गणेश सावंत-9422742810
जन्माच्या स्टेशनवर मृत्यूचं तिकीट काढून आयुष्याच्या गाडीने प्रवास करणारे गोपीनाथ मुंडे आज नाहीत. हे सत्य स्विकारणे आम्हालाच नाही तर जनमाणसांनाही शक्य नाही. ज्या माणसाने उभ्या आयुष्यात साक्षात काळालाही आपल्या विजयी मिरवणूकीत नाचण्याची इच्छा प्रकट करावयास भाग पाडले. त्या धिरोदत्ताचा अकाली अपघाती मृत्यू होतो छे-छे, आम्हाला हे मान्य नाही. परंतू मृत्यू हा अटळ आहे आणि ते सत्य स्विकारावेच लागेल. 3 जून 2014 चा तो दिवस आमच्यासह अखंड महाराष्ट्रासाठी काळोखाने व्यापलेला. जणु सुर्यालाच ग्रहण लागलेला तो दिवस साहेबांच्या मृत्यूची बातमी करण्याचं धाडस त्या दिवशीही झालं नव्हतं. म्हणूनच आम्ही त्या काळ्या दिवशी ‘साहेब झोपलात काय उठा हो’ असा अग्रलेख लिहित साहेबांना आवाज दिला होता. पुढे आम्ही असंही म्हणालो होतो, दशकानु दशके साहेब अहोरात्र काम करतायत,थकले असतील. त्यांना आराम करू द्या. पण आज 11 वर्षे होत आहेत. अजूनही सााहेबांची चीर निद्रा सावध होत नाहीय. साहेब थकणार्यामधले कधीच नव्हते, इतक्या चीर निद्रेत तर ते जातच नव्हते, साहेबांचा जन्मच मुळात झोपलेल्यांना जागं करण्यासाठी झाला होता, जाग झालेल्यांना उठून बसवण्यासाठी आणि उठून बसणार्यांना चालतं करण्यासाठी, चालणार्यांना पळत-पळत जावून यशाचा ध्वज फडकवण्यासाठी, मार्गस्थ करण्यासाठीच मुंडेंचा जन्म झाला होता. हे उघड सत्य उभ्या आयुष्यात महाराष्ट्रातलाच नाही तर देशातला कुुठलाही व्यक्ती नाकारू शकणार नाही. गोपीनाथ मुंडेंचं अकाली निधन हे पचवण्यासाठी अनाकालनीयच.
आधी विलासराव देशमुखांचा मृत्यू आणि त्या पाठोपाठ गोपीनाथ मुंडेंच्या निधनाने मराठवाडा पोरका झाला. कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, दीनदुबळे, शोषित, वंचित, ऊसतोड कामगार यांच्या प्रश्नाचा आवाज या दोघांच्या मृत्यूने मुका झाला. विलासराव देशमुखांच्या मृत्यूनंतर अवघ्या मराठवाड्यातल्या वंचितांचा आवाज होवू पाहणारे गोपीनाथराव जेंव्हा ईहीलोकी गेले तेंव्हा मात्र मराठवाडा अक्षरश: उद्धवस्त झाला. ते काही नुसत्या जिल्ह्याचे अथवा मराठवाड्याचे नेते नव्हते. परंतू भावनिक म्हणा अथवा आपुलकीने म्हणा मराठवाड्याचा उल्लेख तेथे करावासा वाटतो. गोपीनाथ मुंडेंचं निधन आणि त्या निधनाने निर्माण झालेली पोकळी कदापीही भरून निघणार नाही. हे जेवढे खरे आहे तेवढेच गोपीनाथराव मुंडेंचा संघर्षही सुर्य प्रकाश इतका सत्य आहे. मागास म्हणून ओळखल्या जाणार्या बीड जिल्ह्यात अडगळीला असलेल्या परळी तालुक्यात नाथ्रा नावाच्या छोट्याश्या गावात गोपीनाथरावांचा जन्म झाला. अत्यंत मागास असलेल्या समाजात जन्मलेले गोपीनाथराव देशपातळीवरचे नेते होतील आणि समाजाचे उद्धार करते होवून जातील असं साध स्वप्नही जन्मदात्यांना कधी पडलं नसेल. कारण घामाचं रक्त ओकायचं, शेतात राब-राब राबायचं, मरण यातनेचे कष्ट उपसायचे आणि पोटाला चार घास खायचे यापेक्षा त्याकाळी आमचं कुठलं मोठं स्वप्नच नव्हतं. निजामाची राजवट संपलेली होती. पैशा पाण्याने बरे असलेले अन् शेता पोताने दुधा-दह्याने नाहलेले लोकच तेंव्हा मोठं स्वप्न पाहायचे. 