भारताचा पाकिस्तानच्या आठ तळांवर हल्ला
पाक लष्करप्रमुखाची कबुली, भारतीय क्षेपणास्त्रांनी नुकसान झाले

दिल्ली (वृत्तसेवा): 8 आणि 9 मेच्या रात्री पाकिस्तानने ड्रोन्स आणि मिसाईल्स डागल्या. त्यांचा भारताने हवेतच उद्ध्वस्त केल्याने पाकिस्तानचा तिळपापड झाला. त्यानंतर 9 आणि 10 मेच्या रात्री पाकिस्तानकडून हायस्पीड मिसाईल हल्ले करण्यात आले. या मिसाईल्स फुसका बार ठरल्या. भारतीय लष्कराने हवेतच या मिसाईलच्या चिंधड्या केल्या. याबद्दल माहिती भारतीय लष्कर आणि केंद्र सरकारच्या अधिकार्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली. पाकच्या हायस्पीह क्षेपणास्त्रांमुळे उधमपूर, पठाणकोट, आदमपूर आणि भुज हवाई तळावर हल्ले केले. त्यामुळे आपले काहीसे नुकसान झाले. पाकिस्तानने रुग्णालय आणि शाळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला जो भारताने हाणून पाडला. ब्रह्मो सुविधा नष्ट करण्याचा दावा खोटा असल्याचे आणि यश 400 संरक्षण प्रणाली पुर्णपणे सुरक्षित असल्याचे कर्नल सोफिया कुरेशी यांच्यासह परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
’पाकिस्तानने सीमेवर फक्त गोळीबारच केला नाही. तर कुपवाडा, पुंछ, राजौरीमध्ये कमी तीव्रतेचे हल्ले करण्यात आले. हे हल्ले भारतीय लष्कराने परतवून लावले. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या हल्ल्यांना भारतीय लष्कराने जशास तसे उत्तर दिले आहे’, अशी माहिती भारतीय लष्कराच्या कर्नल सोफिया कुरैशी यांनी दिली.
भारतावर हल्ला करण्यासाठी कशाचा वापर?
पाकिस्तान लष्कराने पश्चिम सीमेवर आक्रमक हल्ले केले. यात ड्रोन्स, दूरवर मारा करणारे अस्त्र, लढाऊ विमाने यांचाही वापर करण्यात आला. पाकिस्तानने भारतीय लष्कराच्या ठिकाणांना लक्ष्य केले. नियंत्रण रेषेवरही ड्रोन्स घुसखोरी आणि उखळी तोफांनी हल्ले केले, असे कर्नल कुरैशी यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय सीमा आणि एलओसीवरून 26 पेक्षा अधिक ठिकाणी घुसखोरी करण्याचे प्रयत्न केले गेले. भारतीय लष्कराने यशस्वीपणे घुसखोरीचे प्रयत्न हाणून पाडले. उधमपूर, पठाणकोट, आदमपूर, पुंछ, भठिंडा या हवाई दलाच्या तळावर हल्ले केले, अशी माहिती कर्नल कुरैशी यांनी दिली.
पाकिस्तानने डागली हायस्पीड मिसाईल
कर्नल कुरैशी यांनी सांगितले की, पाकिस्तानने एक हायस्पीड मिसाईल सकाळी (10 मे) 1.40 वाजता डागली. ही मिसाईल पंजाबमधील हवाई दलाच्या तळावर सोडण्यात आली होती. ही मिसाईल निष्क्रिय करण्यात आली. पाकिस्तानने श्रीनगर, अवंतीपूर, उधमपूर येथील, हवाई दलाच्या तळांवर, रुग्णालय आणि शाळेवर हल्ला केला. पाकिस्तानकडून हे जाणीवपूर्वक करण्यात आले.








