नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, अनिल देशमुख, मुकुल वासनिक, विजय वडेट्टीवार, प्रफुल्ल पटेल, नाना पटोले, सुधीर मुनगंटीवार यांनी बजावला मतदानाचा हक्क
मुंबई/नागपूर (रिपोर्टर): लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज देशभरातील काही राज्यात मतदान होत असून महाराष्ट्रातील पाच मतदारसंघात आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. चंद्रपूर, भंडार-गोंदीया, चडचिरोली-चेमूर, नागपूर, रामटेक येथील मतदारसंघात मतदान सुरू असून या पाचही मतदारसंघात दुपारपर्यंत 32 टक्के मतदान झाल्याचे सांगण्यात येते. नागपूरमध्ये युतीचे उमेदवार नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आदींनी कुटुंबियांसह मतदानाचा हक्क बजावला.
महाराष्ट्रातील पाच लोकसभा मतदारसंघांमध्ये पहिल्या टप्प्यात मतदान होत आहे. नागपूरमध्ये भाजपाचे नितीन गडकरींविरुद्ध काँग्रेसचे विकास ठाकरे यांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे तर तिकडे रामटेकध्ये महाविकास आघाडीचे शाम बर्वे, महायुतीचे राजू पारवे, वंचितचे किशोर गजभिये, चंद्रपूर मतदारसंघात भाजपाचे सुधीर मुनगंटीवार, काँग्रेसचे प्रतिभा धानोरकर, गडचिरोलीमध्ये माविआचे नामदेव किरसान, महायुतीचे अशोक नेते, वंचितचे हितेश मढावी, भंडारा-गोंदीयामध्ये महायुतीचे सुनील मेंढे, माविआचे उमेदवार प्रशांत पडोळे, वंचीतचे संजय केवट या उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत आज बंद होणार आहे. आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली. दुपारी एक वाजेपर्यंत 32 टक्क्यांच्या आसपास या पाचही मतदारसंघामध्ये मतदान झाले होते. भाजपाचे उमेदवार नितीन गडकरी हे सहकुटुंब मतदानासाठी आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना गडकरी म्हणाले की, मतदान करणे हे मतदारांचे कर्तव्य आहे आणि त्यांची जबाबदारीही आहे. सर्वांनी मतदान करावे, कोणाला मत द्यायचं हे त्यांचं अधिकार आहे, परंतु मतदानाचा हक्क बजवावा. मला विश्वास आहे, या वेळी जास्तीत जास्त मतदान होईल, मतदानाची टक्केवारी वाढेल आणि मी मोठ्या फरकाने जिंकून येईल, अशी मला आशा आहे.