दहा ते बारा जण जखमी
काहींची प्रकृती गंभीर
पुरग्रस्त कॉलनी भागात घडली आज सकाळी घटना
बीड (रिपोर्टर): जागेच्या वादातून दोन गटांमध्ये वाद विकोपाला गेला. दोघांनी एकमेकांवर लाठ्या-काठ्याने हल्ला चढवला. यात दोन्ही गटातील दहा ते बारा जण जखमी झाले. ही घटना आज सकाळी खंडेश्वरी परिसरात असलेल्या पुरग्रस्त भागात घडली. जखीमंना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी दुपारपर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.
शिंदे आणि कांबळे या दोन शेजार्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून जागेचा वाद असल्याचे सांगण्यात येते. आज सकाळी दोघांमधला वाद पुन्हा उफाळून आला. कांबळे यांच्याकडून शिंदे कुटुंबियांवर हल्ला करण्यात आला. नंतर दोन्ही गटांनी एकमेकांवर हल्ला चढवल्याने यात छाया शिंदे, सागर शिंदे, सुंदर शिंदे, हेमंत शिंदे, माधवी लोखंडी, गौतमी कांबळे, हिराबाई कांबळे, हर्ष कांबळे यांच्यासह दहा ते बारा जण जखीम झाले आहेत. जखमींना उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान हिराबाई कांबळे यांच्याकडून नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणावरून कुपरात काढण्यात येत असल्याचा आरोप शिंदे गटाकडून करण्यात आला. यापूर्वीही वाद झाल होता. आजची मारामारीची घटना घडल्यानंतर पेठ बीड पोलीस जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल झाली होती. या प्रकरणी दुपारपर्यंत गुन्ह्याची नोंद झाली नव्हती.