1949 चा काळ म्हणजे स्वातंत्र्याची पाहट होती आणि त्या पाहटेत परळी सारख्या एका अडगळीला असलेल्या छोट्याशा शहरानजीकच्या गावात गोपीनाथ मुंडेंचा जन्म झालेला होता. शालेय शिक्षण गावात घेवून महाविद्यालयीन शिक्षणासाठी अंबाजोगाईत आलेला हा तरणाताठा शाहु, फुले, आंबेडकरांच्या विचाराशी संलग्न होता. होय आम्हावर धनदांडगे राज्य करतायत, साम-दाम-दंडाचा वापर करतायत, बहुजनांच्या कष्टाला, मेहनतीला म्हणावा तेवढा मोबदला देत नाहीत. बहुजन समाजासह अठरापगड जातीचा तरूण शिक्षणापासून वंचित दिसतोय. वाडी, वस्ती, तांड्यावरची हालत तर अत्यंत बिकट. राजकारणी पांढर्या फक्क कपड्यामध्ये ‘वाड्यावर या’ ची भाषा करतायत. ही चीड नक्कीच गोपीनाथरावांना असावी. म्हणूनच गोपीनाथ मुंडेंनी मागास समाजाचं नेतृत्व करण्याची खूणगाठ मनी बाळगली. तो काळ पारतंत्र्यातून स्वातंत्र्यात आल्याचा असला तरी

पाटील पांड्यांच्या खूणशी राजकारणाचा
काळ म्हणावा लागेल. मराठ्यांनी राजकारण करायचं, सत्ता राबवायची आणि ब्राह्मणांनी प्रशासन चालवायचं असच त्या 60-70 च्या दशकामध्ये पहावयाला मिळायचं. ज्याच्याकडे शेकडो एक्कर शेती तोच मराठा ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत निवडून गेलेला असायचा. अन्य बहुजन जातीतला एखाद दुसरा निवडणुकीच्या या आखाड्यात लंगोट बांधायचा. तर ब्राह्मणशाही जिथं-तिथं प्रशासकीय व्यवस्थेत आपलं काम फत्ते करायची. हे उघड्या डोळ्याने गोपीनाथराव पाहत होते. पुढे प्रमोद महाजनांशी मैत्री झाली, मैत्रीचं रूपांतर सग्या सोयर्यात झालं अन् तिथूनच गोपीनाथ मुंडेंच्या राजकीय संघर्षाला सुरूवात झाली. संघर्ष कोणाशी करायचा होता? राजकीय डावपेच कोणासोबत टाकायचे होते तर ते मातब्बर घरांदाच आणि घराणेशाहीवाल्या राजकारण्यांशी. बीड जिल्ह्यात स्व.काकू वगळता पंडीत, पाटील, आडसकर, दौंड, सोळंके, कदम, जगताप हे नाव राजकारणामध्ये दबदबा निर्माण करणारे आणि अशा नावामध्ये कुठलाही राजकीय वारसा नसतांना या मराठा नेतृत्वाच्या विरोधात संघर्ष करायचा. त्यांच्या राजकीय डावपेचांना चितपट करायचं हे साधं काम नव्हतं. दुसरीकडे बहुजन समाजातला कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, ऊसतोड कामगार उपेक्षितच असायचा. अशा वेळी गोपीनाथ मुंडेंनी राजकारणात यायचं अन् उपेक्षितांना न्याय द्यायचा, त्यांच्यासाठी संघर्ष करायचा हे धोरण मनोमनी बाळगलं. सायकलवर आपल्या राजकीय प्रवासाला सुरूवात केली. जेंव्हा केंव्हा उपेक्षितांचे प्रश्न त्यांच्याकडे यायचे तेंव्हा-तेंव्हा त्या प्रश्नाचा आवाज बणून गोपीनाथराव रस्त्यावर उतरायचे. शेतीचे प्रश्न असतील, सामाजिक प्रश्न असतील, विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, शिक्षणाचे प्रश्न असतील त्या प्रश्नाची सोडवणूक करणं यासाठी उघड रस्त्यावर राहणं हे गोपीनाथरावांच्या स्वभावात रूजलं गेलं. राजकारण करतांना, आंदोलन करतांना गोपीनाथरावांनी समोर कोण आहे हे कधी पाहिलंच नाही. म्हणूनच गोपीनाथ मुंडेंनी

