मै झुक जाऊ तो मसला हल हो जाएंगा
मगर इससे मेरे किरदार का कत्ल हो जाएंगा
गणेश सावंत-
समाजामध्ये वावरताना ज्या व्यक्तीकडे निधडी छाती असते, ज्याचे चारित्र्य स्वच्छ असते, जो आचाराने आणि विचाराने एकअंगी असतो, ज्याला सत्याची चाड आणि असत्याची चीड असते तो व्यक्ती आपल्या विचाराशी कधीच तडजोड करत नाही, समोर कोण आहे? यापेक्षा समोर असलेला विषय सत्य आहे का? विचारशील आहे का? समाजोपयोगी आहे का? याचा विचार करूनच तो निधडा व्यक्ती त्या विषयावर व्यक्त होतो. समाजोपयोगी असेल तर त्याच तो सहभागी होतो आणि समाजोपयोगी नसेल तर तो व्यक्त होताना त्या विषयाला विरोध करतो. महाराष्ट्र ही भूमी विचारवंतांची आणि भूमिका घेऊन समाजहित साधणार्यांची भूमी आहे. ही लढवय्य माती आहे आणि सह्याद्रीची छातीही आहे, मात्र काही कालखंडापासून ही सह्याद्रीची छाती आणि लढवय्य माती समाजकारणाचं ढोंग आणत राजकारण्यांच्या पाठीला लागते तेव्हा जो तो विचाराच्या, सत्येच्या, वैचारिक चारित्र्याच्या कुस्तीत गारद होतोय. इथे सत्यपेक्षा सत्ता याला अधिक महत्व दिलं जातय. तेव्हा मात्र प्रत्येकाला स्वत:च्या
किरदारची हत्या
होताना दिसते आणि तो बोलतोही. आपल्या मनाविरुद्ध आहे, परंतु ते करावं लागेल. हे आपल्याला पटत नाही, ते पटवून घ्यावं लागेल. आपली इच्छा नाही, परंतु परच्छेखातर खपवून घ्यावं लागणार आहे. सत्यवादी, विचारवादी, परिवर्तनवादी व्यक्तीवर जेव्हा अविचारी प्रबोधने लादली जातात तेव्हा विचाराचे हायब्रिड बिज नक्कीच तयार होते आणि आता महाराष्ट्रात हे हायब्रिड बिज नुसते तयार झाले नाही तर त्याची पेरणीही जिल्ह्यागणिक झाल्याचे पहायला मिळते. महाराष्ट्राच्या राजकारणात नव्हे नव्हे तर देशाच्या राजकारणात कुठे असे कधी घडले नसेल, पाच वर्षाच्या सत्ताकारणामध्ये तीन-तीन वेळा मुख्यमंत्र्याला शपथ घ्यावी लागते. एका पक्षाचे दोन-दोन पक्ष होताना दिसून येतात. ज्याने पक्षस्थापना केली त्यालाच पक्षातून बाहेर हाकलले जाते. ज्या मतदारांनी, ज्या विचारांना मतदान केले त्या मतदारांच्या मतदानाचा विचार न करता केवळ सत्ताकारणाची उब मिळावी या हेतू अवमेळ राजकीय समांगण केले जाते आणि त्या राजकीय समांगणाच्या ठेवीतून जे अर्भक तयार होतय ना ते अनितीचे, कुटनितीचे, अविचाराचे, भ्रष्टाचाराचे आणि नत्द्रष्ट पैदासीचेच. मग अशा वेळी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचा विचार कुठल्या दिशेने जातोय याचं जेव्हा चिंतन होतं ना तेव्हा जो तो स्वत:च्या किरदाराची हत्या करून उसण्या जिवावर राज करतोय. या
राजात तो रंकच
केवळ सत्ताकारणासाठी केलेल्या अॅडजेस्टमेंटमधून विचाराचे अठराविश्व दारिद्रय पदरात घेऊन जो तो मिरवताना दिसतं, त्याला खिजवलं जातय, त्याला दलबदलू म्हटलं जातय. गद्दार म्हटलं जातय, तरीही विचाराच्या दारिद्रयाचा व्यक्ती आपल्या मुखकमलावर हास्य आणत राजेपणाचे भाष्य करतो आणि स्वत:च्या किरदाराला मारून टाकल्याचा उत्सव साजरा करतो. असो, राज्याच्या राजकीय समीकरणातून राजकारण्यांच्या सत्ताकारणाच्या अभिलाषा आणि भोगविलासीपणा यातून महाराष्ट्राला तरी दिसून आला. इथे स्वत:च्या किरदाराची हत्या करणार्या राजकारण्यांनी जेव्हा मतदारांच्याही किरदारची हत्या करण्याचं महापाप योजिलं तेव्हा अनेकांच्या तोंडातून ‘मै झुक जाऊ तो मसला हल हो जाएँगा मगर