बीड (रिपोर्टर): बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणामध्ये ऊसतोड कामगार आहेत. ऊसतोड कामगारांच्या अनेक योजना सरकार आणि गोपीनाथराव मुंडे महामंडळाअंतर्गत राबविल्या जातात. जिल्ह्यातील साडेचार लाख ऊसतोड कामगारांपैकी फक्त आतापर्यंत 10 हजार कामगारांनाच ओळखपत्र देण्यात आलेले आहेत. येत्या दोन महिन्यात या सर्व ऊसतोड कामगारांना ओळखपत्र देण्यासाठी ग्रामसेवकाने नियोजन करावे, त्यांची नोंदणी करून घ्यावी, शासकीय योजनेच्या ‘जत्रा महोत्सवात’ गाळमुक्त धरण योजनेअंतर्गत शेतकर्यांना तलावातील गाळ शेतात पोहचवता कसा येईल याचेही नियोजन संबंधित विभागांनी करावे यासह सर्व योजना खर्या लाभार्थ्यांपर्यंत पोहचत्या करा असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी केले.
यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये जत्रा महोत्सवाअंतर्गत जनकल्याणकारी योजना सर्वसामान्यांच्या दारी या अंतर्गत ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी आणि इतर सर्व शासकीय अधिकार्यांचे वर्कशॉप (कार्यशाळा) आयोजीत करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन करताना जिल्हाधिकारी बोलत होत्या. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, सहायक जिल्हाधिकारी जिवणे, सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी डॉ. दयानंद जगताप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मोकाटे, केकान, मुख्य वित्त तथा लेखाधिकारी जटाळे, तहसीलदार सुहास हजारे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, बीड जिल्ह्यासाठी या महोत्सवाअंतर्गत एकाच दिवशी पंच्याहत्तर हजार लाभार्थ्यांना लाभ देण्याचे उद्दीष्ट सरकारने आपल्याला ठरवून दिलेले आहे. हे उद्दिष्ट आपण सहजपणे पार पाडण्यासाठी सुक्ष्मनियोजन करावे. संजय गांधी श्रावणबाळ पासून दादासाहेब सबलीकरण योजना, ऊसतोड कामगारांच्या योजना, बालविवाह रोखणे, महिला आणि बालकल्याणच्या योजना या सर्व योजना ग्रामीण भागातील खर्या गरजू लाभार्थ्यापर्यंत पोहचत्या केल्या पाहिजेत. ऊसतोड कामगारांना आतापर्यंत नोंदणी करत फक्त दहा हजारच ओळखपत्र वाटप करण्यात आलेले आहेत. येत्या दोन महिन्यांमध्ये जिल्ह्यातील साडेचार लाख ऊसतोड कामगारांना ओळखपत्र वाटप करण्याचे नियोजन तातडीने हाती घेऊन ते पार पाडावयाचे आहेत. यात सर्वात महत्वाची भूमिका ही ग्रामसेवकाची राहणार आहे. जनकल्याण योजना सर्वसामान्यांच्या दारी या योजनेबाबत मुख्यमंत्री सचिवालयाचे गजानन पाटील यांनी सादरीकरण करत सर्व ग्रामसेवकांना या योजनेमागील हेतू, योजना कशी राबवायची, याचे सादरीकरण उत्कृष्टपणे सादरीकरण केले. सर्व योजनांचे लाभार्थ्यांचे मेळावे जत्रा महोत्सवाअंतर्गत तालुकास्तरावर (पान 7 वर)
मंडळ स्तरावरच्या गावपातळीवर विभागप्रमुखांनी घ्यावयाचे आहेत. प्रत्येक योजनेचा मोठा फलक आठवडी बाजाराच्या गावामध्ये सोबतच प्रत्येक गावात लावयाचा आहे. कागदपत्रांच्या त्रुटीअभावी कोणत्याही लाभार्थ्याला शासकीय योजना नाकारायचे नाहीत, जे कागदपत्र कमी असेल तो कागद शासकीय यंत्रणेकडून उपलब्ध करून घ्यावयाचा आहे. कृषी विभागाची योजना शेतकर्यांपर्यंत मोठ्या प्रमाणात पोहचवावयाच्या आहेत. याच शासकीय योजनेच्या जत्रा महोत्सवात रोजगार मेळावा घेऊनही अनेक गरजू आणि पात्र युवकाला रोजगारही उपलब्ध करून द्यावयाचा आहे. तहसीलदार आणि गटविकास अधिकार्यांनी सर्व सेतू चालकांची बैठक घेऊन या योजनेचे मार्गदर्शन त्यांना करावयाचे आहेत. अशाप्रमाणे येत्या पंचेचाळीस दिवसात सर्व शासकीय विभागाच्या योजना जिल्ह्यातील कमीत कमी 75 हजार लाभार्थी ते दोन लाख लाभार्थ्यांपर्यंत पोहचत्या करण्यासाठी आजची कार्यशाळा यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजीत करण्यात आली होती. या कार्यशाळेला जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, तलाठी, मंडल अधिकारी, गटविकास अधिकारी व सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
‘निगरगट्ट कर्मचारी, मोबाईलचे व्याभिचारी’
जत्रा महोत्सवाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये कार्यक्रम सुरू होता. जेव्हा दस्तुरखुद्द जिल्हाधिकारी कर्मचार्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलू लागल्या, योजनांची माहिती जिल्ह्यातील कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर यांच्यापर्यंत गेली पाहिजे, त्यांना त्या योजनांचा लाभ मिळायला पाहिजे त्यासाठी ग्रामसेवकापासून ते जिल्हाधिकार्यापर्यंतच्या व्यक्तीने काम करावे, टाळाटाळ करू नये, अशा महत्वाच्या सूचना देत असताना उपस्थित कर्मचारी, अधिकारी मात्र आपआपल्या मोबाईलमध्ये गुंग होते. त्यांना या कार्यक्रमाचा अथवा जिल्हाधिकार्यांच्या सूचनांशी देणेघेणे नव्हते.