
कोणाची माय व्याली मराठी महाराष्ट्राला हात घालण्याची
आम्ही शांत आहोत, याचा अर्थ गांडू नाही -राज ठाकरे
आमच्या दोघांमधला अंतरपाठ अनाजीपंतांनी दूर केला, एकत्र आलो एक राहण्यासाठी -उद्धव ठाकरे

मुंबई (रिपोर्टर): तब्बल 19 वर्षानंतर ठाकरे बंधू एका व्यासपीठावर, एका विषयावर ठाकरे शैलीत कडाडताना आज उभ्या महाराष्ट्राने पाहिले. सरकारने हिंदी भाषेची सक्ती आणि त्यानंतरची माघार याचा जल्लोष करण्यासाठी ठाकरे बंधूंची आजची जाहीर सभा होती. वरळीतल्या एनएससीआय डोम येथे ही भरगच्च सभा प्रचंड गर्दी असलेली सभा उभ्या महाराष्ट्राने पाहिली. तसे राज ठाकरे यांनी कोणतेही भांडण हे महाराष्ट्रापेक्षा मोठे नसल्याचे सांगून महाराष्ट्र पेटून उठतो तेव्हा काय होतं हे सत्ताधार्यांना माहित झाले. म्हणूनच त्यांनी भाषा सक्ती माघार घेतल. जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणविसांना जमलं असं म्हणत राज ठाकरे यांनी कोणाची माय व्याली, मुंबई आणि महाराष्ट्राला हात घालण्याची, नुसता हात घालून दाखवा, आम्ही शांत आहोत याचा अर्थ आम्ही गांडू नाही’, असे राज ठाकरेंनी म्हटले. तर उद्धव ठाकरे यानीं‘ मराठी भाषेसाठी आम्ही लढत असू आणि त्यावर फडणवीस आम्हाला गुंड म्हणत असतील तर मग हो, आहोत आम्ही गुंड’ असं म्हणत आमच्या दोघांमधला अंतरपाठ अनाजीपंतांनी दूर केला, असा टोला उद्धव ठाकरेंनी फडणविसांना मारत ‘एक आलो आहोत एकत्र राहण्यासाठी’ असं म्हणत एकीचे संकेत दिले.
वरळीमधील एनएससीआय डोम याठिकाणी ठाकरे बंधुंची आज जाहीर सभा झाली. या सभेला प्रचंड प्रमाणात गर्दी दिसून आली. मराठी माणूस एकवटल्याचे पहावयास मिळाले. व्यासपीठावर केवळ दोनच खुर्च्या दिसून आल्या. ठाकरे बंधू व्यासपीठावर आल्यानंतर एकमेकांची गळाभेट घेत दोघांनी छत्रपती शिवरायांना अभिवादन केले. भाषणाची सुरुवात राज ठाकरेंनी केली आणि त्यांनी सत्ताधार्यांवर कडाडून हल्ला केला. मोर्चा निघायला पाहिजे होता मग सत्ताधार्यांना मराठी माणसाची एकी दिसली असती, असे म्हणत राज ठाकरे म्हणाले, तुमच्याकडे सत्ता असेल विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर, या सभेला कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा. कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, असे म्हणत जे बाळासाहेबांना जमलं नाही ते देवेंद्र फडणविसांना जमलं, आम्हा दोघांना त्यांनी एकत्र आणलं. हिंद प्रदेशावर सव्वाशे वर्षे मराठी माणसाने राज्य केलं तेव्हा तिथं मराठी लादली का? आमचा भाषेला विरोध नाही, भाषा ही कुठलीही असो ती श्रेष्ठच असते, परंतु ही सरकारची चाचपणी होती, मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याची. त्यांना डिवचून पाहिलं, मुंबई स्वतंत्र करता येते का? कुणाची माय व्याली मुंबई-महाराष्ट्राला हात घालण्याची. हात घालून दाखवा, आम्ही शांत आहोत, याचा अर्थ आम्ही गांडु नाही असं म्हणत राज ठाकरेंनी जो जिथे चुकेल तिथे त्याच्या कानसुलात हाणलं गेलंच पाहिजे, असंही राज ठाकरे म्हणाले. प्रबोधनकार, बाळासाहेब हे दोघेही इंग्रजी शाळेत शिकले मग त्यांच्या मराठीवर तुम्ही शंका घेणार का? आडवाणी मिशनरी शाळेत शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर आम्ही शंका घ्यावी का? आता मराठी माणूस एकत्रीत आलाय, आता हे लोक जातीपातीचं राजकारण करतील, सावध रहा! असंही राज ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे म्हणाले की, बर्याच वर्षानंतर राज आणि माझी राजकीय व्यासपीठावर भेट आहे. सन्माननीय राज ठाकरे असा उल्लेख करतो. राज यांनी अतिशय चांगली मांडणी केली आहे. आज आमच्या भाषणा पेक्षा आमचं एकत्र दिसणं महत्वाचं आहे. आमच्या दोघांतील अंतरपाट अनाजीपंतांनी दूर केला आहे. आता अक्षता टाकायची गरज नाही. एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला.
आम्ही कडवट देशाभिमानी मराठी हिंदू आहोत
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, मला आज कल्पना आहे, अनेक बुवा महाराज बिझी आहेत. कोण लिंबू कापतंय, कोण रेडा कापतोय. माझ्या आजोबांनी या भोंदूपणा विरोधात लढा दिला होता आणि त्यांच्यासाठी आम्ही एकत्र आलो आहे. वापरायचं आणि फेकून द्यायचं, असं यांचं काम आहे. आता आम्ही दोघे तुम्हाला फेकून देऊ. तुमच्या डोक्यावर बाळासाहेब ठाकरे यांचा हात नसता तर कुठे असता तुम्ही? मधल्या काळात यांनी सुरू केलं होतं की, उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं. अरे आम्ही कडवट देशाभिमानी मराठी हिंदू आहोत, असेही त्यांनी यावेळी म्हटले.
तर सरकार कशाला पाडलं
महाराष्ट्रात मराठी माणूस न्याय मागत असेल आणि तुम्ही त्याला गुंड म्हणत असाल तर आम्ही गुंड आहोत. देवेंद्र फडणवीस यांच वक्तव्य म्हणजे मला सका पाटलांची आठवण येते, त्यावेळी काँग्रेस सत्तेवर होती. मुंबई आपल्या हक्कांची आहे, लढलो आणि आपण घेतली. काश्मीरमध्ये 370 कलम हटवायला आपण पाठिंबा दिला होता. ते म्हणाले होते, एक निशाण एक झेंडा. हिंदी सक्ती आम्ही लावून घेत नसतो. उद्धव ठाकरे यांनी निर्णय आणला म्हणतात. मी एवढं काम करत होतो तर सरकार कशाला पाडलं? महाराष्ट्रात मराठी सक्ती केल्यावर तो भेडिया बोलतोय. मराठी माणूस मुंबई बाहेर नेला, असं तुम्हाला वाटत असेल तर 2014 नंतर मुंबईतील उद्योगधंदे गुजरातला कसे गेले? तुम्ही आमच्यात गद्दारी करवली आणि आमचं सरकार पाडलं. तुमचे मालक तिकडे गुजरातला बसले आहेत. दोन व्यापारी त्यांच्यासाठी तुम्ही हे करत आहात, अशी टीका त्यांनी यावेळी भाजपवर केली.








