बीड (रिपोर्टर)- संभाजीनगर-बीड महामार्गावरील महालक्ष्मी चौकात आज सकाळी अचानक मराठा समाजाच्या तरुणांनी रस्त्यावर उतरत रस्ता रोखून धरल्याने तब्बल दीड तासापेक्षा जास्त या महामार्गावरील वाहतूक ठपप झाली होती. मनोज जरांगे यांच्या जिवाचे बरे-वाईट झाले तर उभ्या महाराष्ट्रात आगडोंब उसळेल, असा इशारा देत आंदोलकांनी मराठा समाजाला त्वरीत आरक्षण देण्याची मागणी केली. दुसरीकडे बीड शहरापासून काही अंतरावर असलेल्या नगर रोडवरील चर्हाटा फाट्यावर काही आंदोलकांनी अहमदपूर-संभाजीनगर या बसवर अंधाधूंद दगडफेक करत पुर्ण गाडी फोडून टाकली. रात्रीच बीड जिल्ह्यात एक बस जाळण्यात आली होती. त्यामुळे या आंदोलनाने पुन्हा एकदा हिंसक वळण घेण्यास सुरुवात केल्याचे चित्र दिसून येत आहे. दुसरीकडे गेवराईत सात वर्षांखालील मुलांना एकत्रीत करून राज्यातील सर्वच पक्षांच्या पुढार्यांच्या फोटोंवर मुत्रविसर्जन करत मराठ्यांनी आपला संताप दाखवला. त्याचबरोबर येथील मुस्लिम समाजाने पाठींबा देण्यासाठी थेट सराटे अंतरवलीची वाट धरल्याचे दिसून आले. वडवणीत आरक्षणासाठी काही तरुण टॉवरवर चढून घोषणाबाजी करत होते.
काल रात्री बीड-संभाजीनगर महामार्गावर पाडळसिंगीपासून ते रांजणी, हिरापूर या ठिकाणी तीन ते चार वेळा आंदोलने झाली. रस्त्यावर टायर जाळण्यात आले. एका बसलाही आग लावण्यात आली. त्यापाठोपाठ आज सकाळी अकरा वाजता पुन्हा एकदा बीड शहरानजीक असलेल्या बायपासवरील महालक्ष्मी चौकात हजारोंच्या संख्येने मराठा तरुण महामार्ग रस्त्यावर उतरले. ‘एक मराठा लाख मराठा’ ची घोषणा करत रास्ता रोको आंदोलन सुरू केला. एक ते दीड तासाच्या रास्ता रोकोमुळे या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. रस्त्याच्या दोन्ही बाजुने शेकडोवर वाहने थांबल्यामुळे वाहतूक कोंडी पहावयास मिळाली. संतप्त आंदोलकांनी मराठा समाजाला आरक्षण तात्काळ देण्याची मागणी करत मराठा आरक्षणासाठी सराटे अंतरवलीत आमरण उपोषणास बसलेले मनोज जरांगे यांच्या जिवाचे बरे-वाईट झाले तर महाराष्ट्रात आगडोंब उसळेल, त्याची पुर्ण जबाबदारी ही सरकारची असेल, असा इशारा दिला. इकडे बीडपासून काही अंतरावर असलेल्या नगर रोडवरील चर्हाटा फाट्यावर सकाळी दहा ते अकरा वाजता अहमदपूर-संभाजीनगर (क्र. एम.एच. 13 सी.यू. 7987) या बसवर अंधाधूंद दगडफेक करण्यात आली. बसच्या पुर्ण काचा फोडण्यात आल्या, त्यानंतर आंदोलक तेथून पसार झाले. या आंदोलनाने पुन्हा एकदा हिंसक वळण येत असल्याचे चित्र समोर येत आहे.