पीक कर्जाचं पुनर्गठन नको, कर्जमाफी करा
जिल्हाधिकारी कार्यालयावर किसान सभेची शेतकरी दिंडी
टाळमृदंगाचा गजर, घोषणाबाजीने नगर रोड दणाणला
बीड (रिपोर्टर): बीड जिल्ह्यासह मराठवाड्यामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून राज्य सरकार अजूनही झोपेतच आहे. शासनाने दुष्काळ निवारणासाठी योग्य त्या उपाययोजना तात्काळ आखाव्यात, गुरांच्या चार्यासाठी गावोगावी चारा डेपो सुरू करण्यात यावेत, सर्वच पिकांना विमा द्यावा यासह इतर मागण्यांसाठी आज अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी दिंडी काढण्यात आली होती. या दिंडीमध्ये अनेक शेतकर्यांचा सहभाग होता. टाळमृदंगाच्या गजरात घोषणाबाजी करत शेतकरी दिंडीत सहभागी झाले होते. ही दिंडी र् छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून निघाला होती.
बीड जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. राज्य सरकारने याबाबत अद्यापही योग्य त्या उपाययोजना सुरू केलेल्या नाहीत. खरीप आणि रब्बी पीक दोन्ही हातचे गेले. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला. शासनाने सर्वच पिकांना विमा देण्यात यावा, पुनर्गठन करण्याऐवजी कर्जमाफीचा निर्णय घ्यावा, दुष्काळाने संपुर्ण पिक हातचे गेले आहे त्यामुळे शेतकर्यांना दिलासा मिळणे गरजेचे आहे. गुरांच्या चार्यासाठी गावोगावी चारा डेपो सुरू करण्यात यावा, दुष्काळात तग धरून राहण्यासाठी तगाई म्हणून शेतमजुरांना दरमहा आर्थिक मदत देण्यात यावी, सोयाबीन, कापसासारख्या पिकांवर उत्पादन खर्चाच्या दिडपट हमीभाव देऊन त्यांची शासकीय खरेदी करण्यात यावी, यासह इतर मागण्यांसाठी आज अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी दिंडी काढण्यात आली होती.‘ईडा पिडा टळो बळीचे राज्य येवो’ ‘शेतकरी वाचवा देश वाचवा’ ‘पिक कर्ज माफ करा’ यासह इतर घोषणा देत शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.