परळी वैद्यनाथ (दि. 13) – राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बोले तैसा चाले ही म्हण आज पुन्हा एकदा त्यांच्या कर्तृत्वातून खरी करून दाखवली असून बीड जिल्ह्यातील 6 लाख 34 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर आज 25% अग्रीम पिकविम्याच्या 206 कोटी 22 लाख रुपये रक्कमेचे वितरण डीबीटी प्रणाली द्वारे करण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांना लागू अग्रीम विम्याची रक्कम 1000 पेक्षा कमी आहे, त्यांना नियमाप्रमाणे किमान एक हजार रुपये याप्रमाणे 7 लाख 70 हजार पैकी उर्वरित शेतकऱ्यांना 35 कोटी रुपये रक्कम लगेचच वितरित करण्यात येणार आहे. दिवाळीत कोणत्याही परिस्थितीत पिकविम्याची अग्रीम 25% मदत शेतकऱ्यांना पोहचणारच, असा पवित्रा धनंजय मुंडे यांनी घेतला होता. त्यानुसार डीबीटी पोर्टलवर मंजूर एकूण 241 कोटी रुपये रक्कम दिवाळीची सुट्टी सुरू होण्याच्या एक दिवस आधी सायंकाळी जमा करण्यात आली होती. आज बँकांचे कार्य सुरू होताच या रक्कमेचे शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरण सुरू झाले आणि सोशल मीडियावर ‘बोले तैसा चाले’ या म्हणीची धनंजय मुंडे यांच्या बाबतीत चर्चा सुरू झाल्याचे पाहायला मिळाले. दिवाळी सुरू झाल्यानंतरही विमा का जमा झाला नाही, यावरून काहीजण संभ्रम निर्माण करत आहेत. मात्र असंख्य शेतकऱ्यांनीच आज विमा खात्यावर जमा झाल्याचे बँकेचे आलेले मेसेज आभाराच्या पोस्टसह व्हायरल केले आहेत. दरम्यान कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच राज्य सरकारच्या नमो किसान महासन्मान योजनेच्या पहिल्या हप्त्याचे प्रत्येकी 2 हजार रुपये प्रमाणे वितरण करण्यात आले होते. याद्वारे बीड जिल्ह्यातील सुमारे 3 लाख 90 हजार शेतकऱ्यांना 72 कोटी रुपये रक्कमेचे वितरण करण्यात आले होते. बीड जिल्ह्यातील सर्व 11 तालुक्यांमध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, याद्वारे देखील शेतकऱ्यांना दिलासा व विविध सवलती प्राप्त होणार आहेत. दरम्यान आज ऐन दिवाळीत पीक विम्याच्या अग्रीम मदतीचे वितरण सुरू असताना विविध शेतकरी संघटना तसेच प्रत्यक्ष लाभार्थी शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून धनंजय मुंडे यांच्यासह राज्य शासनाचे आभार मानले आहेत.