बीड (रिपोर्टर): गेल्या वीस-पंचेवीस वर्षांपूर्वी डी.एड. ही पदवी धारण केली की जिल्हा परिषदेला शिक्षकाची नोकरी मिळायची, म्हणून अनेक पालकांनी मुलगा बारावीला गेला की त्याचा प्रवेश ग्रामीण भागातील महाविद्यालयात घेऊन कागदोपत्री घटस्फोट घेत असत. परितक्त्या महिलेचा मुलगा किंवा मुलगी त्यामुळे सहज डी.एड.ला नंबर लागत असे. डी.एड. झाले की सरकारी नोकरी, अशाच प्रकारचा एका उच्च शिक्षीत दोघेही पती-पत्नी शिक्षक असलेल्या दाम्पत्याने न्यायालयात येऊन हसत-खेळत घटस्फोट घेतला. घटस्फोट हसत-खेळत असतो का? अशी सहज चौकशी केली असता त्यांच्या मुलाला बारावी नीट मेडिकल परिक्षेत कमी मार्ग पडलेत आणि मुलाला तर मेडिकलला प्रवेश घ्यायचाय म्हणून या दाम्पत्याने शक्कल लढवत कागदोपत्री घटस्फोट घेतला.
शासकीय नोकरीत आणि चांगल्या व्यावसायिक अभ्यासक्रमाला परितक्त्या महिलेच्या मुलाला कमी मार्कावर सहज प्रवेश मिळतो म्हणून आजकाल उच्च शिक्षीतांमध्ये अशीही कागदोपत्री घटस्फोट घ्यायची प्रथा पडली आहे. वास्तविक पाहता सर्वच सर्रासपणे असे करतात, असे नाही, परंतु काही जास्तीचे शहाणे लोकं आपल्या मुलाला वैद्यकीय अभ्यासक्रम, नीट, जेई, आयआयटी अशा अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी हे पालक अशा प्रकारचा उपद्वयाप करताना दिसून येत आहेत.