बीड (रिपोर्टर) शासनाने सेंट्रल किचन पद्धत राबविल्यामुळे हजारो महिला बेरोजगार झाल्या आहेत. पुन्हा त्यांना त्यांचे काम मिळावे यासाठी आज प्रचंड संख्येने महिला रस्त्यावर उतरल्या होत्या. रोजगार हिरावणार्या सरकारचा धिक्कार असो. ‘खिचडी आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची’ अशा गगनभेदी घोषणा या वेळी महिलांनी दिल्या. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून निघालेली रॅली जैनभवन येथे जाऊन त्याचे सभेत रुपांतर झाले.
महाराष्ट्र शालेय पोषण आहार कामगार संघटना फेडरेशन सिटूच्या वतीने बीडमध्ये दोन दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशन होत आहे. त्यानिमित्त आज प्रचंड संख्येने महिला कामगारांनी बीडमधून रॅली काढली. या वेळी त्यांनी विविध मागण्यांचे फलक हातात घेऊन घोषणा दिल्या. सेंट्रल किचन प्रणाली बंद करा, तामिळनाडू व केरळच्या धर्तीवर 11 हजार रुपये मानधन द्या, शालेय पोषण आहार कामगारांना शाळेमध्ये सेवक म्हणून नियुक्त करा, स्वयंपाकी म्हणून कुकचा दर्जा द्या, यासह विविध मागण्या घेऊन महिला प्रचंड संख्येने रस्त्यावर उतरल्या होत्या. जिल्हा परीषद समोरील मैदानातून भव्य रॅलीला सुरुवात होईल. ती रॅली छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, बस स्थानक, लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे चौक, सुभाष रोड मार्गे जैन भवन याठिकाणी जैन भवन येथे व जाहीर सभेला सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा राज्य अध्यक्ष कामगार नेते कॉ. डॉ. डी. एल. कराड, राज्य सरचिटणीस कॉ. एम. एच. शेख, हिमाचल प्रदेशचे कामगार नेते कॉ. जगतराम, शालेय पोषण आहार कामगार संघटनेचे अध्यक्ष कॉ. प्रभाकर नागरगोजे, सचिव कॉ. डॉ. अशोक थोरात, कॉ. प्राचार्य ए. बी. पाटील, कॉ. मिरा शिंदे, के. रघु, मधुकर मोकळे, पी.एस. घाडगे, डी.बी. बोर्डे, बी.जी. खाडे, मोहन जाधव, रोहीदास जाधव यांनी संबोधित करतील.