पाटोदा(रिपोर्टर): पाटोदा कृषी म्हणजे असुन अडचण आणि नसुन खोळंबा अशा प्रकारचे सध्या हे कार्यालय झाले असुन कार्यालयात असलेल्या 30 कर्मचार्यांपैकी केवळ एक दोन कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित असतात व बाकीचे सदानं कदा दौर्यावर असल्याचे सांगण्यात येते.शेतकरी मात्र बिचारा या कार्यालयाला खेट्या मारून मारून बेजार होतो परंतु शेतकर्यांसाठी असणारे हे कार्यालय व येथील 30 कर्मचारी यांना याचे काहीही सोयर सुतक नाही.म्हणजेच पाटोदा कृषी कार्यालय म्हणजे असुन अडचण,नसुन खोळंबा अशी परिस्थिती आहे.कधीही पाटोदा तालुका कृषी अधिकारी कार्यालयात गेले तर कार्यालय हे सुने सुने पडलेले असते शेतकर्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याचे चित्र आहे.
पाटोदा तालुका कृषी कार्यालयाचा कारभार मागील काही वर्षांपासून पुर्ण ढेपाळला असुन तालुका कृषी अधिकारी कार्यालयात साधारणतः मंजूर पन्नास पदांपैकी 30 च्या आसपास कर्मचारी असल्यामुळे या अपुर्या मनुष्यबळावर येथील कारभाराचा बोजवारा उडाला आहे.कामकाजासाठी शेतकरी राजा ग्रामीण भागातून कृषी कार्यालयात कामासाठी खेट्या मारतात मात्र कृषी कार्यालयात कर्मचारी हजर नसल्यामुळे त्यांची मोठी गैरसोय होत आहे.कृषी विभागातील एका कर्मचार्यास मागे लाच घेताना पकडले असल्याने कृषी विभागाची अब्रू अगोदरच चव्हाट्यावर टांगली गेली आहे त्यातच या बेजबाबदार अधिकारी व कर्मचार्यांमुळे या विभागाचे प्रतिमा आणखीनच मलीन होत आहे.कृषी कार्यालयात किमान आहे त्या कर्मचारी अधिकार्यांनी हजर राहणे गरजेचे आहे मात्र सवयीचे गुलाम झालेल्या या बेजाबाबदार अधिकारी व कर्मचार्यांना आपल्या कामाची कोणतीही जाण राहिलेली नाही आता या संदर्भात वरिष्ठांनीच लक्ष घालण्याची गरज आहे असे समाज सेवक शेतकरी स्वामी सानप यांनी सांगितले.