महाराष्ट्र सदनात पैसा कोणी खाल्ला? तो जनतेचा पैसा -जरांगे
धोंडराई येथे तिसर्या टप्प्यातील दौर्याचा समारोप
गेवराई (रिपोर्टर) आतापर्यंत केवळ आरक्षणामुळे मराठ्यांच्या पोरांना शिकता आले नाही तर ज्यांनी खर्च करून शिक्षण केले परंतु नोकरी मिळाली नाही. अनेक गोरगरीब मराठा समाजातील आई-वडिलांनी रात्रंदिवस कबाड कष्ट करून आपल्या मुलांना शिकवले पण केवळ आरक्षण नसल्याने त्याचा उपयोग झाला नाही. म्हणून आता मराठा समाजातील सामान्य शेतकर्यांच्या पोरांसाठी उभारलेला हा लढा आरक्षण मिळेपर्यंत थांबणार नसून यापुढे मराठ्यांच्या पोरांचे आयुष्य बरबाद होऊ द्यायचे नसून सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडणारच असल्याचे मनोज जरंगे पाटील यांनी धोंडराई येथील दुसर्या टप्प्यातील समारोप सभेप्रसंगी बोलताना सांगितले. पुढे त्यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका करताना मोठी पोलखोल केली. जरांगे म्हणाले, कुठे भाजी विकत होते, कोणाच्या इथे काय करत होते, मुंबईला काय केले, कोणत्या नाटकात काम केले, कोणत्या पिक्चरमध्ये काम केले हे सगळे मला माहिती आहे. कुणाचा बंगला हडप केला, हेही मला माहिती आहे.
मनोज जरांगे पाटील यांचा तिसर्या टप्प्यातील दौर्याचा समारोप काल सायंकाळी धोंडराई येथे झाला. गुरुवार रोजी सकाळपासून श्रीरामपूर, नेवासा, शेवगाव, बोधेगाव असा दौरा संपन्न झाल्यानंतर सभा येथील माध्यमिक विद्यालयाच्या मैदानावर ही विराट सभा संपन्न झाली. जरांगे पाटील यांची तिसर्या टप्प्यातील महाराष्ट्र दौर्यातील शेवटची आणि गेवराई तालुक्यातील पहिली सभा असल्याने समाज बांधव मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. तर जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी दहा ते बारा जेसीबी मधुन पुष्पवृष्टी करण्यात येणार आली. दरम्यान धोंडराई फाट्यावरुन ढोल पथकाच्या गजरात वाजत-गाजत मनोज जरांगेंना सभास्थळापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. सभास्थळी पार्किंग व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, रुग्णवाहिका तसेच मेडिकल टीम देखील सभास्थळी तैनात करण्यात आली होती. धोंडराईसह परिसरातील स्वयंसेवकांकडुन योग्य नियोजन करण्यात आले होते. दरम्यान यावेळी जरांगे पाटील यांनी सरकारला पुन्हा धारेवर धरत आरक्षणाबाबत निर्णय घ्यावाच लागेल असा खणखणीत ईशारा दिला. पुढे बोलताना जरांगे यांनी भुजबळांवर सडकावून टीका केली. ते म्हणाले, कुठे भाजी विकत होते, कोणाच्या इथे काय करत होते, मुंबईला काय केले, कोणत्या नाटकात काम केले, कोणत्या पिक्चरमध्ये काम केले हे सगळे मला माहिती आहे. कुणाचा बंगला हडप केला, हेही मला माहिती आहे. मी म्हटले की, तुम्ही मराठी जनतेचे खाल्ले, महाराष्ट्र सदनातील पैसा महाराष्ट्राच्या जनतेचा आहे. तो पैसा खाल्ला आणि त्यामुळे त्यांना गोरगरीब जनतेचा तळतळाट लागला. तुरुंगात गेले आणि बेसण भाकर खाल्ली, या शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी हल्लाबोल केला.
सभेला संबोधित करताना मनोज जरांगे म्हणाले की, मराठा समाज प्रचंड संख्येने जमला त्यासाठी मनापासून कौतूक. मात्र, या गर्दीच्या नादात आपल्या हातून काही चूकही व्हायला नको. मराठा एकवटला आहे, पण गर्दीच्या नादात अतिउत्साहात येऊ नका. तुमच्या पायाला हात लावून सांगतो, पुन्हा समाजाची हानी होईल. आता समाजाची हानी होऊ देऊ नका, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले.
दरम्यान, आरक्षणाचा विषय आता अंतिम टप्प्यात आहे. 24 डिसेंबरच्या आतमध्ये महाराष्ट्रातील सर्व मराठ्यांना 50 टक्क्यांच्या आत ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळणार यात काहीच शंका नाही. मराठ्यांच्या ओबीसीत 32 लाख नोंदी सापडल्या आहेत. त्यांचा गुणाकार केला, तर दीड ते पावणे दोन कोटी मराठा लोकांना लाभ होतोय. हेच आरक्षण 70 वर्षांपूर्वी दिले असते, तर जगाच्या पाठीवर मराठ्यांची जात नंबर एकची प्रगत जात ठरली असते, असे मनोज जरांगे म्हणाले.