अंगाला तेल लावलेल्या पैलावानाशी पंगा
घेतला.महाराष्ट्राच्या राजकारणात अंगाला तेल लावलेला पैलवान म्हटलं की, राज्याचे ज्येष्ठ नेते शरद पवारांचं नाव समोर आल्याशिवाय राहत नाही. ज्याकाळी गोपीनाथ मुंडेंनी शरद पवारांशी पंगा घेतला त्यावेळी गोपीनाथरावांचं राजकारण सरशेवटीपर्यंत जाईल का? हे तेंव्हाच्या राजकीय विश्लेषकांना सातत्याने सतवायचं. कारण शरद पवारांचं राजकारण हे जितकं दुरदृष्टी तितकच निती-कुटनितीचं. परंतू गोपीनाथराव मुंडेंनी महाराष्ट्रातल्या राजकारणात संघर्ष करतांना या बलाढ्य राजकारण्याशीही झगडण पसंत केलं. महाराष्ट्रात लोकांचे प्रश्न सोडायचे, लोकांच्या प्रश्नांना साद घालयची, सत्ताधार्यांच्या विरोधात बंडाचं निशाण फडकवायचंय मग त्यासाठी राज्यातल्या सह्याद्रीच्या पर्वत रांगापासून ते डोंगरदर्यापर्यंत, वाडी, वस्ती तांड्यापासून गावागावापर्यंत जावेच लागेल. त्यानुसार गोपीनाथ मुंडेंनी आपल्या चार दशकाच्या संघर्षमय राजकारणात अवघ्या महाराष्ट्राची पाच ते सहा वेळा परिक्रमणा केली. गोपीनाथराव ज्या प्रस्थापितांविरोधात लढत होते, त्या प्रस्थापितांचं राजकारण दोन-पाच वर्षाचं नव्हतं दहा-पाच वर्षाचं नव्हतं तर ते शतको ना शतके वारसा हक्काचं होतं. गोपीनाथराव ज्यांच्याविरूद्ध लढत होते आणि ज्या पक्षातून लढत होते तो

पक्ष भट ब्राह्मणांचा होता.
शेटजी-भटजीचा पक्ष म्हणून ज्या भाजपाकडे पाहिलं जात होतं. त्या भाजपाला महाराष्ट्रात शहरी भागातल्या एखाद दुसर्या गल्लीबोळात पसंत केलं जायचं. महाराष्ट्रातल्या राजकरणामध्ये आणि समाजकारणामध्ये भारतीय जनता पार्टीचे विचार सहजपणे पचवता येणारे नव्हते. भाजपाच्या महाराष्ट्रातील नेत्यांना वाडी, वस्तीचे तोंड माहित नव्हते. परंतू इथं बहुजनांचं नेतृत्व करणारा नेता भाजपाला मिळाला होता आणि तो नेताही असा होता की जो संघर्ष हेच आपले जीवन आणि तेच आपले अस्तित्व माननारा. आपल्या संघर्षातून मुंडे नावाला आणि ज्या जातीत जन्मले त्या वंजारा जातीला यशोशिखरावर नेणारे गोपीनाथराव बहुजनांचे खरे नेते ठरत राहिले. महाराष्ट्रातल्या अठरापगड जातींना सोबत घ्यायचं, त्यांचे प्रश्न स्वत:च्या खांद्यावर उचलायचे अन् ते प्रश्न सोडवण्यासाठी हत्तीसारख्या मदमस्त वारसी सत्ता केंद्राशी झगडत राहायचं. मुंडेंचं नाव चर्चेत येत गेले तस शेटजी-भटजीचा पक्ष म्हणून ओळखणार्या भाजपाचं नावही लोकांना माहित होत राहिलं. ओबीसीशी झालर भाजपाला मुंडेंच्या माध्यमातून लागत गेली अन् भाजप महाराष्ट्रामध्ये टापू-टापूत पहायला मिळत गेलं. जिथं भाजपाचं बी ही नव्हतं तिथं भाजपाची बागायतदारी 21 