शिरूर (रिपोर्टर) महाराष्ट्रातील महापुरुषांचा अवमान करणारे महाराष्ट्राला कमी लेखत महाराष्ट्राविरोधात अपमानजनक वक्तव्य करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी आंदोलन सुरू केले असून या आंदोलनाची सुरुवात शिरूर कासार येथून झाली आहे. ‘गेट वेल सून कोश्यारी तात्या’ असं म्हणत दहा लाख पत्र राज्यपालांना पाठवण्यात येणार असून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या या आंदोलनाला राज्यभरातील तरुणांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे.
गेल्या काही दिवसांपुर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्रातून गुजराती आणि राजस्थानींना काढले तर महाराष्ट्रात काहीच राहणार नाही, मुंबई ही आर्थिक राजधानी राहणार नाही, अशी मुक्ताफळे उधळली होती. त्यापुर्वी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आणि महात्मा ज्योतीबा, सावित्रीबाई फुले यांच्याबाबत संतापजनक वक्तव्य केले होते. याविरुद्ध राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी राज्यपालांना 10 लाख पत्र पाठवून निषेध नोंदवण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला राज्यभरातून प्रचंड प्रतिसाद मिळत असून आज शिरूर येथून ‘गेट वेल सून कोश्यारी तात्या’ अशा आशयाचे पत्र राज्यपालांना पाठवण्यात आले आहे.