गणेश सावंत -9422742810
अखंड हिंदुस्तान हा भाग्यशाली देश आहे. या देशात महान विभुती जन्माला आल्या नव्हे नव्हे तर निर्माण झाल्या. श्रीकृष्ण, प्रभू रामचंद्र, राजे शिवछत्रपती, संत ज्ञानेश्वर, जगद्गुरू संत तुकाराम, महात्मा गांधी या विभुतींना काळाची, स्थळाची मर्यादा नाही. हे लोक अमर्याद आहेत. या महात्म्यांचे विचार अमरत्वाबरोबर चिर तरुण आहे. त्यांच्या अलौकिक गुणांची, अवतारतुल्य कार्याची माहिती, महंती सर्वश्रूत आहे. मात्र विज्ञानाच्या अविष्काराने प्रफुल्लीत झालेल्या आजच्या युगात, आजच्या पिढीला या अवतारतुल्य माणसांची महंती मनात रुजली पाहिजे. म्हणजे, भाग्यशाली भारत सदा वैभवशाली राहील. आम्ही नेहमी प्रयत्न करत आलो आहोत. आमच्या वाचकांना आणि खासकरून तरुण पिढीला अवतारतुल्यांचा धगधगीत इतिहास माहित व्हावा, अन् त्या इतिहासाच्या पावन खुणातून मार्ग काढत तरुण पिढींनी यशाचं शिखर गाठावं. आजपासून आम्ही रामायण सांगणार आहोत…
राम कशात आहे?
रामायण कसे आहे?
प्रभू राम सत्यात आहेत, प्रभू राम न्यायात आहेत, प्रभू राम सत्कर्मात आहेत, सत्कार्यात आहेत, इथल्या कणाकणात आणि मनामनात प्रभू राम आहे. म्हणूनच रामायण भारतीय जनतेचा प्राण आहे आणि रामायणाचा राम हा प्राण आहे. राम मर्यादा पुरुषोत्तम आहेत, राम एक वचनी एक पत्नी आहेत. राम त्यागाची मुर्ती आहे. राम आई-वडिलांचे आज्ञाधारक आहेत. बंधू प्रेमाचा अथांग सागर आहेत. सत्तेपेक्षा वचन पाळणारे ते एक बापाचे लेक आहेत. रामायण कसे आहे..?रामायण संसारीक आहे. रामायणात लढणारी सीता आहे, दु:ख सहन करणारी जननी आहे. दु:ख आहे… सुख आहे.. मित्र आहे, दगा फटका आहे… युद्ध आहे.. सरशी आहे… पिछेहाट आहे… अमृत आहे… विष आहे… हनुमानाच्या रुपाने स्वामी भक्त आहे. रामायण एवढे कठोर आहे, त्यात प्रभू रामावरच टीका आहे. रामायण हे विचार स्वातंत्र्य आहे. संतप्त सीतेची तीक्ष्ण आणि तीव्र टीका इथेच दिसून येते. लक्ष्मण एवढा संतप्त होतो की, आपल्या बापाला म्हणजे थेट राजा दशरथाला कामलंपट म्हणतो. ते रामायणातच आहे. रामायण सुखाचे सागर आहे, संसारात जसे दिवस येतात आणि जातात तशी दु:खाची रजनी सुखाच्या पहाटेने निघून जाते. ते रामायणातच पहायला मिळते. रामायणामध्ये सुख-दु:खांचे प्रसंग एकापाठोपाठ एक निघून जातात. अवघ्या रामायणात प्रभू राम एक ते दोन वेळा आपल्याला जगायचे नाही, असे म्हणतात. परंतु कर्तव्य-कर्माचे शिवधनुष्य पेलवणे हा रामाचा धर्म ते कधीच विसरत नाहीत. रामायणात राम हे नायक आहेत अन्
सीता शोकसागराचा
लाव्हा रस
काय चुक होती सीतामाईची, लग्न झाल्याबरोबर आपल्या पतीसोबत सीतामाईंना वनवासात जावं लागतं… अवघे रामायण हे सीतामाई भोवती फिरताना दिसून येतं. त्यामुळे जसे राम रामायणाचे नायक तसे सीतामाई रामायणाच्या नायिका आहेत. रामायणामध्ये भावना आहे, स्त्री जन्माची कहानी आहे. चूल आणि मूल इथपर्यंतची स्त्री रामायणात नक्कीच नाही. सीतामाई फक्त रडत बसणार्या नव्हत्या… सीतामाई खुद्द एक आव्हान आहेत. दस्तुरखुद्द सीतामाई रामायणात प्रभू रामाला जाब विचारताना दिसतायत. रामायणात आणखी दोन पात्र अत्यंत महत्वाचे आहेत. बंधू प्रेमाचे ज्वलंत उदाहरण इथेच पहायला मिळते. लक्ष्मण आपलं सर्व सुख सोडून बंधू प्रेमापोटी प्रभू रामांसोबत वनवासाला जातात. मग तेही नायकच नव्हे काय? स्वामी भक्त हनुमानाशिवाय तर रामायण पुर्णच होऊ शकले नसते. आईने स्वार्थाने आपल्यासाठी सत्ता प्रस्थापीत केली. ती सत्ता धुडकावणारे भरतही रामायणाचे नायक मानले जातील. रामायणात पाच नायक आहेत ज्याला पंचायत असे संबोधले तर चुकीचे ठरणार नाही. रामायणामध्ये राम, सीता, लक्ष्मण हे आदर्श म्हणावे लागतील. प्रभू राम पित्याच्या शब्दाखातर सत्तेला लाथ मारतात. ज्येष्ठ बंधू वनवासाला जातो अन् आपल्याला सगळ्या सुविधा मिळतील, असे असताना लक्ष्मण त्या सुविधांना लाथ मारत बंधू प्रेमाखातर भावासोबत निघतो. सीतामाई पती धर्म पाळत रामा सोबत जातात. हे आदर्श सत्ता लालसींनी रामायणातून घ्यायला हवेत. कारण
रामायण चिगरंजीव
रडवणारे आणि लढायला शिकवणारे रामायण चिरंजीव झाले. खाडिलकरांनी म्हटलय…. रामायण ही जगातली सर्वात महान शोकांतिका आहे. रामायणातली प्रत्येक व्यक्ती ही अमर झाली आहे. त्यांच्या बद्दल जनमाणसात अथांग प्रेम आहे. परंतु रामायणातील पाच नायकांपैकी चौघांचा शोकांत अहोतो. हा शोकांत कुणा खलनायकामुळे नसतो, त्यांच्या सद्गुणामुळे आणि कणखर स्वभावामुळे तो शोकांत असतो. प्रभू राम केवळ राजाची प्रतिष्ठा म्हणून सीतेचा तिसर्यांदा त्याग करतात अन् नंतर माता सीतामाईच्या ध्यासाने शरयू नदीत जलसमाधी घेतात. प्रभू रामाने एकदा नव्हे तर तिनदा त्याग केल्याने सीतामाई धर्तीच्या उदरात आसरा घेतात. जन्मभर सेवा करणारा लक्ष्मण प्रभू रामाने त्याग केल्यामुळे तोही शरयू नदीत जलसमाधी घेतो. फक्त स्वामी भक्त हनुमान रामायण सांगण्यासाठी चिरंजीव होतात.
(उद्याच्या अंकात अश्वमेध यज्ञ सोहळ्यात रामायण कहानी लव-कुशाच्या वाणी)