
कर्णाचे औदार्य
दाखवल्याचा आभास निर्माण केला ते औदार्य म्हणजे ‘अंधेरा माँगने आया था रौशनी की भिक, हम अपना घर ना जलाते तो क्या करते’ अशा पद्धतीचे ठाकरेंचे ते औदार्य म्हणावे लागेल. महाराष्ट्राचा वाघ, सिंह म्हणून डरकाळी फोडणारे राज दिल्ली तक्ताच्या गुहेत गेले आणि तिथे अमित शहांसारखा दांडगा वाघ पाहिला अन् ठाकरेंनी तेव्हाच पंगा नही लुँगाची भूमिका महाराष्ट्राला देऊन टाकली. एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचे पाईक म्हणून सांगायचे, आणि दिल्ली तक्ती मुजरे घालायचे. हे महाराष्ट्राच्या जनतेला नक्कीच आवडले नाही. राज ठाकरेंचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचे ‘दगलबाज शिवाजी’ या व्याख्यानाचे पुस्तक सातत्याने चर्चेत असते. तिथे धनुर्धारी अर्जुनापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांना प्रबोधनकार ठाकरेंनी सर्वश्रेष्ठ ठरवलं. अर्जुन आपल नातेवाईक, आप्तस्वकीय समोर पाहून ज्या पद्धतीने शस्त्र खाली टाकून युद्ध करण्यास टाळतो आणि आपल्या कर्तव्याला बगल देतो त्याचप्रमाणे राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा देऊन बगलबाज होणे पसंत केले. हे महाराष्ट्राच्या मातीचे धोरण नक्कीच नव्हे. राज ठाकरेंच्या निर्णयानंतर राज ठाकरेही लवचिक म्हणण्यापेक्षा झुकणारे आहे असा थेट मॅसेज महाराष्ट्राच्या जनतेत गेला आणि त्या पद्धतीने उभ्या महाराष्ट्राने चर्चाही केली.
ठाकरेंचा निर्णय
म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेख, राज ठाकरेच खरे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार’ असे कधीकाळी म्हटले जायचे. राज ठाकरेंचे ताठरपणा, राज ठाकरेंचे वक्तृत्व, राज ठाकरेंची निर्णय क्षमता याला महाराष्ट्र पुरता भाळला होता. लाखोंच्या संख्येने राज ठाकरेंच्या सभा होतात. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात तुलना केली जाते. राज ठाकरे हे सत्य आणि निडरपणे वक्तव्य करतात ही जी पॉझिटिव्ह राज ठाकरेंची चर्चा होती ती चर्चा बिनशर्त दिल्या गेलेल्या पाठिंब्याने बोथट ठरली आणि राज ठाकरेही त्याच लाईनीत जावून बसले. इथे मात्र दिल्ली तक्ताशी पंगा घेणारे चर्चेत राहिले. मग ते 87 वर्षांचे वृद्ध शरद पवार असोत, अथवा ठाकरी बाण्याचे उद्धव ठाकरे असतो. राजकारणामध्ये त्यांची आज किती ताकत ? यावर भाष्य करण्यापेक्षा ते दिल्ली तक्ताशी दोनहात करतायत एवढ्यावर उभ्या महाराष्ट्रातले लोक उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर चर्चा करतायत. राज ठाकरेंची भूमिका ही सातत्याने बदलणारी भूमिका आहे. राज ठाकरे हे कधी काळी गुजरातची वाह वाह करायचे, लोकांना फिरून या म्हणायचे, तिथला विकास बघून या म्हणायचे आणि 2019 ला हेच राज ठाकरे शहा-मोदींचे कपडे फाडायचे, व्यंग्य चित्रांमधून थेट भारत मातेला शहा-मोदी फासावर लटकवत आहेत हे दाखवायचे. आज 2024 ला मात्र ठाकरेंचा ठाकरी बाणा दगलबाजातून बगलबाजात गेला आहे. त्यांच्या या भूमिकेचा स्वत:ला काय फायदा असेल तर असेल परंतु मनसेला तोटाच असेल.