
तीन दिवसात दुसरी घटना
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ; तलवाडा पोलिसांना गांभीर्य नाही
गेवराई (रिपोर्टर) गेवराई तालुक्यातील ठाकर आडगाव परिसरात दिवसाढवळ्या पुन्हा एकदा घरफोडीची घटना घडली आहे. अवघ्या तीन दिवसांच्या आत घडलेल्या दुसर्या चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे दोन्ही घटना भरदिवसा, नागरिक शेतात असताना घडल्या आहेत, मात्र तलवाडा पोलिसांकडून याकडे अद्यापही गांभीर्याने पाहिले जात नसल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे.
तीन दिवसांपूर्वी गोरख काशिनाथ कोकाट यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी चार तोळे सोन्याचे दागिने व रोख दीड लाख रुपये चोरून नेले होते. ही घटना ताजी असतानाच, सोमवार 2 जून रोजी दुपारी 12 वाजता श्रीरामनगर वस्तीतील गोल्हार कुटुंब शेतात गेले असताना त्यांच्या घराची कडी-कोंडा तोडून चोरट्यांनी सात तोळे सोने व साठ हजारांची रोख रक्कम असा एकूण लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला.
सततच्या या घटना भरदिवसा घडत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. चोरट्यांना कोणताही धाक न वाटता ते दिवसाढवळ्या धाडसीपणे चोरी करत आहेत, हे अधिक चिंतेचं आहे. मात्र, या प्रकारांकडे स्थानिक तलवाडा पोलीस ठाण्याचे दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट होत आहे. संबंधित पोलिसांशी संपर्क साधला असता, त्यांना याबाबत कुठलीही माहिती नसल्याचं सांगण्यात आले.
या घटनेमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आसून पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली पाहिजे. याबाबत वरिष्ठ अधिकार्यांनी हस्तक्षेप करून कठोर पावलं उचलावीत, जेणेकरून अशा घटनांना आळा बसेल.








