बीड (रिपोर्टर) तीन दिवसांपासून जिल्ह्यामध्ये धो-धो पाऊस पडत आहे. या पावसामुळे हातातोंडाला आलेला घास निसर्गाने हिसकावून घेतला. कापूस, सोयाबीन, बाजरी यासह भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. रात्री पडलेल्या पावसात सहा मंडलात अतिवृष्टी झाल्याची नोंद करण्यात आली. यंदा सरसरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे.
यावर्षी सुरुवातीपासूनच चांगला पाऊस पडत गेला. ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाने थोडीफार उघडीप दिली होती. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात पाऊस धुव्वाधार पडत गेला. गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली. या अतिरिक्त पावसामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान होऊ लागले. जिल्ह्यात सोयाबीन आणि कापसाची सर्वाधिक लागवड झालेली आहे. या पावसाने कापसाच्या वाती तर सोयाबीनची माती झाली. भाजीपाल्यांचेही आतोनात नुकसान झाले. या पावसाने जिल्हाभरातील जवळपास सर्व धरणं ८० ते ८५ टक्के भरले आहेत. रात्री पडलेल्या पावसात सहा ठिकाणी अतिवृष्टी झाल्याची नोंद करण्यात आली. गेवराई मंडलात ६६.०, मादळमोही मंडलात ६६.०, किट्टीआडगाव मंडलात ६६.०८, धर्मापुरी मंडलात ६६.८, मांजरसुंबा मंडलात ७१.८ व नेकनूर मंडलामध्णये ७१.८ व इतर मंडलात ४३.८, नाळवंडीत ४८.८, पाली मंडलात ३३.५, नेकनूर ७१.८, म्हाळसजवळ्यात ३४.००, पिंपळनेरमध्ये २४.८, चौसाळ्यात ३२.०० इतका पाऊस पडला. या पावसाने सरासरी ओलांडली असून ५९४.३ इतका पाऊस पडायला हवा, त्यापेक्षा आता ७०९.६ इतका पाऊस पडला.
पिक विमा कंपनीने हजारो
शेतकर्यांचे अद्याप पंचनामे केले नाही
बीड तालुक्यातील शेतकर्यांनी दि.२१ सप्टेंबर रोजी झालेल्या पावसानंतर मोठ्या प्रमाणात पिक विमा कंपनीकडे तक्रारी केल्या. मात्र या शेतकर्यांच्या शेतावर जावून पिक विमा कंपनीने पाहणी, पंचनामा करणे आवश्यक होते मात्र अद्याप देखील हजारो शेतकर्यांच्या शेतावर पिक विमा कंपनी आजपर्यंत पोहचलेली नाही. एकीकडे पिक विमा कंपनी तांत्रीक चुकांवर बोट ठेवत असतांना स्वतःच्या चुका, विलंब झाकून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. पिक विमा कंपनी प्रतिनिधींना शेतकर्यांनी फोन केला असता, त्यांच्याकडून कसलाही प्रतिसाद भेटत नाही. बीड जिल्ह्यातील शेतकर्यांना अग्रीम पिक विमा मंजूर करतांना कंपनीने कित्येक तांत्रीक बाबी समोर आणत अग्रीम नाकारला. मात्र स्वतःहाच पिकविमा कंपनी शेतकर्यांनी ऑनलाईन तक्रार केल्यानंतर पाहणी करायला जात नाही. ही कंपनीची दुटप्पी भूमीका असून यामुळे हजारो शेतकरी पिक विम्याच्या लाभापासून वंचीत राहण्याची शक्यता आहे. यामध्ये वेळीच पंचनामा न केल्यामुळे या शेतकर्यांच्या तक्रारी रिजेक्ट देखील होवू शकतात. ज्या ठिकाणी विमा प्रतिनिधी नुकसान पाहणी पंचनाम्यासाठी जातात त्याठिकाणी त्या गावासाठी असलेले कृषी सहाय्यक, तलाठी व ग्रामसेवकास घेवून जात नाही. नियमानूसार या पंचांना सोबत घेवून जाणे आवश्यक असतांना कंपनी निमय डावलत आहे. या शेतकर्यांच्या होत असलेल्या नुकसानीकडे कृषी विभाग अन महसूल प्रशासनाचे देखील नुकसान होत आहे असे शेतकरी नेते धनंजय गुंदेकर यांनी म्हटले आहे.
अनेक शेतकर्यांचे काढलेेले सोयाबीन वाहून गेले
बीड जिल्ह्यामध्ये जवळपास ४ लाख हेक्टरमध्ये सोयाबीनचा पेरा झालेला आहे. १५ दिवसांपुर्वी अनेक शेतकर्यांनी सोयाबीन काढून गंज लावली होती. मात्र कालपासून धुव्वाधार पाऊस पडत असल्याने या पावसाने कित्येक शेतकर्यांचं काढलेलं सोयाबीन वाहून गेल्याने त्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.