मुंबई : राज्यातील मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चांगलाच पेटला आहे. मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी आज अंतरवली सराटी येथून मुंबईकडे कूच केली आहे. सणासुदीच्या काळात आंदोलन टाळावे, सरकारसोबत चर्चा करावी अशी विनंती सरकारकडून करण्यात आली होती. मात्र, आपल्या मागण्यांवर ठाम राहून जरांगे पाटील यांनी थेट मुंबईकडे मोर्चा वळवण्याचा निर्णय घेतल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
या आंदोलनाला सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील काही आमदार, खासदारांनी देखील उघड पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे सरकारची कोंडी झाल्याची चर्चा रंगली आहे.
एकनाथ शिंदे यांचा दरे गावचा दौरा रद्द
दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात होणारा दरे गावचा दौरा यंदा अचानक रद्द करण्यात आला आहे. या निर्णयामागे नेमके कारण स्पष्ट झालेले नसले तरी, जरांगे पाटील यांचे सुरू असलेले आंदोलन हे यामागील महत्त्वाचे कारण असल्याच्या चर्चेला जोर आला आहे. मुख्यमंत्री असताना जरांगे यांच्या आंदोलनांना सामोरे गेलेले शिंदे, आता मात्र गप्प का आहेत? असा सवाल विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे.
जरांगे पाटील यांच्याशी सरकारची पुन्हा चर्चा?
मराठा आंदोलकांच्या निर्धारामुळे सरकार आता पुन्हा एकदा चर्चेच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत.
राधाकृष्ण विखे-पाटील आणि उदय सामंत यांची भेट
मराठा आरक्षणासाठी मुंबईत येत असलेल्या जरांगे पाटील यांची मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे-पाटील आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासोबत आज भेट होणार आहे. ही भेट अहिल्यानगर किंवा पुणे येथे पार पडण्याची शक्यता आहे. उदय सामंत लवकरच अहिल्यानगरला पोहोचणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
त्यामुळे आगामी काही तासांत सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्या चर्चेतून नेमका कोणता तोडगा निघतो, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.







