बीड, (रिपोर्टर)ः- बीड नगर पालिका प्रशासनाचा कारभार पुर्णपणे ढेपळला. पिण्याच्या पाण्याचे नियोजन नगर पालिकेला करता येत नाही. काही भागात 23 दिवसानंतरही पाणी येत नसेल तर त्या भागातील नागरीकांना पाण्याविना मारण्याचा प्रयत्न आहे की काय असा संतप्त सवाल नागरीकांकडून उपस्थित केला जात आहे. सध्या भिषण दुष्काळी परिस्थिती आहे अशा परिस्थिती नगर पालिकेने पाण्याचा पुरवठा योग्य पध्दतीने करणे गरजेचे आहे.
बीड नगर पालिकाअंतर्गत विविध भागात पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या आहे. न.प पुर्वी 15 दिवसांआड पाणी सोडत होती. आता 23 दिवस उलटले तरी पाणी आले नाही. यामुळे नागरीकांत संताप व्यक्त केला जात आहे. पाण्याविना लोकांचे हाल होवू लागले आहेत. विकत पाणी आणण्याची वेळ नागरीकांवर आली. बाह्य विभागामध्ये तर नळाला पाणीच येत नाही. त्या ठिकाणच्या नागरीकांत नगर पालिका विरोधात तिव्र संताप आहे. नगर पालिका प्रशासनाने पाण्याचे योग्य पध्दतीने नियोजन करून ज्या भागामध्ये पाणी जात नाही. त्या भागात पाणी सोडण्याची मागणी केली जात आहे. काही भागामध्ये कमी दाबाने तर काही भागात जास्त दाबाने पाणी येत असल्याच्या तक्रारी नागरीकांच्या आहेत. पाणी पुरवठा विभागाने दुष्काळाचा विचार करून पाण्याचा पुरवठा करण्याची मागणी केली जात आहे.