इससे मेरे किरदार का कत्ल हो जाएँगा’ म्हणत आपआपला स्वाभीमान जागृत ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न सुरू केला. मग मात्र स्वत:च्या किरदाराची हत्या करणार्यांना जनतेच्याही किरदारची हत्या करायची म्हणून जातीची आणि धर्माची अफू सर्वसामान्यांच्या मस्तकी उतरवण्यास सुरूवात केली. धर्म आणि जात याची नशा जेव्हा मस्तकी भिनतेय तेव्हा तो व्यक्ती माणूस म्हणून उभा नसतोच ना! आणि तेच या राज्यकर्त्यांना आणि राज्य आणू पाहणार्यांना करायचं. किरदारची हत्या कोणी आणि कुठे केली या प्रश्नाचे उत्तर प्रत्येक जिल्ह्यातल्या राजकारण्यांच्या
अभद्र युतीत
पहायला मिळते. हे सर्व नेते एकत्रित दिसून येत असले तरी यांची मने जुळलेली असतील का? गेवराईमध्ये पंडितमुक्तीचा नारा घेत आ. लक्ष्मण पवारांनी दहा वर्षे मतदारसंघाचं नेतृत्व सुरू ठेवलं. अशा वेळी त्याच पवारांच्या पक्षाचा गढीवरच्या पंडितांना प्रचार करावा लागला. इथं पंडित प्रचार करतायत, तिथं पवार नसतायत आणि जिथं पवार असतात तिथं पंडित नसतात. तिकडे आष्टीमध्ये धस-आजबे-धोंडे एकत्र दिसतात मात्र मनाने ते एकत्रित आहेत का? बळजबरीने एकमेकांच्या गळ्यात गळे घालून जे काही चालू आहे, त्यात एकमेका सहाय्य करू पेक्षा अंतर्मनात जी वादळे या लोकांमध्ये उठत असतील ना ते एकमेकांचे राजकीय अस्तित्व उद्ध्वस्त करणारे म्हणावे लागते, असो, पुढारी एक झाले मग पुढार्यांचे कार्यकर्ते एक होणार आहेत का? ज्या पुढार्यांसाठी गावागावामध्ये दोन-दोन तीन-तीन गट पडले, ज्या कार्यकर्त्यांनी एकमेकांची आय-माय काढली, एकमेकांच्या सुख-दु:खात जाणे बंद केले ते कार्यकर्ते आता आपल्या नेत्यांना एकत्रीत पाहून स्वत: एकत्रीत येणार आहेत का? कालपर्यंत ज्या बजरंग सोनवणेंना स्वत:ची छाती फाडल्यानंतर अजित पवार आणि धनंजय मुंडे दिसायचे त्या सोनवणेंच्या छातीतून मुंडे-पवार लुप्त झाले का? ज्या मुंडे बंधू-भगिनींचा वाद राज्यभर सुपरिचीत आहे त्यांच्या कार्यकर्त्यांनी आज काय भूमिका घ्यायची? हे जे प्रश्न आज उपस्थित होत आहेत ना आणि त्याची उत्तरे राजकारण्यांना मिळतायत मात्र कार्यकर्त्यांना आणि सर्वसामान्यांना मिळत नाहीत ना त्या उत्तराचा शोध म्हणजे
सत्ताकारण
मतदारांना काय हवय? जनतेच्या मुलभूत गरजांचं काय? कार्यकर्त्यांच्या इमानदारीचं काय? याचं कुठलच देणेघेणं महाराष्ट्रातल्या कुठल्याच पक्षाला नही हे आम्ही ठामपणे सांगतो. ना त्यांना विचारांशी देणंघेणं आहे ना त्यांना वैचारिक आचरणाशी आणि चारित्र्याशीही, त्यांची हाव आहे ती सत्ताकारणाची. त्यांना हवी आहे सत्तेची कूस. बस्स हेच सत्ताकारण आज प्रत्येक व्यक्तीला आत्मचिंतीत करून सोडतय. प्रत्येकाला वाटतय हे चूक आहे जी राजकीय स्थिती महाराष्ट्रात चालू आहे ती अनैसर्गिक आहे. तिथे ना विचार, ना आचार आहे. परंतु केवळ बाबा, दादा, भाऊ, साहेब यांच्यामुळेच हे सर्व करायचं आहे. आम्ही तर स्पष्ट म्हणू , या विचाराच्या आणि प्रबोधनाच्या महाराष्ट्रात राहणार्या प्रत्येकाने आत्मचिंतीत होत स्वत:ला ‘मै झुक जाऊ तो मसला हल हो जाएँगा, मगर इससे मेरे किरदार का कत्ल हो जाएँगा’ या दोन ओळींचा विचार करत आपल्या भूमिकेत राहिलं आणि जात-पात-धर्मापेक्षा विचाराच्या आणि विकासाच्या राजकारणावर भाष्य केलं, चर्चा घडवून आणली तर ते आपलं नक्कीच भविष्य असेल.