व्या शतकामध्ये सुरू झाली अन् 1995 ला शिवसेना भाजप युतीचं राज्यात सरकार आलं. राज्यातलं सरकार हे अन्य भाजप नेतृत्वापेक्षा गोपीनाथ मुंडेंच्या झंझावतामुळेच आलं म्हटलं तर ते अतिशोक्ती ठरणार नाही. मुंडेंचं झंझावात ज्या दिशेने होता ती दिशा होते कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूरांच्या हक्काची. या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्रीपद गाजवून राज्याला गृहमंत्री पद काय असतं हे दाखवून देणारे पहिले गृहमंत्री गोपीनाथ मुंडे ठरले. आणि तेथून पुढे

महाराष्ट्रातलं वादळ
म्हणून गोपीनाथराव अवघ्या देशात ओळखले जावू लागले. महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडेंच्या शब्दाला मान होता. स्वत:च्या पक्षासह अन्य पक्षात त्यांचे असलेले मित्रत्वाचे संबंध अन् अचानक राजकीय खेळी करतांना फिरवण्यात येत असलेली जादूची कांडी ही सर्वदूर सुपरिचीत होत गेली. अन् इथूनच मुंडेंची बहुजन विचारश्रेणी भाजपाच्या विचारश्रेणीला प्रतिवाद करत राहिली. या प्रतिवादात भाजप नेतृत्वाशी मुंडेंचे अनेकदा खटकेही उडाले. परंतू सत्यवचन स्विकारणारा हा निधडा छातीचा धिरोदत्त बहुजनांच्या विचारासाठी कधी मागे हटला नाही. भाजपाच्या विचारश्रेणीला कधी-कधी मागे हटावं लागलं. पुढे 2010 ते 2014 च्या कालखंडात भाजपात अनेक स्थितांतरे घडली. उघड-उघड गोपीनाथ मुंडेंना पक्षातून विरोध गेला. एक-दोन वेळा मुंडेंनी बंडाचं निशाणही फडकवलं, दबावतंत्र राबवलं, मुंडे नाही तर महाराष्ट्रात भाजप नाही हे जेंव्हा भाजपाच्या पक्ष श्रेष्ठीला उमजून चुकलं तेंव्हा मुंडेंशी त्यांना जुळवून घ्यावं लागलं. मुंडे ज्या फडात जन्मले, ज्या कुळात जन्मले ते कुळ श्रमाचं होतं. कुस कष्टाची होती आणि दृष्टी सत्याची होती. त्यामुळे या वादळाला त्याच्या मर्जीशिवाय कोणालाही शमवता आलं नव्हतं. याचमुळं जेवढे प्रेम करणारे मुंडेंचे वाढत गेले होते तेवढे विरोध करणारे ही वाढत चालले होते. रात्रन् दिन आम्हा युद्धाचा प्रसंग हे तर मुंडेंचं जनू ब्रिदच झालं होतं. अशा स्थितीतही मुंडे आपल्या समर्थकांसाठी वयाच्या सत्तरीतही लढत होते. गावचा सरपंच ते देशाच्या ग्रामविकास मंत्री झालेला हा माणूस जेंव्हा 2014 च्या 3 जूनला एका किरकोळ अपघातात मृत्यू मुखी पडतो तेंव्हा हे वादळ त्याच्याच मर्जीने शमलं तर नाही ना? असं नक्की मनात चुपचुपतं परंतू पुन्हा त्यांचे शब्द कानी पडतात.

मी नाही माझा आवाज
तुमच्यापर्यंत पोहोचतोय

या वाक्याने मुंडे समर्थकात, अनुयायात पुन्हा बारा हत्तीचं बळ मिळतं. परंतू पोशिंदा नसल्याची खंत नक्कीच वाटते. त्यादिवशीही आम्ही म्हणाला होतोत, साहेब झोपलात का, उठा हो. आजही आम्ही म्हणतो साहेब अकरा वर्षाची निद्रा संपली असेल थकवा गेला असेल तर आताही उठा, आज तुमची-तुमच्या विचारांची अखंड बहुजन समाजाला खरचं गरज आहे ओ!
ReplyReply allForwardAdd reaction











