बीड (रिपोर्टर) छत्रपती शिवाजी महाराजांबाबत भाजपाचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात भाजपा विरोधात संतापाची लाट उसळली असून राष्ट्रवादीने आक्रमक होत भाजपचा जंतू दिल्लीत वळवळला, महाराष्ट्राचे पाणी दाखवण्याची वेळ आली आहे. असे म्हणत आ.रोहित पवारांनी संताप व्यक्त केला तर दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबतीत वादग्रस्त विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले असून याच्या निषेधार्थ उद्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने सडके कांदे भरलेली काळी टोपी जाळून निषेध करण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष महेबुब शेख यांनी म्हटले आहे. खा.अमोल कोल्हेंनीही भाजपासह सुधांशु त्रिवेदीचा चांगलाच खरपसून समाचार घेतला. शिवसेनेही याप्रकरणी भाजपाला घेरले आहे.
राज्यपाल कोश्यारी हे सतत वादग्रस्त विधान करत असतात. त्यांनी युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबतीत अपशब्द वापरले. याचा सर्वस्तरातून निषेध होत आहे. उद्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने सडके कांदे भरलेली काळी टोपी जाळून आंदोलन करण्यात येणार आहे. हे आंदोलन प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी होणार आहे. या आंदोलनात तालुका जिल्हा,प्रदेश पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी असतील असे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष महेबुब शेख यांनी म्हटले आहे.
शिवाजी महाराजांवरील भाजप
प्रवक्त्याच्या विधानाने कोल्हे संतापले
मुंबई भाजपच्या प्रवक्त्याने केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राज्याचं राजकारण तापलं असून विविधी स्तरातून भाजपच्या विधानाचा निषेध नोंदवण्यात येत आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच संताप व्यक्त केली आहे.
अमोल कोल्हे यांनी फेसबुक पोस्ट करून म्हटलं की, डॉ. सुधांशू त्रिवेदीजी, छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातीच्या मावळ्यांच्या मदतीने औरंग्याला फरफट करून या महाराष्ट्रात गाडलं. हाच खरा इतिहास आहे. तुमच्या दळभद्री वक्तव्याचा जाहीर निषेध! छत्रपती शिवराय आमची अस्मिता आहे, तिला कोणीही डिवचू नये, अशा शब्दात कोल्हे यांनी भाजपला खडसावलं. भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी एका वृत्त वाहिनीच्या मुलाखतीत छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान केले आहे. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. शिवाजी महाराजांनी 5 वेळा औरंगजेबाची पत्र लिहून माफी मागितली होती असं वादग्रस्त विधान त्रिवेदी यांनी केलं आहे.