सांगली (रिपोर्टर) जिल्ह्यातील जत तालुक्यात ऊसतोडणी मजुरांना घेऊन जाणार्या ट्रकला भीषण अपघात झाला आहे. चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने ट्रक पलटी होऊन हा अपघात झाल्याची माहिती असून सदर अपघातात 15 ऊसतोड मजूर जखमी झाले आहेत. यामध्ये काही लहान मुलांचाही समावेश असून जखमींना मिरजेच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व ऊसतोड मजूर बीड आणि जालना जिल्ह्यातील असून जत मार्गे ते कर्नाटकमधील बेळगी साखर कारखान्याकडे निघाले होते. जतमधून काही अंतरावर गाडी पोहोचली असता चालकाने अचानक ब्रेक दाबला. त्यानंतर ट्रक रस्त्याच्या बाजूला जाऊन पलटी झाला. दरम्यान, या अपघातात गाडीत बसलेले 15 ऊसतोड मजूर हे गंभीर जखमी झाले आहेत. तसंच अपघातामध्ये ट्रकसह ऊसतोड मजुरांच्या जीवनावश्यक साहित्याचं मोठं नुकसान झालं आहे.
शिरूर तालुक्यातल्या ऊसतोड मजुराचा कोरेगाव येथे पाण्यात बुडून मृत्यू
बीड जिल्ह्यातून दरवर्षी चार लाखापेक्षा जास्त ऊसतोड मजूर ऊसतोडणीसाठी जात असतात. शिरूर तालुक्यातील हाजीपूर येथील सुरेश बंडू उगले हे जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना कोरेगाव येथे ऊसतोडणीसाठी गेले होते. त्याठिकाणी त्यांचा काल तेथील नदीमध्ये बुडून मृत्यू झाला. सदरील तरूण हा पाणी आणण्यासाठी गेला होता असे सांगण्यात आले. उगले यांचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी तेथील नागरिकासह हाजीपूर येथील ऊसतोड मजूर प्रयत्न करत होते. पुलाच्या नळ्यामध्ये त्यांचा मृतदेह शोधण्यात येत होता. अथक परिश्रमानंतर मृतदेह बाहेर काढण्यात तेथील नागरिकांना यश आले होते. या घटनेने हाजीपूर येथे हळहळ व्यक्त केली जात आहे.