गेवराई (रिपोर्टर): जात-पात-धर्म काढून बीड जिल्ह्याला कायम दुष्काळी ठेवायचं की, जात-पात-धर्म सोडून बीड जिल्ह्याचा विकास करायचा, याचा निकाल आपल्याला द्यायचा आहे. निवडणुका या विकासाच्या मुद्यावर असल्या पाहिजे. इथे आपला उमेदवार अनुभवी आहे तर समोरच्या उमेदवाराला केंद्र सरकारच्या माध्यमातून विकास काय करायचा ? हे तरी सांगता येईल का? असा सवाल करत राज्याचे कृषीमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणेंवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, ते स्वत:ला शेतकरी पुत्र संबोधतात. मी कृषी मंत्री आहे म्हणून मला पहावं लागेल, ते नेमकी कशाची शेती करतात. असो रयतेचे राज्य आणताना छत्रपतींनी कधी जात-पात-धर्म पाहिला नाही. आम्हीही तो कधी पहात नाही. मुंडे साहेबांनी आम्हाला जातीचे राजकारण करण्याची शिकवण दिली नाही. असेही मुंडे या वेळी म्हणाले.
ते गेवराई येथे महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये बोलत होते. या वेळी व्यासपीठावर युतीचे उमेदवार पंकजाताई मुंडे, माजी आमदार अमरसिंह पंडित, विजयसिंह पंडित, सुनील पाटील, मिनाताई पाटील, अनिल तुरुकमारे, परमेश्वर वाघमोडे, मुजीब पठाण, फुलचंद बोरकर, महंमद गौस, सय्यद समीर, जगन्नाथ धिरे, मुक्ताई आरदड, शीतल साखरे, अर्चनाताई बोरकर, भाऊसाहेब नाटकर यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, ही निवडणूक देशाची निवडणूक आहे, संसदेमध्ये प्रश्न मांडण्यासाठी अनुभवाची गरज आहे. पंकजाताई आमदार राहिल्या, मंत्री राहिल्या आणि एका मोठ्या पक्षाच्या संघटन बांधणीची त्यांच्याकडे ताकद आहे. प्रतिस्पर्धी उमेदवाराला केंद्र सरकारच्या माध्यमातून काय विकास करायचाय हे तरी सांगता येईल का? एकदा शिवछत्र परिवाराने शब्द दिला तर तो काहीही करून खरा करून दाखवतात, येणार्या निकालात विरोधी उमेदवार दुसर्या नंबरवर राहिल की तिसर्या नंबंवरवर? असं म्हणत पुन्हा -पुन्हा निवडणुकीमध्ये जात-पात आणली जाते. त्यातून बाहेर निघून विकासाची कास धरावी, नमो आणि पीएम किसान मिळून शेतकर्यांना वर्षाला 12 हजार रुपये दिले जातात. महाराष्ट्रात एक कोटी शेतकर्यांना राज्य सरकार आणि केेंद्र सरकार ही मदत देते. तेव्हा सरकारने जात पाहिली का? छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभा करताना अठरा पगड जातीला सोबत घेतले. जिवा महाले, मदारी मेेहतर, बहीरजी नाईक, नेमाजी शिंदे, बाजीप्रभू देशपांडे यांना महाराजांनी कधी जात विचारली असेल का? असा सवालही त्यांनी या वेळी उपस्थित केला. त्यांनी कधी जात पाहिली नाही. आता मात्र कोण कोणत्या जातीचा? यावर भाष्य केले जाते. याने गावगाडा बिघडण्याची शक्यता असल्याचे त्यांनी म्हटले. निवडणुका येतील -जातील परंतु देशात नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी आणि बीड जिल्ह्याचा विकास करण्यासाठी पंकजाताईंना निवडून द्या, असे आवाहन त्यांनी या वेळी करत ज्या काही या तालुक्याच्या सिंचनासाठी मागण्या केल्या आहे त्या एक वर्षात पुर्ण करण्याचे आश्वासनही त्यांनी या वेळी दिले.