दिल्ली (वृत्तसेवा):- बिल्किस बानो सामुहिक बलात्कार प्रकरणातील 11 आरोपींची शिक्षा माफ करण्याचा निर्णय गुजरात सरकारनं घेतला होता. या निर्णयावर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. या निर्णयासंदर्भात बिल्किस बानो यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती.
अखेर बिल्किस बानो यांना न्याय मिळाला असून गुजरात सरकारनं या 11 आरोपींची शिक्षा माफ करण्याचा घेतलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयानं रद्द ठरवला आहे. त्यामुळे गुजरात सरकारला हा मोठा दणका मानला जात आहे. 2002 च्या गुजरात दंगलींदरम्यान बिल्किस बानो यांच्यावर 11 आरोपींनी सामुहिक बलात्कार केल्याची घटना घडली होती. त्यापाठोपाठ त्यांच्या कुटुंबातील सात जणांची निर्घृण हत्याही करण्यात आली होती. त्यांच्यावर बलात्कार केल्याच्या प्रकरणात या 11 आरोपींना जन्मठेपेची शिक्षाही झाली. मात्र, गेल्या वर्षी यातील काही आरोपींची उर्वरीत शिक्षा माफ करून त्यांची तुरुंगातून सुटका करण्याचा निर्णय गुजरात सरकारनं घेतला. या निर्णयाविरोधात बिल्किस बानो यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. आज या प्रकरणी न्यायालयाने आपला निकाल दिला आहे.