बीड (रिपोर्टर) महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेमध्ये विकास योजना राबवता ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसीच्या संस्थांना प्राधान्य देण्यात यावे या प्रमुख मागणीसह नवीन उद्योगांना चालना मिळावीयासाठी पाच ते दहा लाख रूपयापर्यंत थेट महामंडळातून देण्यात यावे. या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्यावतीने संबळ वाजवून जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले. तर दुसरीकडे वीज कंपनीकडे काम केल्यानंतरही कंपनीने बील अदा केले नाही म्हणून उमेश क्षीरसागर या तरूणाने धरणे आंदोलन केले.
या आंदोलनाचे नेतृत्व अर्जुन दळे यांनी केले. जिल्हाधिकार्यांमार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांना देण्यात आलेल्या निवेदनात ओबीसीच्या प्रलंबीत मागण्या मांडण्यात आल्या होत्या. एकूण 13 मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले. सदरचे आंदोलन हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झाले. उमेश क्षीरसागर यांनी विज कंपनीकडे त्यांच्या ऑर्डरनुसार काम केले. मात्र त्यांच्या कामाचा मोबदला आजपावेत मिळाला नाही. सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर विज कंपनी बिल अदा करत नसल्याचे पाहून आयुक्त कार्यालयासमोर सदरील तरूणाने आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र औरंगाबादपर्यंत जायला पैसे नाहीत असे जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात स्पष्ट उल्लेख करत हे आंदोलन आपण आपल्या कार्यालयासमोर करत असल्याचे म्हटले. सदरील तरूणाच्या आंदोलनाची दखल जिल्हा प्रशासनाने दुपारपर्यंत घेतली नव्हती.