
16 मंडळात अतिवृष्टीची नोंद, सर्वच मध्यम प्रकल्प तुडूंब भरले तर लाडझरीच्या तलावाची भिंत खचली
अधिकार्यांना मुख्यालय न सोडण्याचे जिल्हाधिकार्यांचे आदेश
बीड, (रिपोर्टर)ः- काल बीड जिल्ह्यात झालेल्या 24 तास मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील 16 मंडळात अतिवृष्टी झाली असून बीड जिल्ह्यातील जवळपास 17 मध्यम प्रकल्प तूडूंब भरलेले आहेत. बीड शहरातील तहान भागविणार्या माजलगाव येथील धरण ही जवळपास 83 टक्के भरलेले असून अंबाजोगाई तालुक्यातील लाडझरी पाझर तलावाची भिंत खचून गेलेली आहे. जिल्हाधिकार्यांनी कालच्या पावसात नुकसान झालेल्या शेती पिकांसह पडझर झालेल्या घराचेही पंचनामे करण्याचेही आदेश देत सर्व महसूल उपविभागीय अधिकारी, तहसिलदार आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकार्यांनी आपले मुख्यालय न सोडण्याचे आदेश दिले आहेत.
वार्षिक सरासरीच्या जवळपास बीड जिल्ह्यात पावसाने सरासरी ओलांडली असून काल झालेल्या 24 तासातील पावसामुळे जिल्ह्यातील 16 मंडळात अतिवृष्टीची नोद झालेली आहे. काल सरासरी 48.4 मि.मि एवढा पाऊस एकाच दिवशी पडला. अतिवृष्टी झालेल्या मंडळापैकी बीड तालुक्यातील राजुरी, पेडगाव, चर्हाटा, पारगाव शिरस या मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे तर पाटोदा तालुक्यात अंमळनेर महसूल मंडळात 87 मिमि एवढा पाऊस कोसळला, आष्टी तालुक्यात दौलावडगाव, डोईठाण या मंडळात अतिवृष्टी झालेली आहे तर अंबाजोगाई तालुक्यातील अंबाजोगाई मंडल, बर्दापुर या मंडळात अतिवृष्टीची नोंद झालेली आहे. केज तालुक्यातील होळ आणि धारूर तालुक्यातील धारूर मंडळात अतिवृष्टीची नोंद आढळून येत आहे. शिरूर तालुक्यातील शिरूर मंडळ, रायमोहा, ब्रम्हनाथ येळंब, गोमळवाडा आणि खालापुरी या मंडळात अतिवृष्टीची सरासरी कालच्या पावसाने ओलांडलेली आहे. या मंडळात झालेल्या अतिवृष्टी सोबतच बीड जिल्ह्यातील जवळपास सर्वच मध्यम प्रकल्प पाण्याचे तुडूंब भरलेले असून सर्वात मोठे असलेल्या आणि बीड शहराची तहान भागविणार्या माजलगाव धरणही 82.79 टक्के एवढे भरलेले आहे
त्यासोबत बिंदूसरा, सिंदफना, महासांगवी या धरणांनी 100 टक्के पाण्याची पातळी ओलांडलेली असून आष्टी तालुक्यातील सर्वात महत्वाचे मेहकरी धरण ही 62.60 टक्के भरलेले आहे तर कडा,तलवार, उपळी, वान, बोरणा, बोधेगाव, सरस्वती, कुडलिका, वाघेबाभुळगाव ही धरणे ही 100 टक्के भरलेली आहेत. कडा 64.9 तर उटी 47.64 एवढे धरण भरलेल ेआहे. कुंडलिका आणि केज तालुक्यातील मांजरा धरणेगाव प्रकल्पातून अनुक्रमे 2 गेटमधून 5470क्युसेस विसर्ग करण्यात आलेला आहे तर मांजराच्या धनेगाव प्रकल्पाच्या 4 दरवाजे उघडले असून यातून 10482.84 एवढा पाण्याचा विसर्ग करण्यात आलेल आहे. वार्षिक सरासरीच्या ऑगस्ट महिन्यात बीड जिल्ह्यात 129.1 एवढा पाऊस प्रत्येक वर्षी पडत असतो. मात्र या वर्षी ही सरासरी ओलांडत 208.4 एवढ्या पावसाची नोंद झालेली आहे. जिल्हा प्रशासनाने सर्वच नागरीकांना सर्तकतेचा इशारा दिला असून नदी आणि ओढ्याच्या पाण्याचा अंदाज घेवूनच हे नदी नाले ओलांडण्याचे धाडस करावे सर्व उपविभागीय अधिकारी तहसिलदार आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकार्याने मुख्यालयी थांबावे परवानगी शिवाय मुख्यालय सोडू नये असे आदेश आज सकाळी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सनी यांनी व्हिडिओ कॉन्फरसंद्वारे सर्व अधिकार्यांना दिले आहेत.
सावधान! कुठल्याही क्षणी माजलगाव धरणातून पाणी सुटणार
गेल्या चोवीस तासात मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत असून माजलगाव धरणही 90 टक्के भरलेले असून आजही धरण क्षेत्रात नदी-नाल्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे या धरणातून कोणत्याही क्षणी सिंधफणा नदीपात्रात पाणी सोडण्याची शक्यता असून या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. या गावात मनूर, लुखेगाव, गोविंदपूर, ढेपेगाव, सांडसचिंचोली, नागडगाव, रोशनपुरी या गावच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तलाठी, मंडल अधिकारी, ग्रामसेवक आणि सरपंचांना तहसीलदारांनी सूचना दिल्या असून दवंडी देऊन गावातील लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन तहसीलदार रुईकर यांनी केले आहे.






